अरुणा बुरटे

‘स्वयंरोजगार महिला संघटना’ अर्थात ‘सेवा’ ही आज ३२ लाखांच्यावर स्त्री सदस्य संख्या असलेली देशातील सर्वात मोठी ‘केंद्रीय कामगार संघटना’ आहे. या अंतर्गत ‘सेवा सहकारी बँक’, ‘सेवा स्वास्थ्य संघटना’ आदीसह अनेक संस्था स्थापन झाल्या असून कामगार चळवळ, सहकार चळवळ आणि स्त्री चळवळ यांचा त्रिवेणी संगम असणाऱ्या या संघटनेची स्थापना करणाऱ्या इला भट्ट यांच्या कार्याची ही स्तिमित करणारी ओळख.

अहमदाबाद येथील कापड बाजारातील मजूर स्त्रियांना त्यांच्या अडचणींबद्दल इला भट्ट यांनी जेव्हा बोलतं केलं, तेव्हा या संवादातून मजूर स्त्रियांच्या लक्षात आलं की, त्या सर्वांचे प्रश्न सारखेच आहेत. त्यापैकी एक, चंदा पापू उत्स्फूर्तपणे म्हणाल्या, ‘‘आपण सर्वांनी मिळून संघटना तयार करायला पाहिजे,’’. तो दिवस होता ३ डिसेंबर १९७१. त्या दिवशी महात्मा गांधीजी आणि अनसूया साराभाई यांनी १९२०मध्ये स्थापन केलेल्या ‘कापड कामगार संघटने’च्या (Textile Labour Association- TLA) या महिला शाखेतून ‘स्वयंरोजगार महिला संघटना’(Self Employed Women’s Association- SEWA) ‘सेवा’चा जन्म झाला. त्याच्या संस्थापक होत्या इला भट्ट.

स्थापनेच्या वेळी ‘राज्य श्रम विभागा’समोर ‘आम्ही कोणाच्या विरुद्ध नाही, एकमेकांना सहकार्य करण्यासाठी एकत्र येत आहोत,’ असा युक्तिवाद इला भट्ट यांनी केला आणि १२ एप्रिल १९७२ रोजी साधारण १०० सदस्य असलेली ‘सेवा’ ट्रेड युनियन म्हणून नोंदणीकृत झाली. आज ३२ लाखांवर सदस्य संख्या असलेली ‘सेवा’ ही स्त्रियांनी संचलित केलेली देशातील सर्वात मोठी स्वयंरोजगार करणाऱ्या स्त्री कामगारांची ‘केंद्रीय कामगार संघटना’ आहे. ती कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही. देशातील १८ राज्यांत आणि ७ दक्षिण आशियाई देशांत ‘सेवा’चा विस्तार आहे. ४,८१३ स्वयंसहाय्यता गट, १६० व्यवसायांनुसार सहकारी संस्था, १५ आर्थिक महासंघ आणि ३ उत्पादक कंपन्या, असा ‘सेवा’चा विस्तार आहे.

स्वातंत्र्य चळवळीत सहभागी असणाऱ्या आधीच्या पिढीचे संस्कार झालेल्या इला भट्ट यांना वकील होऊन गरिबांची सेवा करायची होती. ‘गरिबांबरोबर राहा, त्यांची सेवा करा, स्वत:च स्वत:ला मदत करा, गरिबी हिंसेकडे नेते, गरिबीमुळे माणूस आपलं स्वातंत्र्य गमावतो म्हणून गरिबी हटवली पाहिजे. कामगार आणि भांडवलदार यांच्या भागीदारीतून सामोपचारानं तंटे मिटवता येतात,’ यासारख्या गांधीजींच्या विचारांचा खोलवर ठसा इला भट्ट यांच्या मनावर उमटला होता. हे त्यांच्या पुढच्या आयुष्यातून दिसून आले. गरिबी काय असते, हे समजून घेण्यासाठी इला एक वर्षभर शेतमजूर म्हणून मजुरी करून जगल्या. वकिली शिक्षणानंतर ‘कापड कामगार संघटने’त काम करताना त्यांना कामगारांची स्थिती अभ्यासता आली. त्यातच त्यांना अनसूया साराभाई यांचं मार्गदर्शन मिळालं. आपल्याला परकीय सत्तेपासून १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळालं, पण ‘गरिबीतून सुटका’ या दुसऱ्या स्वातंत्र्यासाठी काम करण्याची गरज आहे, असं इला यांना वाटत होतं त्यामुळेच गरीब स्त्रियांना उत्पादक काम, गरजेप्रमाणे आर्थिक आणि इतर सुविधा पुरवण्याचा त्यांनी निश्चय केला.

