महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नेहमीप्रमाणे धक्कातंत्राचा अवलंब करीत राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम व गुणपद्धती यात व्यापक बदल केले आहेत. परिणामी, या बदलाचे सर्वागीण आकलन करून परीक्षेची तयारी करणे क्रमप्राप्त आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षेच्या स्वरूपात झालेले मोठे बदल लक्षात घेता नवा अभ्यासक्रम, त्यातील पूर्णत: नवे घटक, नागरी सेवा कलचाचणी (सी-सॅट) सारखा पूर्णत: नवा पेपर, त्यासाठी आवश्यक संदर्भाची यादी आणि नवी अभ्यासपद्धती इत्यादीची विस्तृत चर्चा केली जाणे आवश्यक आहे. वस्तुत: राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) दरवर्षी स्पर्धापरीक्षेचे आयोजन करून विविध गट अ, गट ब, सनदी सेवापदी पात्र व गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची निवड करण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडतो. पूर्व, मुख्य व मुलाखत अशा तीन टप्प्यांत विभागलेल्या या (एमपीएससी) परीक्षेच्या माध्यमातून पात्र उमेदवार निवडले जातात.
अर्थातच प्रशासनाची जबाबदारी समर्थपणे सांभाळण्यास सक्षम उमेदवार हवा. या परीक्षेद्वारे ही क्षमता तपासली जाते. स्वाभाविकच या परीक्षेचा अभ्यासक्रम हा क्षमता तपासण्यासाठी पायाभूत व निर्णायक ठरतो. समाजात घडणाऱ्या बदलांमुळे प्रशासनासमोरची आव्हानेही बदलतात. परिणामी, ही आव्हाने समर्थपणे पेलण्यासाठी आवश्यक गुणकौशल्ये प्रशासकांना आत्मसात करावी लागतात. आपल्या देशाचा विचार करता १९९१ चे उदारीकरणाचे धोरण, जागतिकीकरणाचा प्रसार, लोकशाहीकरणाची वाढती प्रक्रिया, जनमानसात निर्माण होणारी जाणीव जागृती इ. प्रक्रियांमुळे शासन-प्रशासनासमोरील परिस्थिती बदलली आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांना या बदलास पचवून, त्यास यशस्वीपणे सामोरे जाता यावे या दृष्टीने प्रशासकीय यंत्रणा निर्माण करावी लागते. ही बाब लक्षात घेऊनच ‘एमपीएससी’ने ‘यूपीएससी’च्या धर्तीवर आपल्या परीक्षापद्धतीत काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.
राज्य लोकसेवा आयोगाने २०१३ पासून पूर्वपरीक्षेत केलेले बदल पुढीलप्रमाणे लक्षात घेता येतात-
१. राज्यसेवा पूर्वपरीक्षेत आता एक ‘सामान्य अध्ययना’चा व दुसरा ‘नागरी सेवा कल चाचणी’ (सिव्हिल सव्र्हिसेस अॅप्टिटय़ूड टेस्ट- सी-सॅट) असे दोन पेपर्स असतील.
२. प्रस्तुत दोन्ही प्रश्नपत्रिका प्रत्येकी २०० गुणांचे असतील व त्यासाठी प्रत्येकी दोन तासांचा कालावधी निर्धारित केला आहे.
३. या प्रश्नपत्रिकांमध्ये एकूण किती प्रश्न असतील व त्यांची गुणविभागणी कशी असेल हे ‘एमपीएससी’ने स्पष्ट केले नाही. अर्थात याबाबतीत ‘एमपीएससी’ ‘यूपीएससी’चेच अनुकरण करण्याची शक्यता अधिक आहे.
४. तथापि, दोन्ही प्रश्नपत्रिकांमध्येा वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी प्रश्न असतील.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केलेला हा बदल प्रत्येक विद्यार्थ्यांने पद्धतशीररीत्या लक्षात घेणे महत्त्वाचे ठरते. किंबहुना या आकलनावरच प्रत्येक विद्यार्थ्यांची तयारी अवलंबून राहणार आहे. सामान्य अध्ययनाचा पूर्वीचा पेपर कायम ठेवला असला तरी त्यात अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे काही महत्त्वाचे बदल केले आहेत, त्याची योग्य रीतीने नोंद घेणे अत्यावश्यक आहे.
अ. इतिहास घटकाचा अभ्यास वाढवून त्यात प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक इतिहासाचा समावेश केला आहे. तसेच, भारताच्या इतिहासाबरोबरच महाराष्ट्राचा प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक इतिहास अवगत असणे गरजेचे आहे.
ब. भूगोलाचाही अभ्यासक्रम व्यापक केलेला असून त्यात भारत आणि महाराष्ट्राच्या भूगोलाबरोबरच जगाचा भूगोलही अभ्यासावा लागणार आहे. त्यातही प्राकृतिक, आर्थिक आणि सामाजिक-लोकसंख्या भूगोलाची तयारी करावी लागणार आहे.
