बारावीनंतर वैद्याकीय क्षेत्रातील करिअर म्हणजे सामान्यत: विद्यार्थी आणि पालकांसमोर वैद्याकशास्त्र, दंतवैद्याकशास्त्र, आयुर्वेदिक, होमिओपॅथी, पॅरामेडिकल यासारखेच पर्याय येतात. सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जात चाललेला वैद्याकीय शिक्षणाचा खर्च पाहता एका अत्यंत उत्तम आणि अल्पखर्चिक अशा पर्यायाची अर्थात पशुवैद्याकीय शाखेची माहिती घेऊया…

शालिहोत्रांसारख्या प्राचीन वैद्यांनी घालून दिलेल्या ज्ञानाच्या पायावर उभ्या असलेल्या पशुवैद्याकशास्त्रातील पदवीधरांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या मुबलक संधी उपलब्ध होतात. केंद्र व राज्य शासनाच्या खात्यात नोकरी, डेअरी फार्म, पोल्ट्री, औषधनिर्मिती कारखाने, कत्तलखाने इत्यादी. इतकेच नव्हे तर बँका, विमा कंपन्या, संरक्षण दले यामध्ये सुध्दा नोकरीच्या उत्तम संधी उपलब्ध आहेत. याशिवाय परदेशातही नोकरीच्या संधी उपलब्ध होतातच शिवाय अमेरिका, युरोप ऑस्ट्रेलिया खंडातील देशांमध्ये या विषयात उच्च शिक्षणाच्या ही संधी उपलब्ध आहेत. याशिवाय स्वत:चा दवाखाना किंवा सल्ला सेवा केंद्र सुरू करणेही शक्य आहे.

बारावीनंतर हा साडेपाच वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे. यात साडेचार वर्षे शिक्षणक्रम आणि एक वर्ष इंटर्नशिप असते. महाराष्ट्रातील पाच शासकीय महाविद्यालयांत हा अभ्यासक्रम उपलब्ध असून प्रवेशासाठी बारावीनंतर ‘नीट’ परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. बारावी बोर्डाच्या परीक्षेत फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी आणी इंग्रजी या चार विषयांत मिळून किमान ५० गुण मिळवणारे विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र असतात. महाराष्ट्रातील पुणे ( शिरवळ),मुंबई , उद्गीर, परभणी नागपूर अशा पाच शासकीय महाविद्यालयांतील सुमारे सव्वाचारशे जागांच्या प्रवेशासाठी एकत्रित प्रवेशप्रक्रिया नागपूरच्या पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठामार्फत राबविण्यात येते. यासाठीची सविस्तर जाहीरात ‘नीट’ परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर वर्तमानपत्रांत तसेच विद्यापीठाच्या www. mafsu. ac. in या संकेतस्थळावर प्रसिद्ध होते.

पशुवैद्याकीय पदवीनंतर अठरा विषयांत पोस्ट ग्रॅज्युएशन करण्याची सोय मुंबई , नागपूर , परभणी व अकोला या महाविद्यालयात उपलब्ध आहे. मुंबईचे महाविद्यालय १८८६ मध्ये स्थापन झाले असून आशियातील सर्वात जुने पशुवैद्याकीय महाविद्यालय म्हणून ते ओळखले जाते. मुंबईच्या या महाविद्यालयात पी.एच.डी. करण्याची सुद्धा सोय आहे. संपूर्ण देशातील ४३ शासकीय व चार खाजगी महाविद्यालयांतील १५ जागांचे ( ७३४ जागा) प्रवेश व्हेटर्नरी काऊन्सिल ऑफ इंडियामार्फत केले जातात. या ७३४ जागा भरताना त्यामध्ये शासकीय नियमानुसार आरक्षण ठेवले जाते. ‘नीट’ परीक्षेतील राष्ट्रीय मानांकनाच्या आधारे या जागा भरण्यात येतात. याकरिता विद्यार्थ्यांना vci. admissions. nic. in या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर विद्यार्थी पहिल्या राऊंड मध्ये पोर्टलवर देशभरातील महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदवता येईल आणि विद्यार्थ्याची पसंती आणि त्याचा नीट परीक्षेचा स्कोअर यांची सांगड घालून त्याला प्रवेश जाहीर होईल. या प्रक्रियेमधून देशभरातील ज्या महाविद्यालयात प्रवेश मिळेल तिथे तो दिलेल्या वेळेत घ्यावा लागतो आणि दुसर्या राउंडमध्ये परत निवड प्रक्रियेत सहभागी व्हायचे असेल तर प्रवेश मिळालेल्या महाविद्यालयातील नोडल अधिकार्याला काऊंसेलिंग पोर्टलमध्ये तशी नोंद करण्यास सांगावे लागते.

भारतात आजमितीला असलेले पशुधन लक्षात घेता, पशुवैद्याकीय क्षेत्रात करीअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना भरपूर वाव आहे यात शंकाच नाही. पशुवैद्याक हे फक्त आजारी जनावरांवर उपचार करतात असे नाही तर ते संसर्गजन्य रोगांचे सर्वेक्षण आणि प्रभावी नियंत्रण यासाठीही कार्यरत असतात. जनावरांपासून माणसांमध्ये पसरणाऱ्या रोगांचा फैलाव रोखण्यात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. प्राण्यांपासून मिळणारे दूधदुभते , मांस याची काटेकोर तपासणी करून त्याची गुणवत्ता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्याची महत्वाची जबाबदारी ते पार पाडतात. यामुळे सार्वजनिक आरोग्य सुदृढ राखण्याचे कामही पशुवैद्याकांकडून पार पाडले जाते.
vkvelankar@gmail. com