छत्रपती संभाजीनगर : पाणी प्रश्नातील नियोजनातील चुकांवर बोट ठेवत ’लबाडांनो पाणी द्या ’ या घोष्यवाक्यसह शिवसेना (ठाकरे गट) पक्षाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या आंदोलनावर आता सत्ताधारी भाजपबरोबरच खासदार संदीपान भुमरे, पालकमंत्री संजय शिरसाट यांनीही टीका केली. दोन्ही बाजूने आराेप – प्रत्यारोप होत असले तरी पाणी पुरवठा सुरळीत कधी होणार या प्रश्नाचे उत्तर अजूनही अनुत्तरीत आहेत. शुक्रवारी दुपारी पाच – सव्वापाचच्या सुमारास काढण्यात येणाऱ्या मोर्चाचे नेतृत्व आदित्य ठाकरे करणार आहेत.
दरम्यान जिल्ह्यात राजकारणात खैरे आणि दानवे हे दोघेच लबाड असल्याची टीका भुमरे यांनी केली. अशा प्रकारच्या आंदोलनामुळे येणाऱ्या गुंतवणुकीवर परिणाम होतील असे म्हणत भाजपनेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच्या काळात काय काम झाले, असा सवाल केला. ते मुख्यमंत्री असताना पाणी याेजनेचे काम पुढे सरकले नाही, असा आरोप केला. शहराला पाणी पुरवठा करता आले नाही म्हणून उद्धव ठाकरे यांनी जनतेची जाहीर माफी मागितली होती.मात्र, पाणी उपल्ब्ध असताना पुरवठ्यातील दोष दुरुस्ती करता आली नसल्याने शहरात ‘ पाणीबाणी’ निर्माण झाली आहे. गेल्या दोन दिवसापासून शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने सात पत्रकार परिषदा घेत आंदोलनाची निकड आणि उद्भवलेल्या परिस्थितीवर भाष्य केले.
‘आम्ही लबाडांनो पाणी द्या’ असे म्हणालो होतो. कोणावर व्यक्तगत टीका केली नव्हता. मात्र, त्यांनीच टीका ओढावून घेतली. त्यामुळे लबाड कोणत आहेत, हे स्पष्ट झाले आहे, असे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे म्हणाले. या योजनेसाठी पाठपुरवा करण्यासाठी जात होतो तर तेव्हा उद्धव ठाकरे वेळच देत नव्हते, अशी टीका भुमरे यांनी केली. तर भुमरे हे केवळ पैठणचे खासदार आहेत. त्यांनी कधीही पाणी पुरवठा विषयावर जाहीर चर्चा करावी, असेही दानवे म्हणाले. चंद्रकांत खैरे हे आमचे नेते आहेत त्यामुळे त्यांना पाण्यात बुडवाचा प्रश्नच नाही. आणि नेतृत्वाला बुडविण्याची संस्कृती भाजपमध्ये आहे.
मुख्यमंत्र्यांनी एकनाथ खडसे यांना बुडवले. नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण अडवाणी यांचे नेतृत्व बुडविले. खैरे हे आमचे नेते आहेत. त्यांनी केवळ माेर्चााचे नेतृत्व करावे. दरवेळी नेत्यांनी काम करण्याची गरज नाही. फक्त देखरेख करावी लागते. ती खैरे करत आहेत, असे सांगत दानवे यांनी खैरेची बाजू उचलून धरली.