Karachi Stock Exchange Falls: भारताने बुधवारी (७ मे) पहाटेच्या सुमारास पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरवर एअर स्ट्राइक केल्यानंतर पाकिस्तानच्या कराची स्टॉक्ट एक्सचेंजचा प्रमुख निर्देशांक KSE-30 मध्ये मोठी घसरण झाली होती. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशीही ही पडझड कायम असून आज निर्देशांकात ७.२ टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. बुधवारी निर्देशांक ३ टक्क्यांनी खाली आला होता. आज केएसई-३० मध्ये ६.३ टक्क्यांची घसरण झाल्यानंतर व्यवहारांवर निर्बंध घातले गेले. भारत आणि पाकिस्तानदरम्यान तणाव निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या शेअर बाजाराला त्याचा फटका बसला आहे.

आज सकाळी बाजार उघडताच केएसई निर्देशांकात वाढ झालेली दिसली होती. कालच्या घसरणीनंतर बाजाराने १,८५० अंकाची उसळी घेऊन १.७ टक्क्यांची वाढ अनुभवली होती. मात्र ही वाढ क्षणिक ठरली आणि दुपारपर्यंत निर्देशांक जवळपास ६,००० अंकानी कोसळला.

कराची आणि लाहोरसारख्या प्रमुख शहरांमध्ये भारताकडून ड्रोन पाडण्यात आल्याची बातमी पसरल्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये घबराट पसरली. निर्देशांकात ६.३ टक्क्यांची घसरण होताच व्यवहार तात्काळ थांबविण्यात आले. ज्यामुळे पुढील मोठी घसरण आटोक्यात आणता आली. भारताच्या ड्रोन्सनी पाकिस्तानात हल्ला केल्याच्या बातम्या आल्यानंतर गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला, अशी माहिती पाकिस्तानमधील बाजार तज्ज्ञांनी दिल्याचे इंडिया टुडेने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

पाक कुवैत इनव्हेस्टमेंट कंपनीचे प्रमुख संशोधक अदनान शेख यांनी दिलेल्या प्रतिक्रियेचा हवाला इंडिया टुडेने आपल्या वृत्तात दिला आहे. भारताचे ड्रोन्सनी कराची आणि लाहोरमधील काही ठिकाणांना लक्ष्य केल्याची बातमी समोर आल्यानंतर एकच घबराट पसरली. ज्यामुळे विक्रीचा जोर वाढून निर्देशांक अतिशय कमी वेळेत ६ टक्क्यांनी घसरला.

भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या शेअर बाजारावर बराच दबाव आहे. बुधवारी सकाळी ३.१ टक्क्यांची घसरणीसह सुरू झालेला बाजार सायंकाळी बंद होताना ६ टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला होता. गेल्या काही काळातील पाकिस्तानी बाजाराची ही सर्वाधिक निराशाजनक कामगिरी होती.

भारतीय बाजारावर काय परिणाम झाला?

पाकिस्तानच्या शेअर बाजारात मोठी घसरण होत असताना भारतीय शेअर बाजारावर या तणावाचा फारसा फरक जाणवलेला नाही. गुरुवारी सेन्सेक्समध्ये फक्त ०.७ टक्क्यांची तर निफ्टीमध्ये ०.५८ टक्क्यांची वाढ झाली. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या शेअर बाजारात आतापर्यंत १४.२ टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली आहे. तर भारतीय बाजार सेन्सेक्समध्ये ०.७ टक्क्यांची वाढ झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याआधीही कारगिल युद्ध असो किंवा संसदेवरील हल्ला किंवा पुलवामा असो भारतीय बाजार लवकर सावरलेला दिसून आला आहे.