मागील लेखामध्ये (६ जून) आपण बीएससी (ऑनर्स) पदवी प्रवेशाबद्दल माहिती घेतली. आता लवकरच महाराष्ट्र प्रवेश नियामक मंडळ यांच्याकडून प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. परंतु काही वाचकांनी कृषी शिक्षणातील करिअरबद्दल कमी कालावधीमध्ये पूर्ण होणाऱ्या अभ्यासक्रमांची माहिती द्यावी अशी मागणी केली, म्हणून आपण कृषी पदविका या अभ्यासक्रमाची माहिती या लेखात घेऊ.

महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांतर्गत कृषी पदविका हा अभ्यासक्रम शिकविला जातो. कृषी पदवी अभ्यासक्रमासाठी इयत्ता १२ वी उत्तीर्ण व सीईटी बंधनकारक आहे. ज्यांना हे शक्य नाही, परंतु शिक्षण घेण्याची आवड आहे, अशा १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी कृषी पदविका (ॲग्री डिप्लोमा) ही सुवर्णसंधी आहे. आधुनिक शिक्षणाबरोबरच शेतकरी युवक युवतींनी कृषी व्यवस्थापनासहित कृषी तंत्रज्ञान आत्मसात करावे, म्हणून कृषी परिषदेने कृषी तंत्र निकेतन अभ्यासक्रमास मान्यता दिली आहे.

पूर्वी मराठीत शिकविला जाणारा व दोन वर्ष कालावधीचा असणारा कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम सन २०१९ पासून तीन वर्षे कालावधीचा केला आहे. हा अभ्यासक्रम पूर्णपणे इंग्रजी माध्यमातून शिकवला जातो. सदर अभ्यासक्रम इंग्रजी माध्यमातून शिकविल्यामुळे विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास होऊन त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. तसेच दोन वर्षांचा पदविका अभ्यासक्रमसुद्धा सुरू आहे. या शिक्षणामुळे कृषी जीवनात येणाऱ्या अडचणींवर मात करणे विद्यार्थ्यांना सहज शक्य होते. या शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना कृषि क्षेत्रातील तंत्रज्ञान जसे माती व पाणी परीक्षण, पीक संवर्धन, शेळी मेंढीपालन, दुग्धोत्पादन, फलोत्पादन, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन, मधुमक्षिका पालन, रेशीम उत्पादन व कृषी व्यवस्थापन इत्यादी संबंधित परिपूर्ण व्यवसायाभिमुख शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जातो. कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रमामुळे शेतकरी व शेतमजुरांच्या पाल्यांना शेती विषयांचे प्रात्यक्षिकाभिमुख शिक्षण घेण्यास मदत होते. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो. व ते स्वतःच्या शेतीमध्ये सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करून स्वतःचा आर्थिक विकास करतात.

कृषी तंत्र पदविकाधारक शेतीबरोबरच स्वयंरोजगार सुद्धा उभे करून स्वतःबरोबरच इतरांनाही रोजगार पुरवू शकतो. भागातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन सुद्धा करू शकतो. रोजगार प्रक्रियेबरोबरच नोकरीसाठी शासकीय परीक्षा (स्पर्धा परीक्षा) देऊ शकतात. कृषी पदविकाधारक कृषी विभागाच्या तसेच ग्रामविकास विभागाच्या शासकीय स्पर्धा परीक्षा देऊ शकतात. कृषी सहाय्यक तसेच ग्राम विस्तार विभागामध्ये नोकरी करू शकतात. इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतल्यामुळे उत्तीर्ण उमेदवारांना बीएस्सी (ऑनर्स) कृषी पदवीच्या थेट द्वितीय वर्षात प्रवेश क्षमतेच्या दहा टक्के जागांवर गुणांवर आधारित प्रवेश दिला जातो.

कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रमासाठी अर्जदार हा दहावी उत्तीर्ण व महाराष्ट्रातील रहिवासी असावा लागतो. अर्जदारांना प्रवेश हा रहिवासी जिल्हानिहाय दिला जातो. अर्जदार ज्या जिल्ह्यातील आहे त्या क्षेत्रातील विद्यापीठ कार्यक्षेत्रामधून प्रवेश दिला जातो. अर्जदाराच्या शैक्षणिक पात्रतेनुसार एकच प्रदेश अर्ज विद्यापीठाच्या लिंकवर ऑनलाइन पद्धतीने भरता येतो. खुल्या तसेच आरक्षित प्रवर्गातील अर्जदारांना प्रवेश घेता येतो. कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रमासाठी उमेदवार हा ३० वर्षांपेक्षा कमी वयाचा असावा लागतो. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वयाची अट पाच वर्ष शिथिलक्षम असते. माजी सैनिकांसाठी वयोमर्यादा ४५ वर्षांपेक्षा कमी असते. प्रवेश घेताना इयत्ता दहावी अभ्यासक्रमाचे मूळ गुणपत्रक सादर करावे लागते. अर्जदार ज्या विद्यालयातून शेवटची परीक्षा उत्तीर्ण आहे त्या विद्यालयाचा मूळ शाळा सोडल्याचा दाखला किंवा अर्जदाराने इतर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला असेल तर त्या विद्यालयाचे बोनाफाईड सर्टिफिकेट सादर करावे लागते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुक्त विद्यापीठातून शिक्षणसंधी

ज्यांना कृषि क्षेत्रात करिअर व शिक्षण घेण्याची इच्छा आहे. परंतु नोकरीमुळे किंवा व्यवसायामुळे शिक्षण अपुरे राहिले आहे. अशा गरजू उमेदवारांसाठी महाराष्ट्र शासनाने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांचे कृषी शिक्षणक्रम उपलब्ध करून दिले आहेत. यामध्ये नववी उत्तीर्ण, दहावी उत्तीर्ण उमेदवारांना कृषी पदविका करण्याची संधी मिळते. सर्व अभ्यासक्रम व्यवसायाभिमुख असून ते दूरस्थ अभ्यासक्रमाच्या माध्यमातून शिकवले जातात. यामध्ये कृषी पदविका व उद्यानविद्या पदविका हे दोन अभ्यासक्रम शिकवले जातात. सर्व अभ्यासक्रम शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी पूर्ण केला जातो.