छत्रपती संभाजीनगर : बीड जिल्हा भाजपच्या अध्यक्षपदासाठी अखेर शंकर देशमुख यांच्या नावावर शनिवारी शिक्कामोर्तब झाले आहे. देशमुख यांची नियुक्ती ही पक्षाच्या वरिष्ठ स्तरावरून झालेली असून, त्यातून व्यक्तीनिष्ठतेऐवजी पक्षनिष्ठतेला कौल मानला जात आहे. कोण्या एका जातीचा दबाव न मानता पक्ष देईल तोच व्यक्ती महत्त्वाचा मानून मराठा, वंजारा आणि ओबीसी या घटकांऐवजी प्रथमच ब्राह्मण जिल्हाध्यक्ष नियुक्त करून पक्षाने जिल्ह्यातील सर्वच नेत्यांना एकप्रकारे इशाराच दिल्याचा संदेशही देशमुख यांच्या निवडीतून गेल्याची चर्चा आहे.
मंत्री पंकजा मुंडे व भाजप आमदार सुरेश धस यांच्या वादामध्ये बीड भाजपचे जिल्हाध्यक्षपद अडकले होते. जिल्हाध्यक्षपदासाठी बीड जिल्ह्यातील मराठा विरुद्ध वंजारी हा वादही आडवा येत होता. या वादाला मागील लोकसभा निवडणुकीपासून अधिक धार येत गेली. त्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर तर वरील दोन समुदायामध्ये बीड जिल्ह्यात मोठीच दरी निर्माण झाल्याचे चित्र असून, या पार्श्वभूमीवर दोन्ही समाजातून येणाऱ्या नावांना परस्परांकडून तीव्र विरोध होत असल्याची चर्चा होती. त्यामुळे पक्षातून प्रथमच ग्रामीण व शहरी किंवा जिल्ह्यातील पूर्व व पश्चिम असे विभाग ठरवून जिल्हाध्यक्ष नियुक्त करण्याचाही विचार पुढे आला होता. याशिवाय मुंडे-धस वादामध्ये पक्षाच्या वरिष्ठ स्तरावरून थेट जिल्हा अध्यक्ष निवडला जाईल आणि तो फडणवीस यांचा निकटवर्तीय असेल, अशी शक्यताही वर्तवली जात होती. अखेर संघाच्या विचारातून पुढे आलेले शंकर देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून, ते पंकजा मुंडे यांचे जवळचे मानले जात असले तरी त्यांचे नाव वरिष्ठस्तरावरूनच निश्चित झाल्याचे सांगण्यात येते.
विशेष म्हणजे धस यांच्या आष्टी- पाटोदा मतदारसंघातील कडा गावचे रहिवासी असलेले शंकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात सव्वादोन लाखांवर सदस्य नोंदणी व २० मंडळाध्यक्षांची नियुक्ती झाली आहे. संघ विचारांच्या मुशीतून तयार झालेले शंकर देशमुख यांनी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत सोनकच्छी मतदारसंघात विस्तारक म्हणून काम केलेले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी जिल्हाध्यक्ष पदाचा प्रभार त्यांच्याकडे देताना ते संघ विचारातील असल्याचा प्रथम विचार झाला तेव्हाच त्यांना पुढे प्रत्यक्ष जबाबदारी मिळेल, असा अंदाज बांधला जात होता. बीड जिल्ह्यात प्रथमच ब्राह्मण जिल्हाध्यक्ष पक्षाने नियुक्त केला आहे. देशमुख आता धस-मुंडे यांच्या वादातून कसा मार्ग काढून पक्ष संघटना बळकट करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. त्याचे एक उदाहरण धस यांच्या मतदारसंघातील रखडलेल्या मंडळाध्यक्षांच्या निवडीतून समोर येईलच. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ही त्यांच्या कार्यपद्धतीची सिद्धता ठरणारी असेल.
शंकर देशमुख यांची वडिलांपासून संघ विचारांची पार्श्वभूमी आहे. शंकर देशमुख हे कडा ग्रामपंचायतचे दोन वेळा सदस्य राहिलेले आहेत. त्यांच्या पत्नीने थेट सरपंच निवडीतील निवडणूक लढवलेली होती. परंतु, त्यात त्यांचा थोडक्या मतांनी पराभव झाला होता. वडील अनंत कृष्णराव देशमुख हेही ग्रामपंचायत सदस्य होते. आजोबा कड्याचे सरपंच राहिलेले आहेत. संघ विचार आणि राजकीय पार्श्वभूमी लाभलेली आहे.