त्यांचं म्हणणं होतं, ‘कष्ट करणाऱ्या गरीब स्त्रियांनी मला शिकवलं. संपन्न केलं. आम्ही जोडीनं अनेक प्रयोग केले. काही यशस्वी झाले तर काही फसले. पण चिकाटी सोडली नाही.’ अशा स्त्रियांमध्ये सुपा गोबा, चंदा, लक्ष्मी अशा काही जणींचा समावेश तर होताच, पण त्याच बरोबरीने अनेक उच्चविद्याविभूषित अभ्यासकही ‘सेवा’शी जोडल्या गेल्या. त्यामध्ये अर्थशास्त्रज्ञ देवकी जैन, शिक्षण व वस्त्रनिर्मितीतज्ज्ञ डॉ. कमला चौधरी, स्त्रीवादी अभ्यासक डॉ. वीणा मझुमदार, हार्वर्ड आणि येल विद्यापीठाच्या संशोधक रेनाना झाबवाला, ‘जॉन हॉपकिन्स’मधील मिराई चटर्जी, ‘दस्तकार’च्या लैला तैय्यबजी अशा अनेकजणी आहेत. जगभरातील कष्टकरी स्त्रियांच्या समस्या सार्वत्रिक आहेत. त्यामुळे उपायसुद्धा स्थानिक ते जागतिक पातळीवर करावे लागतील, हे द्रष्टेपण इला यांच्यामध्ये सुरुवातीपासून होते. ‘सेवा’त कोणतंही काम सुरू करण्याआधी त्या प्रश्नांचा अभ्यास आणि सर्वेक्षण हे दोन्ही केलं जातं. परिणामी प्रत्येक अहवालात, धोरणात अदृश्य राहिलेल्या कष्टकरी गरीब स्त्रियांच्या वेदना नोंदवल्या गेल्या. स्त्रियांचे अदृश्य श्रम अर्थव्यवस्थेचा कणा असल्याने त्यांना राष्ट्रीय पातळीवर किमान वेतन आणि इतर सुविधा मिळवून देण्यासाठी ‘सेवा’ने सातत्याने प्रयत्नांची पराकाष्टा केली. स्त्रियांना कर्जातून सुटका मिळावी आणि त्यांची मिळकत वाढावी म्हणून त्यांनी २० मे १९७४रोजी ‘सेवा सहकारी बँक’ स्थापित केली. १९७५मध्ये मेक्सिको येथील ‘आंतरराष्ट्रीय स्त्री परिषदे’त स्त्रियांची ‘आंतरराष्ट्रीय बँक’ स्थापण्याचा संकल्प केला आणि तो १९८१मध्ये वास्तवात आणला.

रस्त्यावर पथारी पसरून भाजी विकून पोट भरण्याचा हक्क गरीब स्त्रीला असावा यासाठी १९७७ मध्ये त्यांचं सर्वेक्षण करून अहमदाबादमधील माणिक चौक येथे त्यांनी संघटित लढा दिला. राज्यसभेच्या सदस्य झाल्यावर, ५ ऑगस्ट १९८८ रोजी राज्यसभेपुढे विक्रेत्यांच्या संबंधीचा ठराव त्यांनी मांडला. १९८८ मध्ये सरकारी आयोगाच्या प्रमुख असताना विविध राज्यांतील असंघटित क्षेत्रांतील स्त्रियांशी प्रत्यक्ष बोलून ‘श्रमशक्ती’ अहवाल सादर केला. एवढा व्यापक अभ्यास याआधी आणि नंतरही सरकारने हाती घेतलेला नाही. ‘सेवा’ने देशातील १४ प्रमुख शहरांतल्या विक्रेत्यांच्या संख्येची मोजणी करून पाटण्यात मुख्यालय असलेली ‘नॅशनल अलायन्स ऑफ स्ट्रीट वेंडर्स इंडिया’ (NASVI)ची स्थापना केली. जगभरातील दहा शहरांतील विक्रेत्यांना एकत्र आणून १९९५ मध्ये ‘रॉकफेलर फाऊंडेशन’तर्फे सर्वेक्षण शिबीर भरवलं. तेथे फेरीवाल्यांच्या हक्कांची घोषणा केली. ‘सेवा’ने ‘हार्वर्ड इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल डेव्हलपमेंट’ या संस्थेच्या मदतीनं १९९६ मध्ये ‘Women in Informal Economy, Globalising and Organising(WIEGO) ची स्थापना केली. ‘International Labour Organisation’(ILO) ने १९९६मध्ये किमान वेतन आणि कामाच्या अटी यावर आधारित घरेलू कामगार यांना अधिकृत संमती दिली. डरबन शहरात ‘होम नेट इंटरनॅशनल’ आणि ‘स्ट्रीट नेट इंटरनॅशनल’चीही स्थापना २००२मध्ये केली. त्यांची ‘सेवा’ संस्था आजही प्रत्येक व्यवसायानुरूप ‘सदस्य संघटना’ आणि ‘व्यापारी सहकारी संस्था’ दोन्हीची स्थापन करते. इस्रायल येथे या रचनेचा इला भट्ट यांनी अभ्यास केला होता. पोलीस, ठेकेदार, मालक, मजूर खाते, सरकारी अधिकारी यांच्या बरोबर व्यवसाय करताना सदस्यांना नेहमीच संघर्ष करावा लागला त्यासाठी संघटनेतील एकोपा त्यांना ताकद आणि आवाज देते. त्यांचं जीवनमान सुधारणं, मिळकत वाढवणं, कर्ज फेडणं, वस्तूंची विक्री करणं, बाजाराशी जोडून घेणं इत्यादीसाठी व्यापारी सहकारी संस्था आधार देते. कुटुंब आणि समाजातील स्त्रियांचं दुय्यम स्थान, त्यांच्यावर होणारे अत्याचार, होणारा भेदभाव याबद्दल जाणीव जागृती होण्यासाठी ‘सेवा’ सदस्य स्त्री चळवळीशी जोडून असतात. देवराला येथील १९८७चे ‘रूपकंवर सती प्रकरण’ झाल्यावर रूपकंवरवर झालेल्या अत्याचाराबद्दल त्यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांना जाहीर पत्र लिहिलं आणि निषेधाचा मूक मोर्चा काढला. अशा रीतीने कामगार चळवळ, सहकार चळवळ आणि स्त्री चळवळ यांचा ‘सेवा’ हा त्रिवेणी संगम आहे.