क. पूर्वीच्या भारतीय राज्यघटनेऐवजी आता भारतीय राज्यव्यवस्था व कारभारप्रक्रिया असा उल्लेख केला आहे. यात राज्यघटना, राजकीय व्यवस्था, पंचायती राज, सार्वजनिक धोरण आणि नागरिकांच्या हक्कांसंबंधी मुद्दे या घटकांचा समावेश केला आहे. भारतीय तसेच महाराष्ट्राच्या राज्यव्यवस्थेचा अभ्यास करावा लागणार आहे.
ड. भारतीय अर्थव्यवस्था या शब्दप्रयोगाऐवजी ‘आर्थिक आणि सामाजिक विकास’ असे शीर्षक उपयोजिले आहे, ज्यात चिरंतन विकास, दारिद्रय़, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक क्षेत्रातील पुढाकार, समावेशक विकास या घटकांचा अंतर्भाव केला आहे. महाराष्ट्राच्या संदर्भातही हा घटक अभ्यासावा लागणार.
इ. पर्यावरणीय परिस्थितिकी, जैवविविधता आणि हवामान बदल यासंबंधी सर्वसाधारण कळीचे मुद्दे हा घटक नव्यानेच नमूद केला आहे.
ई. सामान्य विज्ञान हा घटकही कायम ठेवण्यात आला आहे.
उपरोक्त बदलामुळे सामान्य अध्ययनाची तयारी करताना जुन्या पद्धतीचा अवलंब न करता अभ्यासक्रमात समाविष्ट केलेल्या नव्या अभ्यासघटकांचा विचार
करून आपल्या अभ्यासपद्धतीत बदल करणे अत्यावश्यक आहे.
विद्यार्थ्यांच्या दृष्टीने पाहता ‘नागरी सेवा कल चाचणी’चा केलेला समावेश हा संपूर्णत: नवा बदल आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काहीशी भीती निर्माण झाल्याचे चित्र आहे. विशेषत: मराठी माध्यमाच्या व ग्रामीण पाश्र्वभूमी असणाऱ्या विद्यार्थ्यांना हा पेपर आव्हानात्मक वाटू शकतो. तथापि, या पेपरमध्ये समाविष्ट केलेल्या सर्व अभ्यासघटकांचा पद्धतशीर विचार करून नियमित दररोज तयारी केल्यास हा पेपरदेखील सुलभ बनवता येतो. या कल चाचणीत-
१. आकलन कौशल्य
२. आंतरवैयक्तिक संभाषण व इतर कौशल्ये
३. तार्किक विचार व विश्लेषणात्मक क्षमता
४. निर्णय प्रक्रिया व समस्यांची सोडवणूक
५. सामान्य बुद्धिमत्ता चाचणी
६. मूलभूत अंकगणितीय कौशल्य व सामग्री विश्लेषण
७. इंग्रजी भाषेचे आकलन कौशल्य
अशा सात अभ्यासघटकांचा समावेश केला आहे. अर्थात एमपीएससीने हा अभ्यासक्रम समाविष्ट करताना अंकगणितीय कौशल्ये व इंग्रजी भाषा आकलन कौशल्ये हे घटक ‘दहावी’च्या दर्जाचे असतील, हेही नमूद केले आहे. या नव्या विषयाची तयारी करताना गोंधळून न जाता विद्यार्थ्यांनी प्रत्येक अभ्यास घटकाचा अर्थ समजून घ्यावा व त्यानुसार भरपूर व नियमित सरावाद्वारे या विषयाची तयारी करावी. सर्वसाधारणत: अनेकांना असे वाटते की, एमबीएसाठी ज्या पात्रता परीक्षा घेतल्या जातात, तशाच प्रकारे ही कलचाचणी अवघड असणार. त्यामुळे गणित, बुद्धिमापन चाचणी व इंग्रजीची सवय असणाऱ्या विद्यार्थ्यांना हा विषय सुलभ ठरेल. तथापि, या विषयाचे मानक ‘दहावी’च्या पातळीवरील असल्याकारणाने विद्यार्थ्यांना भीती बाळगण्याचे कारण नाही. प्रस्तुत कलचाचणी विषयाची तयारी करताना विद्यार्थ्यांनी पुढील बाबी लक्षात घ्यायला हव्यात-
१. या पेपरमध्ये आकलन (मराठी व इंग्रजी) संभाषण-संवाद, निर्णयप्रक्रिया, इंग्रजी भाषा आकलन ही कौशल्ये तपासली जाणार आहेत. अर्थात इथे निबंधवजा प्रश्न नसल्याने काहीही लिहायचे नाही, तर पेपरमधील तो-तो भाग वाचून त्यावरील प्रश्नांखाली दिलेल्या अचूक पर्यायाची निवड करायची आहे. याबाबतीत मराठी व इंग्रजी उताऱ्यातील शब्द, त्यांचे अर्थ, त्यातील घटक याचा रीतसर अभ्यास महत्त्वाचा ठरणार आहे. परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे दिलेल्या उताऱ्यातील लेखक वा लेखिकेच्या भूमिकेचे योग्य आकलन होय. नियमित वाचन व भरपूर सरावाच्या माध्यमातून कोणत्याही विद्यार्थ्यांला इंग्रजी भाषेचे आकलन कौशल्य वाढवता येईल, यात शंका नाही.
