जेईई मुख्य परीक्षेचा दुसऱ्या सत्राचा निकाल एनटीएने बुधवारी (२५ एप्रिल) रात्री उशिरा जाहीर केला. यात दोन मुलींसह ५६ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील सात विद्यार्थ्यांचा समावेश असून नागपूरच्या निलकृष्ण निर्मलकुमार गजरे या विद्यार्थ्याने १०० टक्के गुणांसह बाजी मारली आहे. निलकृष्ण हा मूळचा महाराष्ट्राच्या वाशिम जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याचे वडील वाशिमध्ये शेती करतात. वाशिमध्ये जेईईची तयारी करण्यासाठी उत्तम क्लासेसचा आभाव असल्याने निलकृष्णने नागपूर गाठलं. जेईईची तयारी करण्यासाठी त्याने नागपुरातील एका खासगी कोचिंग क्लासमध्ये प्रवेश घेतला असून तो सध्या नागपुरात राहूनच अभ्यास करतोय.
निलकृष्ण याने यापूर्वी दहावीच्या परिक्षेत ९७ टक्के गुण मिळवले होते. जेईईमधील यशानंतर तो म्हणाला, “या परीक्षेआधी झालेल्या सराव परीक्षेच्या निकालानंतर मी माझ्या उत्तरत्रिकांचं विश्लेषण केलं. त्यानंतर मी माझ्या कमकुवत बाबींवर अधिक लक्ष देऊ लागलोय. जेईईसारखी परीक्षा देण्यापूर्वी आपण आपलं ध्येय निश्चित करायला हवं. मी परीक्षेपूर्वी सातत्याने उजळणी करतो. सर्वाधिक वेळ सरावासाठी देतो.” टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना त्याने त्याच्या यशाचं गमक सांगितलं.
११ वी पासून जेव्हा माझ्या महाविद्यालयीन प्रवासाला सुरुवात झाली तेव्हा सुरुवातीच्या दोन महिन्यांमध्ये मला काही अडचणींचा सामना करावा लागला. कारण १० वीच्या तुलनेत ११ वी आणि १२ वीचा अभ्यास खूप विस्तृत आहे. त्या अभ्यासाशी जुळवून घेताना मला थोडा त्रास झाला. परंतु, मी हार मानली नाही. मी सातत्याने माझा अभ्यास चालू ठेवला. त्यामुळे मला इतर विद्यार्थ्यांना सल्ला द्यायचा आहे की, जेव्हा तुम्हाला असं वाटेल की मी हे करू शकणार नाही तेव्हा हार मानू नका. तुमचे प्रयत्न चालू ठेवा. यातून तुम्हाला चांगले परिणाम पाहायला मिळतील. जेईई अॅडव्हान्स्डमध्ये कॉम्प्युटर सायन्ससाठी मला आयआयटी मुंबईमध्ये माझं स्थान पक्कं करायचं आहे. मी त्या दृष्टीने तयारी चालू ठेवली आहे.
हे ही वाचा >> स्कॉलरशीप फेलोशीप : इनलाक्स शिवदासानी शिष्यवृत्ती
विद्यार्थ्यांना jeemain.nta.ac.in या संकेत स्थळावर जाऊन निकाल पाहता येणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) जानेवारी आणि एप्रिल सत्रासाठी पेपर १ बीई आणि बीटेकचा एकत्रित निकाल जाहीर केला आहे. यामध्ये ५६ उमेदवारांनी १०० टक्के गुण मिळवले आहे. यात दोन मुलींचा समावेश आहे. बहुतांश विद्यार्थी तेलंगणातील आहेत. तेलंगणातील १५, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी सात आणि दिल्लीतील सहा विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. तब्बल २ लाख ५० हजार २८४ मुलांनी आयआयटी प्रवेश परीक्षा जेईई ऍडव्हान्स साठी पात्र ठरले आहेत.