• मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर राजकीय समीकरणे बदलली
  • सेनेला पाठिंबा; कोणत्याही समितीचे अध्यक्षपद घेणार नाही
  • मुंबईसाठी उपलोकायुक्तांची नेमणूककरणार : मुख्यमंत्री

मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या तोडीसतोड नगरसेवक निवडून आणणाऱ्या भाजपने महापौरपदाची निवडणूक लढविली जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  जाहीर करून साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. महापालिकेच्या पारदर्शक कारभाराचे पहारेकरी म्हणून भाजपचे नगरसेवक काम करतील, असे सांगत पालिकेच्या कारभाराचा रिमोट कंट्रोल भाजपच्या हाती राहिल, असे संकेतही मुख्यमंत्र्यांनी दिले.

भाजपने मुंबई महापालिकेची निवडणूक पारदर्शकतेच्या मुद्यावर लढविली आहे, त्यावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. पारदर्शक कारभार कसा करता येईल, त्यासंबंधीचे महानगरपालिकेचे कायदे व नियम यांचा अभ्यास करुन शासनाला शिफारस करण्यासाठी रामनाथ झा, गौतम चटर्जी व शरद काळे या माजी सनदी अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात येणार आहे. समितीने तीन महिन्यात अहवाल द्यायचा आहे. त्यावर राज्य सरकार निर्णय घेईल, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. त्याचबरोबर मुंबईसाठी स्वतंत्र उपलोकआयुक्त नेमण्याची घोषणा त्यांनी या वेळी केली. तशी विनंती लोकायुक्तांना करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. शिवसेनेला महापौरपदाची संधी देतानाच पालिकेच्या कारभारावर अंकुश ठेवण्याची खेळी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

तिजोरीच्या चाव्या असलेल्या स्थायी समितीसह  बेस्ट, सुधार, शिक्षण यांसारख्या समित्यांच्या अध्यक्षपदांच्या निवडणुकाही भाजप लढणार नाही, असेही फडणवीस यांनी जाहीर केले.  शनिवारी   महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक झाल्यास, भाजपचे फक्त शिवसेनेलात समर्थन राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले

मुंबई महापालिका निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. मात्र शिवसेनेचे ८४ व भाजपचे ८२ नगरसेवक निवडून आले आहेत. दोन पक्षांमध्ये केवळ दोनच नगरसेवकांचा फरक असल्याने महापौर कुणाचा, अशी गेली आठ दिवस चर्चा रंगली होती. त्यासाठी वेगवेगळे राजकीय अंदाज बांधले जात होते. परंतु महापौर निवडणुकीतून माघार घेऊन भाजपने राजकीय तर्कवितर्काना पूर्णविराम दिला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत भाजपच्या गाभा समितीची बैठक झाली. त्यात मुंबई महापालिकेतील सत्ता स्थापनेबाबतचे डावपेच ठरले. आज सायंकाळी वर्षां निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी भाजपची भूमिका जाहीर केली. या वेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष अ‍ॅड. अशिष शेलार उपस्थित होते.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जनतेने भाजपच्या बाजुने कौल दिला आहे. मुंबईत पक्षाने पारदर्शकतेच्या मुद्यावर निवडणुका लढल्या आणि अभूतपूर्व यश मिळाले. मात्र आताच्या परिस्थितीत सत्तेसाठी अन्य पक्षांची मदत घेऊन लढणे-िजकणे हे मान्य नाही. त्यामुळे मुंबईच्या महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक लढवायची नाही, असा भाजपने निर्णय घेतल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक लढवायची नाही, असा निर्णय घेतला असला तरी, भाजप विरोधी पक्षाच्या भूमिकेतही राहणार नाही. महापौरपदाची वा अन्य समितींच्या अध्यक्षपदांच्या निवडणुकीत भाजप शिवसेनेशिवाय कुणालाच समर्थन देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. महापालिकेत जनतेच्या हिताचे निर्णय होतील, त्यालाही भाजपचा पाठिंबा राहील, असे त्यांनी सांगितले.

महापालिकेत जनतेच्या हिताचे निर्णय होतील, त्यालाही भाजपचा पाठिंबा राहील, मात्र महापालिकेत आमच्या पाठिंब्याशिवाय कोणताही निर्णय होणार नाही.  – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री