मुंबई : सरलेल्या फेब्रुवारी महिन्यात रोजगाराच्या संधीमध्ये वाढ झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात ४१ टक्क्यांची वाढ झाली आहे, असे टॅलेंट मंच असलेल्या ‘फाउंडइट’च्या अहवालात म्हटले आहे.

फाउंडइटच्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारीमध्ये महाविद्यालयातून नुकतीच पदवी प्राप्त केलेल्या फ्रेशर्सच्या भरतीत वार्षिक तुलनेत २६ टक्क्यांनी वाढ झाली, जी तरुणांसाठी नियोक्त्यांकडून नवपदवीधरांना सेवेत घेण्याच्या वाढत्या कलाचे प्रतिबिंब आहे. नोकरी बाजाराने स्थिर वाढ राखल्यामुळे फेब्रुवारी २०२५ मध्ये भरतीत ४१ टक्के वाढ झाली आहे.

माहिती तंत्रज्ञान अर्थात आयटी – हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर कंपन्यांनी फ्रेशर्सच्या भरतीत आघाडी घेतली आहे. वर्ष २०२४ मधील १७ टक्क्यांवरून २०२५ मध्ये त्यांचा वाटा जवळजवळ दुप्पट झाला आहे. कौशल्यधारित उमेदवारांच्या भरतीकडेही वाढता कल दिसत असून, नियोक्ते व्यावहारिक कौशल्य आणि उद्योगाशी संबंधित कौशल्ये असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देत आहेत, असे फाउंडइटचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. सुरेश म्हणाले. विविध क्षेत्रांमध्ये नवीन प्रतिभेची वाढती मागणी अधोरेखित झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, बँका, विमा, वित्तीय सेवा क्षेत्र आणि बीपीओ/आयटीईएस सारख्या क्षेत्रांमध्ये नवीन भरतीमध्ये घट झाली आहे. प्रमुख महानगरांव्यतिरिक्त, नाशिक, जयपूर, सुरत, कोईम्बतूर, इंदूर, कोची, ठाणे, वडोदरा, चंडीगड आणि नागपूर या सारखी द्वितीय श्रेणी शहरे देखील नवीन नोकरीच्या संधींची प्रमुख ठिकाणे म्हणून उदयास येत आहेत, असे अहवालाने नमूद केले आहे.