पीटीआय, नवी दिल्ली

अडचणीत सापडलेल्या पेटीएम पेमेंट्स बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुरिंदर चावला यांनी राजीनामा दिला आहे, अशी माहिती बँकेने मंगळवारी भांडवली बाजाराला दिली. देशाच्या डिजिटल वित्तीय व्यवहारांच्या क्षेत्रातील अग्रणी ‘पेटीएम’च्या व्यवहारांवर प्रक्रिया करणाऱ्या ‘पेटीएम पेमेंट्स बँके’वर जानेवारी महिन्यात रिझर्व्ह बँकेने कारवाईचा बडगा उगारला होता. बँकेला प्रतिबंधात्मक कारवाईचा सामना करावा लागत असतानाच चावला यांच्या राजीनाम्याने बॅंकेसमोरील आव्हान वाढले आहे.

सुरिंदर चावला यांनी ८ एप्रिल २०२४ रोजी वैयक्तिक कारणांमुळे आणि नोकरीच्या अधिक चांगल्या संधी शोधण्यासाठी राजीनामा दिला असल्याचे मनुंद केले आहे. विद्यमान वर्षात २६ जून २०२४ रोजी ते पेटीएम पेमेंट्स बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी पदाच्या कार्यभारातून मुक्त होतील. गेल्यावर्षी म्हणजेच जानेवारी २०२३ मध्ये चावला पेटीएम पेमेंट्स बँकेत रुजू झाले होते.

हेही वाचा >>>‘बैजूज’च्या कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन मार्गी

गेल्या महिन्यात प्रवर्तक विजय शेखर शर्मा यांनी देखील पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडचे अर्धवेळ बिगर कार्यकारी अध्यक्षपद सोडले आणि बँकेच्या मंडळाची पुनर्रचना करण्यात आली होती. त्यांनतर सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष श्रीनिवासन श्रीधर, बँक ऑफ बडोदाचे माजी कार्यकारी संचालक अशोक कुमार गर्ग आणि दोन सेवानिवृत्त भारतीय प्रशासकीय सेवा अधिकाऱ्यांना बँकेच्या संचालक मंडळावर समाविष्ट करण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँकेला २९ फेब्रुवारीपासून नवीन ठेवी स्वीकारण्यावर आणि नवीन पत व्यवहारांवर निर्बंध आणले, तसेच अनेक प्रकारच्या सेवांसाठी नव्याने ग्राहकही नोंदवण्यास बंदी घातली आहे.