बचत गटातील सक्षम महिलांची आज कार्यशाळा

खास प्रतिनिधी, औरंगाबाद</strong>

राज्यातील ४.८ लाख महिला बचत गटांना महाराष्ट्र राज्य जीवनोत्ती अभियाना अंतर्गत ५२४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता. त्याच बरोबर महिलांनी केलेल्या बचतीच्या आधारे बँकेकडून त्यांना पाच हजार २४९ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यामुळे महिला सक्षम होत असून त्यांचा मेळावा औरंगाबाद येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये होणार असल्याची माहिती ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

गेल्या चार वर्षांत स्वयं सहायता गटांनी केलेल्या चांगल्या कामाचा उल्लेख करुन या क्षेत्रात चांगली कामगिरी झाल्याचा दावा पंकजा मुंडे यांनी केला.  पूर्वी पापड-लोणची यापुरतेच महिला बचत गटाचा उद्योग मर्यादित होता. मात्र, कुक्कुटपालन आणि वारली चित्रकला तसेच फॅशन डिझाईनचे प्रशिक्षण पूर्ण केल्याने अनेक बचत गटांची उलाढाल वाढली असल्याचे त्यांनी सांगितले. पालघर जिल्ह्यात फुलशेतीच्या माध्यमातून मोगरा लागवड करणाऱ्या बचत गटातील महिलांनी ११ कोटी रुपयांपर्यंतची उलाढाल केल्याचा अनुभव त्यांनी सांगितला. बचत गटांच्या माध्यमातून अनेकजणी सक्षम झाल्याने त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी पंतप्रधान मोदी औरंगाबाद येथे येणार असून ते या गटांना कोणती दिशा देतात, याची उत्सुकता असल्याचे मंत्री मुंडे यांनी सांगितले.