देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी इंडियाने इंजिनमध्ये बिघाड झाल्याने १६ हजार कार परत मागवल्या आहेत. यामध्ये कंपनीच्या कारच्या दोन मॉडेल्सचा समावेश आहे आणि हे दोन्ही मॉडेल्स सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार आहेत. कंपनीने शुक्रवार, २२ मार्च रोजी जाहीर केले की ज्या ग्राहकांकडे ही मॉडेल्स असतील त्यांनी ती त्यांच्या जवळच्या सेवा केंद्रात नेऊन आवश्यक दुरुस्ती करून घ्यावी.

मारुतीने जारी केलेल्या घोषणेनुसार, बलेनो आणि वॅगन आर मॉडेलच्या कारमध्ये हा दोष आढळून आला आहे. या दोन मॉडेल्सच्या सुमारे १६ हजार कारच्या इंधन पंप मोटरमध्ये समस्या आहे. त्यामुळे गाडी सुरू करण्यात अडचणी येत आहेत. या गाड्यांचे इंजिन सुरू करण्यात अडचण येण्याबरोबरच या गाड्या चालतानाही थांबतात. त्यामुळे या गाड्यांच्या मालकांनी जवळच्या सेवा केंद्रात नेऊन उपकरणे बदलून घ्यावे, असे आवाहन कंपनीने केले आहे.

(हे ही वाचा: बाकी कंपन्या फक्त पाहतच राहिल्या; देशात ‘या’ बाईकची विक्री होतेय भरमसाठ, खरेदीसाठी शोरूम्समध्ये तुफान गर्दी)

कोणत्या मॉडेलच्या किती गाड्या आहेत?

मारुतीच्या म्हणण्यानुसार, ११,८५१ बलेनो कारमध्ये ही समस्या आली आहे, तर ४,१९० वॅगनआर कार या प्रकारच्या इंजिनच्या समस्येचा सामना करत आहेत. मारुतीने म्हटले आहे की, ज्या ग्राहकांच्या कारला ही समस्या येत आहे ते जवळच्या सेवा केंद्रात जाऊन उपकरणे मोफत बदलून घेऊ शकतात. यासाठी एक पैसाही देण्याची गरज नाही. या गाड्या ३० जुलै २०१९ ते १ नोव्हेंबर २०१९ दरम्यान तयार करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. या काळात तयार झालेल्या कारच्या इंजिनच्या इंधन पंप मोटरमध्ये बिघाड झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. यामुळे काही गाड्यांचे इंजिन सुरू होण्यात समस्या निर्माण होऊ शकतात.

गेल्या वर्षी ८८ हजार गाड्या परत मागवण्यात आल्या

दोषांमुळे मारुतीने आपल्या गाड्या परत मागवण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी जुलै २०२३ मध्ये ८७,५९९ कार परत मागवण्यात आल्या होत्या. यामध्ये S-Presso आणि Eeco सारख्या मॉडेलचा समावेश होता. ५ जुलै २०२१ ते १५ फेब्रुवारी २०२३ दरम्यान तयार करण्यात आलेल्या या गाड्यांच्या स्टीयरिंग रॉडमध्ये दोष असल्याचे कंपनीने म्हटले होते. मात्र, अलीकडच्या काळात मारुतीने सर्वाधिक गाड्या परत मागवल्या आहेत.