गुजरात आणि आसाममध्ये १.२६ लाख कोटी रुपयांच्या अंदाजे गुंतवणुकीसह तीन सेमीकंडक्टर प्लांट उभारण्याच्या प्रस्तावांना मोदी सरकारने गुरुवारी मंजुरी दिली. येत्या १०० दिवसांत तिन्ही प्रकल्पांचे बांधकाम सुरू होणार आहे. याअंतर्गत टाटा समूह २ प्लांट उभारणार आहे, तर एक प्लांट जपान आणि थायलंडच्या कंपन्या संयुक्तपणे उभारणार आहेत. तीन प्लांटच्या उभारणीमुळे देश सेमीकंडक्टर उत्पादनाच्या क्षेत्रात महत्त्वाच्या दिशेने वाटचाल करणार आहे. भारताला सेमीकंडक्टरचे मोठे उत्पादन केंद्र बनायचे आहे. देशातील विविध सरकारांनी प्रयत्न केले पण ते प्रभावी होऊ शकले नाहीत. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली हे शक्य झाले आहे, असंही केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणालेत.

इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले की, भारताने गेल्या दोन वर्षांत सेमीकंडक्टर क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. या कालावधीत सरकारला जागतिक चिप उत्पादकांकडून २.५० लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.

हेही वाचाः बायजू’च्या ताळेबंदांची आता सरकारकडून तपासणी; कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या आदेशानंतर संकटग्रस्त कंपनीसमोरील अडचणीत भर

योजना काय आहे?

केंद्रीय मंत्रिमंडळाने सेमीकंडक्टर प्रस्तावांना मंजुरी दिल्यानंतर दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, तिन्ही प्लांटचे बांधकाम येत्या १०० दिवसांत सुरू होणार आहे. Tata Electronics Pvt Ltd तैवानच्या Powerchip Semiconductor Manufacturing Corp (PSMC) च्या भागीदारीत सेमीकंडक्टर प्लांटची स्थापना करेल. या प्लांटची स्थापना गुजरातमधील ढोलेरा येथे होणार असून, यामध्ये ९१,००० कोटी रुपयांची गुंतवणूक असणार आहे.

हेही वाचाः ‘फिनेटक’च्या नियामक चौकटीचा पुनर्विचार आवश्यक; नियमावलीची जाचकता कमी करण्याचीही तज्ज्ञांची मागणी

टाटा सेमीकंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट प्रायव्हेट लिमिटेड २७ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह आसाममधील मोरीगाव येथे सेमीकंडक्टर प्लांटची स्थापना करणार आहे. तसेच सीजी पॉवर जपानच्या रेनेसास इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन आणि थायलंडच्या स्टार्स मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स यांच्या सहकार्याने गुजरातमध्ये सेमीकंडक्टर प्लांटची स्थापना करेल. गुजरातमधील साणंद येथे हा सेमीकंडक्टर प्लांट उभारण्यात येणार असून, साणंद प्लांटमध्ये ७६०० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. या प्लांटमधून २० हजार प्रत्यक्ष रोजगार आणि सुमारे ६० हजार अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत.