राष्ट्रवादी काँग्रेसचा अभेद्य गड असलेल्या सोलापूर जिल्ह्य़ात गेल्या सात-आठ वर्षांत पक्षात प्रचंड बेदिली असून सर्वत्रच सवतासुभा निर्माण झाला आहे. संपूर्ण जिल्ह्य़ात या पक्षात एकसूत्रीपणा राहिला नाही. जिल्हा परिषदेपासून ते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेपर्यंत सर्वच सत्तास्थाने विस्कळीत झाली आहेत. पक्ष एकसंध कसा राहील, याचे सोयरसुतक नसून सत्तास्थाने कायम ठेवण्याचीच जास्त चिंता राष्ट्रवादीला लागली आहे. यात खास करून या जिल्ह्य़ाच्या प्रभारीपदाची जबाबदारी स्वत:कडे घेतलेले अजित पवार यांची खऱ्या अर्थाने कसोटी ठरणार आहे.
जिल्हा परिषद व तालुका पंचायत समित्यांच्या निवडणुका सोलापुरातील राष्ट्रवादीचे भवितव्य ठरविणाऱ्या असताना त्यासमोर उभे ठाकलेले आव्हान हे भाजप किंवा शिवसेनेचे नसून तर राष्ट्रवादीअंतर्गत गटबाजीचे आहे. भाजप पुरस्कृत तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे वर्चस्व संपविण्याचा घाट घातला जात आहे. जिल्ह्य़ात भाजपचे दोन मंत्री व एक खासदार असतानादेखील जिल्हा परिषदेत सत्ता प्रस्थापित करण्याइतपत भाजपची ताकद दिसत नाही. त्यासाठी राष्ट्रवादीअंतर्गत दुहीचा पुरेपूर लाभ उठविण्याचा प्रयत्न भाजपकडून होताना दिसून येतो. राष्ट्रवादीला सत्ता खेचण्यासाठी पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादीचे अजितनिष्ठ संजय शिंदे व विधान परिषदेचे अपक्ष आमदार प्रशांत परिचारक आदींनी डावपेच आखायला सुरुवात केली आहे. यात विशेषत: शिंदे व परिचारक यांचे ‘लक्ष्य’ संपूर्ण राष्ट्रवादी नाही, तर अकलूजचे मोहिते-पाटील यांची कोंडी करण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे.
धैर्यशील मोहिते विरुद्ध संजय शिंदे
या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही पक्षाची मोट बांधण्याच्या हालचाली करताना मोहिते-पाटील याच्याशी आपले कोणतेही मतभेद नाहीत, असा निर्वाळा देत आहेत. तर खासदार विजयसिंह मोहिते-पाटील हे सावध पवित्रा घेत पवार यांच्यापासून अद्यापि चार हात दूर राहणेच पसंत करीत असले तरी दुसरीकडे मोहिते-पाटील यांचे पुतणे असलेले जिल्हा परिषदेचे सभागृह नेते धैर्यशील मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरून आपले विरोधक संजय शिंदे यांना खुले आव्हानच दिले आहे. मोहिते-पाटील व शिंदे यांच्यात चाललेला कलगीतुरा रंगला आहे. त्यास आता वैयक्तिक स्वरूप आले आहे. संजय शिंदे हे माढय़ाचे राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांचे बंधू आहेत. २००९ नंतरच्या पाच वर्षांत जिल्हा परिषदेची सूत्रे मोहिते-पाटील यांच्या हातातून गेल्यानंतर तत्कालीन अजितनिष्ठ संजय शिंदे हेच जिल्हा परिषदेची सूत्रे सांभाळत होते, परंतु नंतर आमदारकीचे स्वप्न पाहात शिंदे यांनी अलीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा झेंडा हाती घेतला असला तरी अद्यापि त्यांचा शत्रू क्रमांक अजित पवार हे नसून मोहिते-पाटील हेच असल्याचे स्पष्ट होते. धैर्यशील मोहिते-पाटील हे शिंदे यांना खुले आव्हान दिले असताना त्यांच्यात होत असलेल्या संघर्षांत मोहिते-पाटील यांच्या बाजूने राष्ट्रवादीचा अन्य एकही नेता पुढे येत नाही. बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांच्यापासून ते माढय़ाचे आमदार बबनराव शिंदे यांच्यापर्यंत राष्ट्रवादीचे सारेच जण कसे चिडीचूप आहेत. