PM Narendra Modi on Budget 2025 : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवार, ३१ जानेवारीला सुरू होत असून शनिवारी (१ फेब्रुवारी) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेमध्ये सकाळी ११ वाजता २०२५-२६चा अर्थसंकल्प सादर करणार आहे. आज अधिवेशनाला सुरुवात होण्याआधी पंतप्रधान नरेंद मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधून अर्थसंकल्पात २०४७ चं उद्दीष्ट्य ठेवण्यात आल्याचं सांगितलं. तसंच, या अर्थसंकल्पात अनेक विधेयकांवर चर्चा होणार असून यातून महिला वर्ग आणि तरुण पिढीला फायदा होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महालक्ष्मी नमोस्तुते मंत्र पठण केले. “सिद्धि बुद्धि प्रदे देवी भक्ति मुक्ति प्रदायनी | मंत्र मुर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते || असं म्हणत त्यांनी, महालक्ष्मी आम्हाला सिद्धी, विवेक देते. समृद्धी आणि कल्याणही देते. मी महालक्ष्मीकडे प्रार्थना करतो की देशातील प्रत्येक गरीब, मध्यमवर्ग समाजावर महालक्ष्मीची विशेष कृपा राहुदेत”, अशी प्रार्थना मोदींनी केली.

२०४७ पर्यंत आपण विकसित भारत होऊ

“भारताने ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला. हे प्रत्येक देशवासियांसाठी सर्वाधिक गौरवपूर्ण आहे आणि जगातील लोकशाहीच्या देशांमध्ये भारताचे हे सामर्थ्य आपलं एक विशेष स्थान निर्माण करतो. देशातील जनतेने आम्हाला तिसऱ्यांदा हे दायित्व दिलं आहे. या तिसऱ्या कार्यकाळातील हे पहिलं पूर्ण बजेट आहे. मी विश्वासाने सांगू शकतो की २०४७ मध्ये आपण स्वातंत्र्याची १०० पूर्ण करू, विकसित भारताचा संकल्प या देशाने स्वीकारला आहे. हा अर्थसंकल्प एक नवा विश्वास निर्माण करेल. नवीन ऊर्जा देईल की देश १०० वर्षे साजरे करेल तेव्हा विकसित झालेला असेल. १४० कोटी देशवासिय आपल्या सामूहिक प्रयत्नांनी या संकल्पाला पूर्ण करतील”,असा विश्वासही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

इनोव्हेशन, इन्क्लुजन, इन्व्हेस्टमेंट त्रिसुत्री

“तिसऱ्या टर्ममध्ये आम्ही मिशन मोडमध्ये देशाला सर्वांगिण विकासाच्या दिशेने घेऊन जात आहोत. यामध्ये भौगोलिक, सामाजिक किंवा आर्थिक भिन्न स्तरावरील सर्वांगिण विकासाच्या संकल्पावरून मिशन मोडमधून पुढे जात आहोत. इनोव्हेशन, इन्क्लुजन, इन्व्हेस्टमेंट या सातत्याने आमच्या आर्थिक गतीसाठी आधार राहिले आहेत. या सत्रात नेहमीप्रमाणे काही ऐतिहासिक विधेयकावर चर्चा होईल. व्यापक मंथनासोबत राष्ट्राची ताकद वाढवणारे कायदे बनतील. नारी शक्तीच्या गौरवाला पुनर्प्रस्थापित करणारे, प्रत्येक महिलेला समान अधिकार देणारे निर्णय या अधिवेशनात घेतले जातील”, असं मोदी म्हणाले.

“रिफॉर्म, परफॉर्मन्स, ट्रान्सफर ही त्रिसुत्री स्वीकारण्यात आली आहे. विकास प्राप्त होत असतो, तेव्हा सर्वांत जास्त लक्ष रिफॉर्मवर असतं. राज्य आणि केंद्र सरकार परफॉर्म करत असतो आणि जन सहभागातून आपण ट्रान्सफॉर्मेशन पाहू शकतो”, अशी त्रिसुत्रीही मोदींनी विषद केली.

“२०-२५ वर्षाचे तरुण जेव्हा ४५-५० वर्षांचे होतील, तेव्हा ते विकसित भारताचे सर्वांत मोठे लाभार्थी असतील. जे लोक १९४२ मध्ये स्वातंत्र्यलढ्यात होते, संपूर्ण युवा पिढी सहभागी होती. त्याचे फळ २५ वर्षांनी जी पिढी आली त्यांच्या नशिबी आली. या बेजटमध्ये सर्व खासदार विकसित भारताला मजबुती देण्याकरता त्यांचे योगदान देतील. तरुण खासदारांसाठी हा सुवर्णक्षण आहे, ते आज संसदेत जितकी जागृकता आणि सहभाग नोंदवतील त्यांना विकसित भारताचे फळ पाहायला मिळणार आहे. तरुण खासदारांसाठी अनमोल क्षण आहे. मी आशा करतो की देशाची आशा, आकांक्षांना खरे उतरू”, असं आवाहनही त्यांनी खासदारांना केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.