२. संवाद, संभाषण व इतर कौशल्याच्या बाबतीत विद्यार्थ्यांच्या अनेक क्षमतांचा कस लागणार आहे. आकलनाबरोबरच संवादात नेमक्या सूचित बाबींचे आकलन उमेदवारात आहे की नाही, त्याचा प्रतिसाद योग्य आहे की नाही आणि त्याच्याकडे नेतृत्व गुण आहेत का, इत्यादीची चाचपणी केली जाणार आहे.
तार्किक विचार व विश्लेषणात्मक क्षमतेवर आधारित प्रश्नांना अनेक विधाने दिली जातील आणि त्या विधानाशी निगडित निष्कर्ष पर्यायात अंतर्भूत केले जातील. अर्थात यासाठी विद्यार्थ्यांच्या तार्किक विचार व पृथ:करणाची क्षमता महत्त्वाची ठरणार आहे. भरपूर सरावाद्वारेच असे कौशल्य आत्मसात करता येईल. ‘प्रकरण अभ्यासा’च्या पद्धतीद्वारे विद्यार्थ्यांची निर्णय व समस्यांची उकल करण्याची क्षमता तपासली जाणार आहे. विद्यार्थी एखाद्या परिस्थितीत निर्णय कसे घेतो, त्या वेळी परिस्थितीच्या सर्व बाजू लक्षात घेतो का, त्यांच्या परिणामांचा विचार करतो का, उपलब्ध पर्यायाची कशी तुलना करतो, आणि अंतिमत: समस्येची उकल अपेक्षितपणे करतो का, या बाबी तपासल्या जातील. या घटकाच्या बाबतीत विद्यार्थ्यांचे भोवतालच्या परिस्थितीचे आकलन, त्यातील बारकावे, समस्या व उपाय यासंबंधी ज्ञान निर्णायक ठरणार आहे.
वास्तविक पाहता सामान्य अध्ययनाच्या जुन्या अभ्यासक्रमात सामान्य बुद्धिमत्ता चाचणी हा घटक अंतर्भूत होताच. संख्याश्रेणी व पायाभूत गणितीय कौशल्यावर आधारित हा घटक नियमित व भरपूर सरावाच्या माध्यमातून पद्धतशीररीत्या तयार करता येतो. त्याचप्रमाणे मूूलभूत अंकगणितीय कौशल्ये व सामग्री विश्लेषणाची तयारी करताना सरावास पर्याय नाही. अंकगणितीय कौशल्यात विविध प्रकारची गणिते, त्यातील सूत्र व पद्धती यांचा सराव केल्यास हा घटक चांगल्या रीतीने तयार करता येईल. सामग्री विश्लेषणातील आलेख व सांख्यिकी माहिती यांचे काळजीपूर्वक व विचारपूर्वक वाचन महत्त्वाचे आहे. शेवटी इंग्रजी भाषेचे आकलन कौशल्य आत्मसात करताना शब्दसंग्रह; वाक्यरचना, तिचे विविध प्रकार, वाक्यात योग्य व अचूक शब्दाचा वापर, इंग्रजी व्याकरण या बाबी मध्यवर्ती असतील. अशा रीतीने ‘नागरीसेवा कल चाचणी’ हा विषय मुख्यत: नियमित व भरपूर सरावावर आधारित आहे, हे लक्षात येते. जशी सामान्य अध्ययनात भरपूर वाचन करून त्यातील माहिती लक्षात ठेवावी लागते तशी बाब या पेपरच्या बाबतीत आढळत नाही. मूलत: विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेचीच कसोटी पाहणारा हा पेपर आहे. दुसऱ्या बाजूला किमान वेळेत प्रश्नांची उकल ही बाबही महत्त्वाची ठरणार आहे. थोडक्यात, वेळेचा मुद्दा निर्णायक ठरणार आहे. सराव हेच यावरील उत्तर आहे.
विद्यार्थ्यांनी या बदलाचा स्वागतार्ह पाऊल म्हणून स्वीकार करून त्याच्या तयारीस प्रारंभ केला पाहिजे. आकलन, निर्णय निर्धारण व समस्यानिवारण; इंग्रजी व अंकगणितीय बाबींना न भिता नियमित व भरपूर सरावाद्वारे या पेपरसाठी आवश्यक कौशल्य आत्मसात करता येतात, यात शंका नाही.
संचालक, द युनिक अॅकेडमी, पुणे admintheunique@gmail.com