निवडणूक काळात अनेक चढउतार पाहिलेल्या मुंबई शेअर बाजारानं सोमवारी व्यवहार सुरू होताच विक्रमी झेप घेतली. सेन्सेक्सनं मोठी उसळी घेत तब्बल ७५,४१०.३९ अंकांचा टप्पा गाठला. त्यापाठोपाठ निफ्टी५०नंही ८१.८५ अंकांपर्यंत उसळी घेतली. त्यामुळे एकीकडे देशातील ५७ मतदारसंघांमध्ये लोकसभेसाठीच्या शेवटच्या टप्प्याच्या मतदानाची तयारी सुरू झालेली असताना दुसरीकडे शेअर बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी सोमवारच्या व्यवहारांची सुरुवात चांगली झाल्याचं मानलं जात आहे.

निफ्टी५० चीही सर्वोच्च अंकांची नोंद!

मुंबई शेअर बाजारात आज व्यवहार सुरू होताच सेन्सेक्सनं तब्बल २४५.०७ अंकांनी उसळी घेतली. ही जवळपास ०.३२ टक्के इतकी वाढ होती. दुसरीकडे निफ्टी५०नं ०.३६ टक्के इतकी वाढ नोंदवत आत्तापर्यंतच्या सर्वाधिक अंकांची, अर्थात २३,०३८.९५ इतकी नोंद केली. दरम्यान, सध्या चालू असलेलं लोकसभा निवडणुकांसाठीचं मतदान आणि एफआयआयमध्ये (FII) झालेली वाढ सेन्सेक्समधील सकारात्मक वातावरणासाठी कारणीभूत असल्याचं मानलं जात आहे.

शेअर बाजारात तेजी येणार की मंदी? निकालानंतर बाजारावर तेजीवाल्यांचे प्राबल्य असेल की मंदीवाल्यांचे?

“सोमवारी वॉल स्ट्रीटवरील सर्व व्यवहार मेमोरियल डेच्या निमित्ताने बंद होते. पण तरीही निफ्टीच्या गुंतवणूकदार व खरेदीदारांमधील विश्वास कायम राहिला. लोकसभा निवडणुकांमुळे गुंतवणूकदारांमध्ये आशावाद वाढीस लागला असून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याचाही सकारात्मक परिणाम बाजारावर दिसून आला आहे”, अशी प्रतिक्रिया मेहता इक्विटीजचे उपाध्यक्ष प्रशांत तापसे यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपासाठी सकारात्मक चिन्हं?

दरम्यान, लोकसभा निवडणुकांमध्ये विरोधकांकडून सत्तेचा दावा केला जात असला, तरी शेअर बाजारातील हे बदल भारतीय जनता पक्षाच्या बाजूने कल जात असल्याचेच निर्देशक असल्याचं मत जिओजीत फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक धोरणकर्ते व्ही. के. विजयकुमार यांनी व्यक्त केलं आहे. “बाजारातील बदल पाहाता सध्याची परिस्थिती पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांच्या बाजूने झुकत असल्याचं दिसत आहे”, असं ते म्हणाले.