अदिती देवधर

सोमवार सकाळ.. घाईघाईनं शाळा-कॉलेज, ऑफिसला निघाले होते. सिग्नल हिरवा झाला. वाहनं वेगानं निघाली. उजवीकडे वळून पुलावरून जायला लागली आणि करकचून ब्रेक लागू लागले. पुढच्या चारचाकी, दुचाकी अचानक थांबल्या. पुढे काय झालंय ते मागच्यांना दिसत नव्हतं. सगळय़ांनाच घाई होती. आरडाओरडा सुरू झाला. पुढची वाहनं निघायची लक्षणं दिसेनात. उलट वाहनांमधून लोक बाहेर पडू लागले. दुचाकीवरून लोक उतरू लागले. सगळे जण कुठेतरी एकटक बघत होते. ते बघून मागच्या वाहनांतले लोकही ते काय बघत आहेत हे बघायला जाऊ लागले. इकडे चौकात सिग्नल परत हिरवा झाला, आणखी वाहने पुलावर येऊ लागली आणि काय, पुढे जायला जागाच कुठे होती? पुलाकडे वळण्यासाठी मोठी रांग लागली.
चौकात दोन पोलीस होते. पाच मिनिटांपूर्वी तर सगळं सुरळीत चालू होतं. अचानक काय झालं ते बघायला एकजण पुलाकडे गेला. बराच वेळ झाला तरी त्याचा पत्ता नाही म्हणून त्याचा सहकारीही तिकडे गेला.

एक मजेशीर दृश्य आता दिसू लागलं. एक मोठ्ठा घोळका पुलावर होता. सगळय़ात पुढे दोन पोलीस, मग सकाळी फिरायला निघालेले, जॉगिंग करणारे लोक, त्यांच्या मागे चारचाकी, दुचाकी, रिक्षा थांबलेल्या. त्यातले लोक शेजारी उभे होते. विविध वयाचे, पोशाखातले लोक होते. एक गोष्ट मात्र सारखी होती, ते सगळे कुठेतरी एकटक बघत होते. कारणही तसंच होतं.

पुलाजवळ नदीपात्रात अचानक मोठय़ा पाटय़ा आल्या होत्या. काल या पाटय़ा नक्की नव्हत्या, जो तो अगदी खात्रीपूर्वक सांगत होता. रात्रीत अचानक त्या आल्या होत्या. पाटय़ांचं असं अचानक येणं विचित्र होतंच. त्यावर जे लिहिलं होतं ते आणखी कोडय़ात टाकणारं होतं.
पाटीवर नळाचं चित्र होतं आणि त्याखाली ग्लासचं चित्र होतं. नदीमधून एक मोठा पाइप बाहेर आला होता- जो नळाला जोडला होता. नळातून पाणी ग्लासमध्ये पडत आहे असं दाखवलं होतं. म्हणजे नदीचं पाणी नळातून ग्लासमध्ये येत आहे असं दिसत होतं.
‘थोडय़ाच दिवसांत, तुमचं पाणी हे ‘असं’ असणार आहे’ असं पाटीवर लिहिलं होतं. बस्स एवढंच लिहिलं होतं. काही तपशील नाही, काही स्पष्टीकरण नाही. लोकांनी पुलावरून डोकावून नदीकडे नजर टाकली. काठावर हिरवेगार वृक्ष, झुडपं आणि त्यातून वाहणारं निळं पाणी. नदीत सूर मारून मासे पकडणारे पक्षी. पुलाच्या कमानींचं प्रतििबब नदीत दिसत आहे. अशीच नदी आपण चित्रात बघतो ना? पण ती जुनी गोष्ट झाली.
आत्ता लोकांना दिसलं ते काळंकुट्ट, गढूळ पाणी. काठावर कचऱ्याचे ढीग. काठावर जास्ती कचरा आहे की नदीत असं वाटावं इतका कचरा नदीत होता. बहुतांश प्लास्टिक होते- बाटल्या, पिशव्या, तुटके डबे, चमचे, ताटल्या, जुने कपडे, तुटक्या चपला आणि बरंच काही. सूर मारणारे पक्षी कधीच गायब झाले होते. आता होते ते कचरा खाणारे कावळे, घारी आणि वंचक.

काय प्रकार आहे? अर्थ काय त्या पाटीचा? नदीतलं प्रदूषित पाणी आपल्याला मिळणार आहे म्हणजे काय? घोळक्याच्या पुढे उभ्या असलेल्या पोलिसांवर सगळय़ांनी प्रश्नांचा भडिमार केला. त्यांनाही काही माहीत नव्हतं.
लोकांनी पाटीचे फोटो काढून फेसबुक हॉट्सअॅपवर टाकायला सुरुवात केली तर काय आश्चर्य!!! शहरातल्या इतर पुलांवरचेही असेच फोटो तेथे येत होते. या एकाच पुलावर नाही तर शहरातल्या इतर पुलांवरही अशीच पाटी होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे चाललंय काय?
aditideodhar2017@gmail.com