या लेखात आपण यूपीएससी मुख्य परीक्षेतील ‘आधुनिक भारताचा इतिहास’ हा विषय समजून घेणार आहोत. यात अभ्यासक्रमाचा उद्देश म्हणजे उमेदवाराला भारताच्या ऐतिहासिक विकासाची समज किती? व कशी? आहे तसेच सामाजिक, आर्थिक आणि राजकीय शक्ती ज्यांनी त्यांना आकार दिला आहे, त्याचे मूल्यांकन उमेदवार कशाप्रकारे करतो ते पाहणे आवश्यक आहे. इथे केवळ पुस्तकी ज्ञान आवश्यक नसून इतिहासाचा विश्लेषणात्मक अभ्यास करणे आयोगाला अपेक्षित आहे.

आयोगाने जीएस १ च्या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात खालील बाबींचा समावेश केलाआहे –

आधुनिक भारताचा इतिहास (१८ व्या शतकाच्या मध्यापासून ते आजपर्यंत)

महत्त्वाच्या घटना, व्यक्ती आणि मुद्दे.

● स्वातंत्र्य लढा : टप्पे, महत्त्वाचे योगदानकर्ते आणि देशाच्या विविध भागांचे योगदान.

स्वातंत्र्योत्तर एकत्रीकरण आणि पुनर्रचना.

यावर विचारलेला २०२४ च्या मुख्य परीक्षेतील प्रश्न व त्याचे अपेक्षित उत्तराचे मुद्दे बघूयात –

● प्र. भारत छोडो आंदोलनाला कारणीभूत ठरणाऱ्या घटना कोणत्या होत्या? त्याचे परिणाम सांगा.

१९४२ चे भारत छोडो आंदोलन हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्त्वाचा टप्पा होता. महात्मा गांधी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने ‘करा किंवा मरा’ या घोषणेसह त्याची सुरुवात केली होती. १९४० च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात ज्या घटनांमुळे त्याचा उद्रेक झाला, त्याचे कारण देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही घटक होते.

● क्रिप्स मिशनचे अपयश (मार्च १९४२) :

दुसऱ्या महायुद्धात भारताच्या पाठिंब्याची गरज ओळखून ब्रिटीश सरकारने मार्च १९४२ मध्ये क्रिप्स मिशन भारतात पाठवले आणि भारताला युद्धोत्तर अधिराज्याचा दर्जा आणि संविधान तयार करण्याची शक्यता दिली. महात्मा गांधीजींनी याला ‘क्रॅश झालेल्या बँकेवरील पोस्ट-डेटेड चेक’ असे म्हटले. भारताला पूर्ण स्वातंत्र्य देण्यात ही योजना फोल ठरली होती.

● २ रे महायुद्ध (१९३९-१९४५): भारतीय नेत्यांशी सल्लामसलत न करता दुसऱ्या महायुद्धात ब्रिटनच्या सहभागामुळे भारतीय जनतेवर तीव्र असंतोष होता. गांधीजींच्या नेतृत्वाखालील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने युद्धाच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्याच्या बदल्यात पूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली, परंतु ब्रिटिशांनी यासाठी नकार दिला. तसेच ब्रिटिश या युद्धात सहभागी असल्याने ही एक संधी होती ज्याद्वारे आपण आपल्या स्वातंत्र्याचा मार्ग सुकर करू शकत होतो.

● बर्माचे पतन (१९४२) :

१९४२ च्या सुरुवातीला बर्मावरील जपानी आक्रमणामुळे युद्ध भारताच्या दाराशी आले. जपानी आक्रमणाची भीती वाढत असल्यामुळे ब्रिटिशांनी युद्धातून माघार घ्यावी ही भारतीयांची मागणी होती. या मागणीला ब्रिटिश कितपत प्रतिसाद देतील याबाबतही आशंका होती.

राष्ट्रवादाच्या भावनेत वाढ: राजकीय क्रियाकलापांवर वाढती दडपशाही, युद्धादरम्यान आर्थिक अडचणी आणि संवैधानिक वाटाघाटी अयशस्वी झाल्यामुळे अस्थिर राजकीय वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांमध्ये राष्ट्रवादाची भावना मोठ्या प्रमाणावर जागृत झालि होती.

