प्रदुषणाला आळा घालण्यासाठी देशात पेट्रोल-डिझेलला पर्याय देण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकार खास प्रयत्न करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी संडे ब्रंचच्या भागात प्रदूषण मुक्त कारमुळे आपल्याला कसे फायदे होतात, त्यांच्याकडे असलेले कार कलेक्शन, याविषयी बोलताना माहिती दिली आहे.

गडकरी सांगतात, “इथेनॉलवर आधारीत वाहनांसाठी प्रयत्न सुरु आहे. देशात ईलेक्ट्रिक व्हेईकलला प्रोत्साहन देण्यात येत आहे. फ्लेक्स फ्युअल हे खास प्रकारचे तंत्रज्ञान आहे. यामुळे प्रदूषणाला आळा घालता येईल. पेट्रोल, डिझेलचे दर सतत वाढत असताना फ्लेक्स फ्युएलमुळे नागरिकांना दिलासा मिळू शकते, असे त्यांचे म्हणणे आहे. फ्लेक्स फ्यूएल हे पेट्रोल आणि डिझेलमध्ये इथेनाॅल मिसळून तयार केलं जातं. इथेनॉल हे उसाचा रस, रताळे, बटाटा, गोड ज्वारी आणि मका यापासून तयार करण्यात येतं. तसंच तांदूळ, गव्हाचा भुसा आणि मका या पदार्थांपासून देखील इथेनॉल बनवलं जातं. फ्लेक्स फ्यूएलमुळे इथेनॉलची मागणी वाढल्याने अर्थातच या शेतमालाची देखील मागणी वाढेल, ज्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढू शकेल.”

“भारतात १०० टक्के इथेनॉलवर चालणारी कार दाखल झाली आहे. ‘टोयोटो इनोव्हा हायक्रॉस’ असं या गाडीचं नाव आहे. ही जगातील पहिलीच इलेक्ट्रिफाईड फ्लेक्स फ्युएल (Electrified Flex fuel Car) कार आहे. BS6 स्टेज-२ मानांकनानुसार, याची निर्मिती करण्यात आली आहे. पर्यावरणासाठीही ही कार फायदेशीर ठरेल. ही लोकांसाठी स्वस्त कार आहे. आपण १६ लाख कोटी रुपयांचे जीवाश्म इंधन आयात करतो. त्यामुळे गरीबांना फायदा होईल.”

“तसेच देशातील पहिली हायड्रोजनवर चालणारी टोयोटा मिराई (Toyota Mirai) ही कार आणली आहे. ही पर्यावरणपूरक इंजिन असलेली कार आहे. ही कार त्यांच्या कलेक्शनमधील महत्त्वाची कार आहे. टोयोटाच्या मिराई कारमध्ये एक विशेष यंत्रणा बसवण्यात आली आहे. यात हायड्रोजन फ्यूल टँक आहे. यामधून हायड्रोजन बाहेर येऊन फ्यूल सेलमध्ये जातो. ऑक्सिजनच्या मदतीने केमिकल रिअॅक्शन होते, त्यानंतर वीज तयार होते. हायड्रोजन फ्युएल सेलच्या साहाय्याने निर्माण होणाऱ्या विजेमुळे यामधील मोटारीला पॉवर मिळते आणि मिराई कार धावू लागते. ग्रीन हायड्रोजन हा ऊर्जेचा स्वच्छ स्रोत आहे. ग्रीन हायड्रोजन तयार करण्यासाठी पाण्यातून हायड्रोजन आणि ऑक्सिजन वेगळे केले जातात. या प्रक्रियेत इलेक्ट्रोलायझरचा वापर केला जातो, ही कार धुराऐवजी फक्त पाणी सोडते, असे ते सांगतात.”

इथेनॉल हे स्वच्छ इंधन असल्यामुळे इथेनॉलवरच्या गाड्यांमुळे हवेतील प्रदूषणात मोठ्या प्रमाणात घट होईल. आणि अनेक नैसर्गिक उत्पादनातून जनतेचे हित साधले जाणार आहे. इथेनॉल हे पर्यावरणपूरक इंधन आहे. कार आणि इतर वाहनांमुळे होणारे वायू प्रदूषण रोखण्यासाठी भारतात बरेच प्रयत्न केले जात आहेत आणि त्यातील एक प्रयत्न म्हणजे हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या कार बाजारात आणणे. एक ते दीड वर्षांत अशा गाड्या उपलब्ध होतील, त्यामुळे दिल्लीतील प्रदूषणाला आळा घालण्यास खूप मोठी मदत होईल. येणारा काळ हा या वाहनांचा असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्वसामान्यांसाठीही हे इंधन किफायतशीर ठरेल आणि त्यामुळे प्रदूषणही होणार नाही, असेही त्यांनी नमुद केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.