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व तत्कालीन आमदार दीपक साळुंखे यांचा गेल्या वर्षी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुती पुरस्कृत अपक्ष प्रशांत परिचारक यांनी धक्कादायक पराभव केला होता. त्या वेळी परिचारक यांच्या विजयाचे शिल्पकार अर्थात संजय शिंदे हेच ठरले होते. ज्यांनी आपला पराभव घडवून आणला, ते संजय शिंदे यांच्या विरोधात दीपक साळुंखे हे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष या नात्यानेही चकार शब्द काढत नाहीत. गेली अडीच वर्षे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद साळुंखे यांच्या भगिनी जयमाला गायकवाड यांच्याकडे असल्याने कदाचित भगिनींना उपद्रव होऊ नये, यासाठी साळुंखे यांची संजय शिंदे व परिचारक यांच्या विरोधात उघडपणे भूमिका घेण्याची मानसिकता दिसत नाही. म्हणजेच मोहिते-पाटील हे विरोधकांचा समाचार घेत असताना त्यांच्या मदतीला धावून न जाता बघ्याची भूमिका घेण्यात राष्ट्रवादीची इतर मंडळी धन्यता मानत असतील तर ‘वरून एकी आणि आतून बेकी’ असेच राजकीय वर्तुळात मानले जात आहे.
तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न
राष्ट्रवादीच्या विरोधात संजय शिंदे व आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह बार्शीचे शिवसेनेचे माजी आमदार राजेंद्र राऊत, माळशिरसचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते उत्तम जानकर, सांगोल्यातील शिवसेनेचे माजी आमदार शहाजी पाटील, मंगळवेढय़ाचे समाधान अवताडे आदींनी तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेत परिवर्तन घडविण्याचे मनसुबे रचले आहेत.
या सर्वानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असता या सर्वाना फडणवीस यांनी आघाडीऐवजी थेट भाजपच्या चिन्हावर निवडणुका लढविण्याची सूचना केली. परंतु त्यानुसार भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणुका लढल्यास राष्ट्रवादीतील छुपे सहकार्य मिळू शकणार नाही. काँग्रेसचीही काही नेते मंडळी सत्ता मिळण्यासाठी मदतीचा हात पुढे करू शकणार नाहीत, अशा अडचणी संजय शिंदे व प्रशांत परिचारक यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या आहेत. मागील विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडे मतांची संख्या प्रचंड मोठी असूनही केवळ पक्षातील बेदिलीचा लाभ मिळविता आला, तद्वत आता जिल्हा परिषदेतही हेच गणित यशस्वी करता येईल, असा विश्वास शिंदे व परिचारक प्रभृतींना वाटत आहे. अर्थात, याकामी राष्ट्रवादीतील बेदिलीवरच त्यांचा डोळा दिसून येतो.
अलीकडे झालेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये या जिल्ह्य़ात भाजप व सेनेला चांगले यश मिळाले. त्यामुळे त्यांचे मनोबल वाढले असले तरी प्राप्त परिस्थितीत या भाजपला स्वबळावर सत्ता काबीज करणे कठीण वाटते. त्यासाठी भाजपची संपूर्ण मदार राष्ट्रवादीतील संभाव्य फुटीवर आहे. त्यासाठी तिसऱ्या आघाडीचा प्रयोग झाला तर राष्ट्रवादीसमोर सत्ता राखण्यापेक्षा अगोदर पक्षाचे अस्तित्व कायम ठेवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. मोहोळजवळील अनगर येथे अजित पवार यांनी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासह पक्षाच्या सर्व नेत्यांची एकत्रित बैठक घेतली खरी; परंतु त्यातून अंतर्गत वाद निकाली कसा निघणार हा प्रश्न आहे.