मुंबई : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण निर्धारण समितीने गुरुवारी सलग नवव्या बैठकीत रेपो दर ६.५ टक्क्यांवर अपरिवर्तित ठेवला. पतधोरण निर्धारण समितीतील सहापैकी चार सदस्यांनी व्याजदर ‘जैसे थे’ राखण्याच्या बाजूने मतदान केले. याआधी फेब्रुवारी २०२३ मध्ये रिझर्व्ह बँकेने शेवटचा दरबदल केला होता, तेव्हा रेपो दर ६.५० टक्के करण्यात आला होता.
मध्यवर्ती बँकेने रेपो दरात कोणतीही वाढ न केल्याने गृह कर्ज, वाहन कर्जदारांना त्यांच्या मासिक हप्त्यांमध्ये येत्या ऑक्टोबरपर्यंत तरी कोणतीही वाढ संभवणार नाही, हे दिलासादायी आहे. तथापि, खाद्यान्न महागाईबाबत अनिश्चितता आणि त्या संबंधाने रिझर्व्ह बँकेच्या कठोर भूमिकेमुळे चालू संपूर्ण आर्थिक वर्षात व्याजदर कपातीची शक्यता धूसर झाली आहे. शेवटची दरकपात होऊन साडेचार वर्षे उलटली असून, कर्ज हप्त्यांचा भार हलका होण्याची चिन्हे पुढेही नसल्याने घरासाठी, शिक्षणासाठी आणि वाहनासाठी कर्ज घेण्याच्या प्रतीक्षेत असलेल्यांच्या वाट्याला यातून निराशाही आली आहे.
हेही वाचा >>>Gold Prices Falling : सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी घसरण! लग्नासाठी सोने खरेदी करणाऱ्या जोडप्यांसाठी सुवर्णसंधी
किरकोळ महागाई दर सरलेल्या जूनमध्ये ५.१ टक्क्यांवर पोहोचला आहे. खाद्यान्नांच्या किमतीत मोठी वाढ झाल्यामुळे तो ५ टक्क्यांच्या पुढे सरकला आहे. मध्यवर्ती बँकेने तिचा प्राधान्यक्रम या खाद्यान्न महागाईच्या नियंत्रणाकडे आहे. महागाईत ४६ टक्के योगदान असलेल्या खाद्यान्न महागाईकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जुलैमध्ये अन्नधान्याच्या उच्च किमती कायम राहण्याची शक्यता आहे. परिणामी, विद्यमान आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीतील त्याचा परिणाम दिसून येईल, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले.
पतधोरण समितीने मागे वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणेच आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये महागाई दर ४.५ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. मात्र त्रैमासिक आधारावर हा अंदाज सुधारण्यात आला आहे. दुसऱ्या तिमाहीत महागाई दर ४.४ टक्के, तिसऱ्या तिमाहीत ४.७ टक्के आणि चौथ्या तिमाहीत ४.३ टक्के असा सुधारण्यात आला आहे. पुढील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत महागाई दर ४.४ टक्के राहण्याचा अंदाज आहे. असेही दास म्हणाले.
सर्वप्रथम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमचे लक्ष्य चलनवाढ आहे, ज्यामध्ये खाद्यान्न महागाईचे भारमान ४६ टक्के आहे. सामान्य जनतेसाठी मुख्यत्वे खाद्यान्नांच्या किमती जिव्हाळ्याच्या आणि याच महागाईचे चटके बसतात. या घटकाकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. आतापर्यंत महागाई नियंत्रणातून जे कमावले ते जपण्यासाठी असे दुर्लक्ष करणारे परवडणारेही नाही.- शक्तिकांत दास, रिझर्व्ह बँक गव्हर्नर