What is e-Passport : पासपोर्ट हा एक महत्त्वाचा सरकारी दस्तऐवज आहे, जो परदेश प्रवासासाठी अत्यंत गरजेचा मानला जातो. पासपोर्टशिवाय कोणत्याही देशात प्रवेश करता येत नाही आणि कोणत्याही देशातून बाहेर पडता येत नाही. आता पासपोर्ट हा परदेशामध्ये आपल्या ओळखीचा पुरावा म्हणून वापरला जातो. तसेच आपण कोणत्या देशाचे नागरिक आहोत हे सिद्ध करण्यासाठीदेखील तो महत्त्वाचा पुरावा ठरतो. आता आजच्या काळात ई-पासपोर्ट किंवा बायोमेट्रिक पासपोर्टमुळे हे काम आणखी सोपे झाले आहे.
ई-पासपोर्ट किंवा बायोमेट्रिक पासपोर्ट हा नव्या पिढीचा प्रवासासाठीचा महत्त्वाचा दस्तऐवज आहे, जो बिल्ट-इन चिपसह व्यक्तीच्या ओळखीचा पुरावा आणखी सुरक्षित करतो. भारत सरकारने पासपोर्ट सेवांचे आधुनिकीकरण आणि आंतरराष्ट्रीय प्रवास सुरक्षेची मजबुती यांसाठी चिप-आधारित ई-पासपोर्ट जारी करण्यास सुरुवात केली आहे.
तुम्हाला पासपोर्ट आणि ई-पासपोर्ट यांच्यातील फरक समजून घेण्याआधी त्याबद्दल अधिक जाणून घेऊ या…
पासपोर्ट म्हणजे काय? (What is a Passport?)
पासपोर्ट हा एक सरकारी दस्तऐवज आहे, जो एखाद्या व्यक्तीला परदेशात प्रवास करण्याची परवानगी देतो. तो ओळख आणि राष्ट्रीयत्वाचा दस्तऐवज म्हणून वापरला जातो. पासपोर्ट मिळविण्यासाठी एखाद्या व्यक्तीला त्या देशाचे नागरिक असणे आणि विशिष्ट वयोमर्यादा यांसारख्या पात्रतेच्या अटी पूर्ण कराव्या लागतात आणि त्याचबरोबर त्याच्या ओळखीचा पुरावा, पत्ता व जन्म प्रमाणपत्र यांसारखी कागदपत्रे जमा करावी लागतात.
ई-पासपोर्ट म्हणजे काय?(What is e-Passport?)
ई-पासपोर्ट म्हणजे इलेक्ट्रॉनिक मायक्रोप्रोसेसर चिप असलेला पासपोर्ट, जो पासपोर्टधारकाची बायोमेट्रिक आणि वैयक्तिक माहिती संग्रहित करतो. हा चिप-आधारित ई-पासपोर्ट आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या (ICAO) मानकांचे पालन करतो. तसेच, त्या पासपोर्टशी छेडछाड व व्यक्तीला त्याची वैयक्तिक ओळख चोरी होण्यापासून वाढीव सुरक्षा देतो.
पासपोर्ट का आवश्यक?(Why is a Passport Essential?)
पासपोर्ट हा इतर देशांमध्ये प्रवास करताना ओळख आणि राष्ट्रीयत्वाचा पुरावा असल्याने तो आवश्यक आहे. पासपोर्ट बाळगल्याने तुम्ही सहजपणे परदेशात प्रवेश करू शकता आण नंतर तेथून बाहेर पडू शकता. पासपोर्टशिवाय कोणत्याही आंतरराष्ट्रीय ठिकाणी प्रवास करणे किंवा तुमच्या मायदेशी परतणे शक्य नाही. व्हिसासाठी अर्ज करताना, हॉटेल व फ्लाइट बुक करताना अशा अनेक परिस्थितींमध्ये पासपोर्ट हा तुमच्या ओळखीचा पुरावा आहे.
