वृत्तसंस्था, नवी दिल्ली

वाढती महागाई आणि त्या परिणामी मध्यवर्ती बँकांनी व्याजदर वाढ वाढविल्याने एकंदर जगभरातील भांडवली बाजारांमध्ये अस्थिरता आली आहे. त्या परिणामी भांडवली बाजारात सूचिबद्ध असलेल्या मोठ्या भारतीय कंपन्यांच्या प्रवर्तकांनी कर्जाच्या बदल्यात बँका व वित्तसंस्थांकडे गहाण ठेवलेल्या समभागांमध्ये डिसेंबरच्या तिमाहीत वाढ केली आहे.

कोटक इन्स्टिट्युशनल इक्विटीजने केलेल्या अभ्यासानुसार, बीएसई ५०० निर्देशांकात समाविष्ट असलेल्या आघाडीच्या कंपन्यांनी तारण ठेवलेल्या समभागांची टक्केवारी डिसेंबर तिमाहीत प्रवर्तकांच्या मालकीच्या समभाग टक्केवारीच्या १.६१ टक्क्यांपर्यंत वाढली आहे, जी मागील तिमाहीत १.५७ टक्के राहिली होती. बीएसई ५०० मधील ८७ कंपन्यांनी डिसेंबर तिमाहीत त्यांच्या प्रवर्तकांनी त्यांच्याकडील काही समभाग ताबेगहाण ठेवल्याचेही अहवालात म्हटले आहे. डिसेंबर तिमाहीत प्रवर्तकांनी तारण ठेवलेल्या समभागांचे एकूण मूल्य २.२ लाख कोटी रुपयांच्या घरात आहे. जे बीएसई ५०० निर्देशांकाच्या एकूण बाजार भांडवलाच्या अंदाजे ०.८३ टक्के आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सरलेल्या डिसेंबरच्या अखेरीस, मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेस आणि थायरोकेअर टेक्नॉलॉजीच्या प्रवर्तकांनी सर्वाधिक समभाग तारण ठेवले आहेत. त्यांच्या तारण ठेवींचे एकूण मूल्य सुमारे ४,६५० कोटी रुपये आहे. अहवालानुसार, मदरसन सुमी वायरिंग, दीपक फर्टिलायझर्स, जीएमआर एअरपोर्ट, ग्रॅन्युल्स इंडिया आणि ३६० वनमधील प्रवर्तकांच्या तारण समभागांमध्ये सर्वाधिक घट झाली आहे.