ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात घाटकोपर, विक्रोळी, भांडूप, मुलुंड अशा भागात भाजप शिवसेनेचे बहुतेक सर्व भागात वर्चस्व आहे… मग ते आमदार असो किंवा नगरसेवक. या ठिकाणी होणाऱ्या विधानसभा आणि पालिका निवडणुकीत गेल्या १० वर्षात शिवसेना विरुद्ध भाजपा असाच संघर्ष बघायला मिळाला आहे. एवढंच नाही तर अनेकदा निवडणुका नसतांना जे राजकीय सुरु असतं ते प्रामुख्याने या दोन पक्षात. काही काळ काही भागात मनसेचे अस्तित्व या भागात होतं खरं, मात्र ते आता पुर्णपणे लयास गेलं आहे. हा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात येण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय दिना पाटील हे दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. त्यावेळे पर्यंत या भागात राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद दिसली होती. २०१४ च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर संजय दिना पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यावर राष्ट्रवादीचे अस्तित्व पुसले गेले.

असं असतांना याच लोकसभा मतदारसंघात सर्वात पूर्व बाजूला असलेल्या मानखुर्द-शिवाजीनगर या विधानसभा मतदारसंघात शिवसेना भाजपाचे अस्तित्व काही वॉर्ड पुरते आहे तर उर्वरित सर्व वॉर्डमध्ये ठिकाणी समादवादी पार्टी, काही प्रमाणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व आहे. या सर्व भागात मराठी भाषिक मतदार हा एकतर विखुरललेला तर काही भागापूरता मर्यादीत आहे. तर उर्वरित सर्व भागात मुस्लिम समाज आणि उत्तर भारतीय समाज हा प्रामुख्याने आहे. बहुसंख्या लोकसंख्या ही झोपडपट्टी आणि बैठ्या चाळींमध्ये रहाते. देवनार, शिवाजीनगर आणि मानखुर्दचा परिसर अशी मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाची व्याप्ती आहे. या भागात वॉर्डमधील लढती या प्रामुख्याने समाजवादी पार्टी आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्येच होणे अपेक्षित आहे. मराठी भाषिकांचे वर्चस्व असलेल्या भागात शिवसेना-भाजप आणि आता त्यात शिंदे गट अशी लढत असेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्याच्या बदललेल्या राजकीय परिस्थिती शिवसेना आणि भाजपाने त्यांचे वॉर्ड राखण्यात यश मिळवलं तरी ते पुरेसं आहे अशी परिस्थिती आहे. उलट काँग्रेस खास करुन समाजवादी पार्टीला हातपाय पसरवण्याची अनुकुल परिस्थिती आहे. तेव्हा पालिका निवडणुकीत या भागात कोणत्या पक्षाचा किती निभाव लागतो , वाढतो याची उत्सुकता असेल.