अनेक देश आणि त्या देशांतर्गत प्रवास करताना पासपोर्ट बाळगणे अनिवार्य करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत पासपोर्ट दूतावासांना तुमची सेवा करण्यास मदत करतो. एकूणच, सीमा ओलांडून सुरक्षित प्रवासासाठी पासपोर्ट हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे.
ई-पासपोर्ट का आवश्यक? (Why is a -Passport Essential?)
ई-पासपोर्ट तुमची ओळख सुरक्षित ठेवून, विमानतळ तपासणी जलद करून आणि तुमची ओळख चोरण्याचा धोका कमी करून प्रवास अधिक सुरक्षित बनवतो. ई-पासपोर्ट जागतिक स्तरावर स्वीकारला जातो आणि पडताळणी सुलभ करतो, ज्यामुळे प्रवासाचा अनुभव अधिक सुरळीत होतो.
ई-पासपोर्टची प्रमुख वैशिष्ट्ये (Key Features of e-Passport)
भारताचा ई-पासपोर्ट आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे, जो अधिक संरक्षण आणि जलद पडताळणीची सेवा देतो :
पासपोर्टच्या मुख्य पानावर एम्बेडेड चिप असते
ही चिप बायोमेट्रिक तपशील (फिंगरप्रिंट्स, फोटो, आयरिस स्कॅन) संग्रहित करते
तसेच ती डेमोग्राफिक डेटा (नाव, जन्मतारीख, पासपोर्ट क्रमांक इ.) संग्रहित करते
सुरक्षित प्रवेशासह संपर्करहित चिप असणे म्हणजे चिपमध्ये साठवलेला डेटा अनधिकृत प्रवेशापासून सुरक्षित असल्याची खात्री देतो.
हा डेटा आयसीएओ मानकांचे पालन करतो.
तो बनावट किंवा ड्युप्लिकेट पासपोर्टचा धोका कमी करतो.
E-passport आणि नियमित पासपोर्टमध्ये काय फरक?
ई-पासपोर्ट व नियमित पासपोर्टमधील फरक (तक्ता)
वैशिष्ट्ये | ई-पासपोर्ट | नियमित पासपोर्ट |
एम्बेड केलेली चिप | हो | नाही |
बायोमेट्रिक डेटा (बोटांचे ठसे, फोटो, आयरिस स्कॅन) | हो | नाही |
इमिग्रेशन | जलद होते | जलद होत नाही |
सुरक्षा | खूप जास्त सुरक्षित (डिजिटल एन्क्रिप्शन) | मुलभूत सुविधा |
फसवणूक | प्रतिबंध खूप जास्त | मर्यादित |
ई-पासपोर्ट व नियमित पासपोर्टमधील फरक (मुद्दे)
- ई-पासपोर्ट एम्बेड केलेली चिप असते. पासपोर्टमध्ये कोणतीही चिप नसते.
- ई-पासपोर्टच्या चिपमध्ये बायोमेट्रिक डेटा (बोटांचे ठसे, फोटो, आयरिस स्कॅन) असतो. नियमित पासपोर्टमध्ये कोणताही बायमेट्रिक डेटा नसतो.
- ई-पासपोर्टमुळे इमिग्रेशन जलद होते म्हणजे मायदेश सोडून परदेशात जाऊन राहण्याची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण होते; पण नियमित पासपोर्टमुळे इमिग्रेशन प्रक्रिया जलद पूर्ण होत नाही.
- ई-पासपोर्टमध्ये डिजिटल एन्क्रिप्शन आणि बायोमेट्रिक डेटा वापरला जात असल्याने तो खूप जास्त सुरक्षित आहे. पारंपरिक पासपोर्टमध्ये डिजिटल एन्क्रिप्शन आणि बायोमेट्रिक डेटा नसल्याने तुलनेने त्याची सुरक्षा मर्यादित होते.