मागील लेखामध्ये (२३ मे) आपण कृषी शिक्षण पदवी अभ्यासक्रम व पात्रता याबद्दल माहिती घेतली आहे. या लेखामध्ये आपण आपल्या मागणीनुसार कृषी क्षेत्रात कोणकोणत्या विषयांचा अंतर्भाव होतो याची माहिती घेऊया.
आपला देश कृषीप्रधान देश आहे. खरा भारत खेड्यात आढळतो. खेड्यांमध्ये उदरनिर्वाहाचे मुख्य साधन म्हणून शेती आणि शेतीपूरक व्यवसायाकडे पाहिले जाते. पूर्वी खेड्यांमध्ये असलेले शेतीचे महत्त्व आता शहरी भागांमध्ये सुद्धा पटलेले आहे. शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. पारंपारिक शेतीबरोबर आधुनिक शेतीचे महत्त्व वाढत चालले आहे. म्हणून या क्षेत्राचे महत्व समजण्यासाठी बीएस्सी कृषी कडे पाहिले जाते.मागील लेखामध्ये आपण कृषी शिक्षण पदवी अभ्यासक्रम व पात्रता याबद्दल माहिती घेतली आहे. या लेखामध्ये आपण आपल्या मागणीनुसार कृषी क्षेत्रात कोणकोणत्या विषयांचा अंतर्भाव होतो याची माहिती घेऊया. बीएस्सी ऑनर्स कृषी साधारणपणे चार वर्षाचा अभ्यासक्रम आहे. यामध्ये आठ सेमिस्टर आहेत. प्रथम तीन वर्षांमध्ये प्रात्यक्षिक व लेखी आधारित अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकवला जातो. तसेच शेवटच्या वर्षांमध्ये विद्यार्थ्यांना कौशल्य आधारित शिक्षण दिले जाते. यामध्ये शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन शिक्षण दिले जाते. व्यावसायिक दृष्टिकोनासाठी वेगवेगळ्या कृषी कंपन्या,कृषी विज्ञान केंद्र यामध्ये शिकाऊ प्रशिक्षण दिले जाते. जेणेकरून विद्यार्थ्यांची शेती आधारित कौशल्य विकसित होतील.
मागील लेख वाचून बऱ्याच वाचकांनी मेल पाठवून कृषी शिक्षणामध्ये कोणते विषय शिकवले जातात. याबद्दल विचारणा केली आहे. कृषी पदवीमध्ये कृषीशास्त्र, फलोत्पादन, मृदा विज्ञान, वनस्पती रोग विज्ञान, कीटकशास्त्र, कृषी अर्थशास्त्र, पशु शास्त्र, कृषी विस्तार शास्त्र, पीक वनस्पती शास्त्र व कृषी अभियांत्रिकी यासारख्या विषयांचा समावेश असतो.
बीएस्सी ऑनर्स पदवी विद्यार्थ्यांना किंवा पदवीधरांना शेती कृषी संशोधन, कृषी व्यवसाय, कृषी विस्तार सेवा, आधुनिक शेती संकल्पना आणि ग्रामीण विकास उपक्रमांमधील करिअरसाठी आवश्यक कौशल्य आणि संधी प्रदान करते. कृषी पदवीधारकांना शेती आणि कृषी व्यवसायाच्या विविध पैलूमध्ये प्रत्यक्ष अनुभव मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना व्यवहारी प्रशिक्षण, क्षेत्र कार्य आणि इंटर्नशिप उपलब्ध करून दिले जाते. कृषी शास्त्रज्ञ व कृषी व्यावसायिक आपणास वारंवार सांगत आहेत की, शेती ही एक वेल्थ क्रिएशन इंडस्ट्री आहे. त्यामध्ये माती, पाणी, सूर्यप्रकाश व पिकांच्या सहाय्याने शाश्वत उत्पादन केले जाते. त्यामुळे यावर कृषी शास्त्राची मागणी येणाऱ्या काळात वाढत जाणार आहे.
ज्याप्रमाणे आपण शाश्वत विकास, शाश्वत शेती संकल्पना वापरतो त्याचप्रमाणे शाश्वत करिअर करायचे असेल तर बीएस्सी कृषी एक उत्तम पर्याय आहे. राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये ‘विषय – अधिभार पद्धती’ ने प्रत्येक शैक्षणिक वर्ष दोन सत्रांमध्ये विभागले आहे. आणि वीस आठवड्यांपेक्षा कमी कालावधी नसलेल्या कालावधीत ‘षन्मासिक सत्र’ असे म्हणतात. शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये शिकवले जाणारे विषय निरनिराळ्या सत्रामध्ये विभागले जाऊन वर्गातील व्याख्यान, प्रात्यक्षिके / शेतीवरील प्रात्यक्षिके, ग्रंथालयातील वाचन व गृहपाठ इत्यादी प्रकारे शिकवले जातात.
विद्यार्थी / विद्यार्थिनी, विषयाची निवड, घ्यावयाचे एकूण अधिभार, विद्यार्थ्यांचा सल्ला समितीच्या मार्गदर्शनाखाली प्रचलित नियमाप्रमाणे आणि विद्यार्थ्यांची/ विद्यार्थिनींची शैक्षणिक प्रगती पाहून करतो/ करते.
विद्यार्थ्यांची/ विद्यार्थिनींची शैक्षणिक प्रगती समाधानकारक नसेल तर तो काही विषय ज्यावेळी शिकवण्यासाठी उपलब्ध असतील त्यावेळी पुन्हा घेऊ शकतो /शकते.
सहाव्या अधिष्ठाता समितीच्या शिफारशी प्रमाणे विविध पदवी अभ्यासक्रमातील प्रवेशित उमेदवारांना सातव्या व आठव्या सत्रांमध्ये ‘विद्यार्थी ग्रामीण व उद्याोजकता जागरूकता’ योजनेचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल. लेखी व प्रात्यक्षिक परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी किमान ५० टक्के गुण अनिवार्य आहेत. तथापि त्या त्या विषयाच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये प्रत्येकी किमान ४० टक्के गुण उत्तीर्णतेसाठी अनिवार्य आहेत.
पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्याची कालमर्यादा आठ वर्ष असून यापेक्षा एक वर्ष अधिक कालावधी वाढवून द्यावयाचा झाल्यास विद्यार्थ्यांच्या गंभीर कारणाबाबत शहानिशा करून संबंधित कृषी विद्यापीठाच्या विद्यापरिषदेकडून योग्य तो निर्णय घेण्यात येईल.
शैक्षणिक नियमावली मध्ये आवश्यकतेनुसार वेळोवेळी बदल करून सुधारित शैक्षणिक नियमावली तयार करण्यात येते. सुधारित शैक्षणिक नियमावली शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना लागू असते. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या सहाव्या अधिष्ठाता समितीने शिफारशीत केलेले नियम प्रवेशित विद्यार्थ्यांना लागू राहतील.
sachinhort. shinde@gmail. com