● महात्मा गांधींचे आवाहन :

जुलै १९४२ मध्ये, गांधींनी ब्रिटिश राजवटीचा तात्काळ अंत करण्याची मागणी करत त्यांची प्रसिद्ध ‘भारत छोडो’ ही हाक दिली. त्यांनी जाहीर केले की, ‘‘आपण भारताला स्वतंत्र करू किंवा या प्रयत्नात मरू’’. नंतर अखिल भारतीय काँग्रेस समितीने ८ ऑगस्ट १९४२ रोजी भारत छोडो ठराव मंजूर केला, ज्यामध्ये ब्रिटिशांना भारत सोडण्याचे आणि भारतीयांना स्वातंत्र्यासाठी अहिंसक संघर्ष सुरू करण्याचे आवाहन करण्यात आले.

आपल्याला विचारण्यात आलेल्या प्रश्नातील दुसरा भाग बघा –

● भारत छोडो चळवळीचे परिणाम:

ही चळवळ नेतृत्त्वरहित चळवळ होती. ब्रिटिशांनी या चळवळीला जलद आणि कठोर प्रतिसाद दिला. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि सरदार पटेल यांच्यासह काँग्रेसच्या सर्व प्रमुख नेत्यांना चळवळ सुरू झाल्यानंतर काही तासांतच अटक करण्यात आली. काँग्रेसला बेकायदेशीर घोषित करण्यात आले आणि हजारो कार्यकर्त्यांना खटल्याशिवाय तुरुंगात टाकण्यात आले. यानंतर चळवळ देशभरात, विशेषत: ग्रामीण भागात पसरली. विविध प्रदेशांमध्ये निदर्शने, संप आणि उठाव झाले. काँग्रेस नेत्यांना तुरुंगात टाकल्यामुळे चळवळ नेतृत्वहीन झाली, परंतु संपूर्ण भारतात उत्स्फूर्त उठाव झाले. ब्रिटिशांना निदर्शने, बहिष्कार आणि टेलिग्राफ वायर तोडणे आणि सरकारी इमारतींवर हल्ले करणे यासारख्या तोडफोडीच्या कारवायांना तोंड द्यावे लागले.

● समांतर वा पर्यायी सरकारे :

‘भारत छोडो आंदोलन’ दरम्यान काही स्वातंत्र्यसैनिकांनी ब्रिटिश राजवटीच्या विरोधात ‘पर्यायी सरकार’ स्थापन केली. उदा. :‘ताम्रलिप्त राष्ट्रीय सरकार’ (बंगाल),बल्लिया (उत्तर प्रदेश), सातारा (महाराष्ट्र)

या सरकारांनी कायद्याचे पालन, करसंकलन, स्थानिक सेवा आदी कामे केली आणि ब्रिटिश सत्तेला पर्याय म्हणून कार्य केले.

● भूमिगत नेत्यांचा उदय :

काँग्रेस नेत्यांना तुरुंगात टाकले जात असताना, तरुण कार्यकर्ते आणि गुप्त नेटवर्कने गनिमी कावा वापरत आणि स्थानिक बंडखोरांचे नेतृत्व करत नियंत्रण मिळवले. यात उषा मेहता, अरुणा असफ अली आदींनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

● क्रूर ब्रिटिश दडपशाही :

ब्रिटिशांचा प्रतिसाद क्रूर होता, ज्यामध्ये व्यापक अटक, गोळीबार आणि मार्शल लॉचा वापर करण्यात आला. अंदाजे १००,००० लोकांना अटक करण्यात आली आणि पोलिसांच्या गोळीबारात आणि लष्करी कारवाईत हजारो लोक मारले गेले किंवा जखमी झाले. दडपशाहीमध्ये मुंबई आणि पाटणासारख्या ठिकाणी निदर्शकांवर हवाई हल्ले तसेच निदर्शनांवर क्रूर कारवाई यांचा समावेश होता.

भारत छोडो चळवळीने ब्रिटिश राजवटीविरुद्ध भारतीयांना खऱ्या अर्थाने एकत्र आणून पूर्ण स्वातंत्र्याची खोलवर रुजलेली इच्छा प्रदर्शित केली. यामुळेच ब्रिटिश सरकार आणि भारतीय नेत्यांमधील युद्धोत्तर वाटाघाटीचा पाया घातला गेला.

याप्रमाणे गतवर्षीच्या प्रश्नांची अपेक्षित उत्तरे तयार करून त्यानुसार लेखन सराव करायला हवा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

sushilbari10@gmail.com