नवी दिल्ली : देशाच्या निर्मिती क्षेत्राने सरलेल्या एप्रिल महिन्यात सक्रियता दर्शवत दमदार झेप घेतल्याचे मासिक सर्वेक्षणातून शुक्रवारी पुढे आले. मागणीतील तेजीमुळे उत्पादनात झालेली वाढ, नवीन कार्यादेश आणि नवीन कामाचा ओघ याच्या जोरावर निर्मिती क्षेत्राचा ‘पीएमआय’ निर्देशांक सरलेल्या एप्रिलमध्ये १० महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, असे एका मासिक सर्वेक्षणात म्हटले आहे.
देशातील निर्मिती क्षेत्राचा प्रवास नोंदविणाऱ्या ‘एचएसबीसी इंडिया’द्वारे, निर्मिती क्षेत्रातील खरेदी व्यवस्थापकांचा कल जोखणाऱ्या सर्वेक्षणावर आधारित (पीएमआय) निर्देशांक एप्रिल महिन्यासाठी ५८.२ अंशांवर पोहोचला आहे. त्याआधीच्या महिन्यात म्हणजेच मार्चमध्ये तो ५८.१ असा नोंदला गेला होता.
जून २०२४ नंतर उत्पादनात सरलेल्या एप्रिल महिन्यात सर्वात जलद गतीने वाढ झाली आहे. निर्मिती क्षेत्राच्या एक महत्त्वाचा घटक म्हणजे नवीन व्यवसायात झालेली तीव्र वाढ आहे. तसेच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील वाढत्या मागणीने उद्योगांचा आत्मविश्वास वाढला आहे. सर्वेक्षणानुसार, आंतरराष्ट्रीय कार्यादेशात जलद गतीने वाढ झाली आहे. २०२५-२६ आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला परदेशातून येणाऱ्या नवीनकार्यादेशात १४ वर्षांहून अधिक काळातील सर्वाधिक वाढ नोंदवली गेली. मुख्यतः आफ्रिका, आशिया, युरोप आणि अमेरिका या देशांकडून नवीन निर्यात कार्यादेशांमध्ये जोरदार वाढ झाली आहे, असे एचएसबीसीच्या मुख्य अर्थतज्ज्ञ प्रांजुल भंडारी म्हणाल्या.
आगामी काळाबाबत आशावाद
वाढत्या उत्पादन गरजा पूर्ण करण्यासाठी उत्पादकांनी एप्रिलमध्ये त्यांच्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली आहे. सर्वेक्षणातील सहभागींपैकी ९ टक्के व्यवसायांनी अतिरिक्त कामगार घेतले असून त्यात कायमस्वरूपी आणि तात्पुरत्या करारावर घेतलेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. नवीन व्यवसाय वाढीसोबतच खरेदी क्रियाकलाप वाढल्याने निर्मिती क्षेत्रातील वाढ दहा महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली. सुटे भाग आणि कच्च्या मालाच्या किमती किंचित वाढल्या आहेत. मात्र उत्पादन किमतींमध्ये झालेल्या जलद वाढीमुळे नफ्यावर होणारा परिणाम अंशतः भरून काढता येईल. मागणी मजबूत राहण्याच्या अपेक्षेमुळे येत्या वर्षात उत्पादनाच्या शक्यतांबद्दलचा दृढ आशावाद एप्रिलच्या आकडेवारीतून स्पष्ट झाला आहे. विपणन आणि विक्रीसाठी प्रयत्न, कार्यक्षमता वाढ आणि नवीन ग्राहकांच्या चौकशीने देखील सकारात्मक अंदाजांना आधार दिला आहे.
एप्रिलमध्ये नवीन निर्यात कार्यादेशात लक्षणीय वाढ झाल्यामुळे भारत जागतिक पटलावर मुख्य निर्मिती केंद्र म्हणून उदयास येत आहे. तसेच अमेरिकेच्या व्यापारशुल्क धोरणांचा फारसा परिणाम होण्याची शक्यता कमी आहे. कारण अनेक व्यावसायिक नवीन बदलांशी जुळवून घेत आहेत.
-प्रांजुल भंडारी, मुख्य अर्थतज्ज्ञ एचएसबीसी