नवी दिल्ली, २४ मार्च (पीटीआय): दूरसंचार क्षेत्रातील आघाडीची भारती एअरटेलची उपकंपनी भारती हेक्साकॉमची प्रारंभिक समभाग विक्री येत्या ३ एप्रिलपासून सुरू होणार आहे. पुढील तीन दिवस म्हणजे ५ एप्रिलपर्यंत आयपीओसाठी अर्ज करता येईल. यासाठी कंपनीने ५४२ रुपये ते ५७० रुपयांचा किंमतपट्टा निश्चित केला आहे. नवीन आर्थिक वर्षात (२०२४-२५) मुख्य बाजारमंचाच्या माध्यमातून बाजारात पदार्पण करणारी भारती हेक्साकॉम पहिली कंपनी असेल.

विद्यमान भागधारक टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया आयपीओच्या माध्यमातून ७.५ कोटी समभागांची विक्री करणार आहे. आंशिक समभाग विक्रीचे आकारमान नियोजित १० कोटी समभागांवरून ७.५ कोटी समभागांपर्यंत खाली आणले आहे. आंशिक समभाग विक्रीच्या माध्यमातून विद्यमान भागधारक समभाग विक्री करणार असल्याने आयपीओच्या माध्यमातून कंपनीला कोणताही निधी प्राप्त होणार नाही. सध्या मुख्य प्रवर्तक भारती एअरटेलकडे ७० टक्के हिस्सेदारी आहे आणि उर्वरित ३० टक्के भागभांडवल सरकारी कंपनी टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेडकडे आहे. गुंतवणूकदारांना किमान २६ समभाग आणि त्यापटीत आयपीओसाठी अर्ज करता येईल.

हेही वाचा >>>गिग’ कामगारांसाठी आता ई-लुना, कायनेटिक ग्रीन कंपनीचे पाऊल; १३० दुचाकींचे वितरण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारती हेक्साकॉम मुख्यत: राजस्थान आणि ईशान्य दूरसंचार मंडळांमधील ग्राहकांना मोबाइल सेवा, फिक्स्ड-लाइन टेलिफोन आणि ब्रॉडबँड सेवा पुरवते.कंपनीने आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ५४९.२ कोटी रुपयांच्या निव्वळ नफा मिळवला होता. त्याआधीच्या वर्षात कंपनीने १,९५१.१ कोटी रुपयां नफा नोंदवला होता. कंपनीचे समभाग राष्ट्रीय शेअर बाजार आणि मुंबई शेअर बाजारात सूचिबद्ध केले जाणार आहेत.