१९८४ च्या सुमारास या स्त्रियांना बँकेने दिलेली कर्जे का थकीत आहेत, याचा शोध घेताना त्यांच्या लक्षात आलं की, ५०० पैकी २० जणींचा बाळंतपणात मृत्यू झाला आहे. आर्थिक गरजांकडे लक्ष देताना त्यांच्या वैद्याकीय गरजांकडे पूर्ण दुर्लक्ष झाल्यानं स्त्रियांना जीव गमवावा लागला हे वेदनादायक होतं. त्याच सुमारास ‘जॉन हॉपकिन्स’मधील सार्वजनिक आरोग्यतज्ज्ञ मिराई चटर्जी ‘सेवा’त रुजू झाल्या होत्या. त्यांनी सुईणींना डॉक्टरांकडून प्रशिक्षण देऊन ६० आरोग्य सेविका तयार केल्या आणि ‘सेवा स्वास्थ्य संघटना’ स्थापन केली आणि ती १९९० मध्ये नोंदणीकृत केली. दलित समाजातील प्रशिक्षक नंदूबेन या ‘जागतिक स्वास्थ्य संस्थे’च्या मेक्सिकोतल्या तज्ज्ञाच्या समितीत उपस्थित राहिल्या होत्या. गरीब वस्त्यांत तळमळीनं काम, क्षयरोगाचे रुग्ण बरं होण्याचं वाढलेलं प्रमाण, स्वस्त औषध विक्री केंद्र चालवल्यानं औषधांवरील खर्च कमी होणं, ‘परिवर्तन’ प्रकल्पांतर्गत वस्तीतील पायाभूत सुविधा निर्माण केल्यानं सर्वसाधारण आरोग्य सुधारणं इत्यादी सुधारणा ‘सेवा’ करू शकली आहे.

१९८७ मध्ये बनासकांठा येथे काम सुरू करण्याआधी ‘सेवा’ने या भागाचं सर्वेक्षण केलं. तेथील कष्टाळू स्त्रिया भरतकामातून मूर्तिमंत सौंदर्य उभं करतात हे लक्षात आलं. भरतकाम या संस्कृतीनं त्यांना दिलेल्या वरदानातून या स्त्रिया स्वावलंबी होऊ शकतात हे ‘सेवा’नं ओळखलं. सरकारी रोजगार हमीच्या कामात भरतकामाचा समावेश करण्यासाठीच्या प्रयत्नात ‘सेवा’ला यश मिळालं. असाधारण कौशल्य असलेल्या हिरा यांचा ‘कमलादेवी चट्टोपाध्याय मास्टर क्राफ्ट्समन पुरस्कार’ देऊन गौरव झाला, त्यावेळी त्यांच्या गावात आनंदोत्सव साजरा झाला होता.

इला भट्ट यांना हे ‘सेवा’काम करत असताना ८० च्या दशकानंतरची दोन दशकं अनेकदा अस्वस्थ करणारे अनुभवही आले. ‘सेवा’मध्ये गरीब स्तरातील दलित आणि मुस्लीम सदस्यांची संख्या १/३ पेक्षा जास्त आहे. जात आणि धर्म यांच्या अस्मिता पेटवत होणाऱ्या दंगलीत अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं याचा अनुभव त्यांनाही त्या काळात आला होता. त्यातच मातृसंस्था ‘टिएलए’मधून ‘सेवा’ला बाहेर पडावं लागणं, इला यांच्या घरावर दगडफेक होणं, ‘सेवा’ची दोन कार्यालयं आगीत भस्म होणं, ‘सेवा’च्या ४० हजार मुस्लीम सदस्य मदत छावणीत लोटल्या जाणं अशाही गोष्टी त्यांना झेलाव्या लागल्या. ही मानवनिर्मित संकटं त्यावेळी इतकी भीषणपणे ग्रासत होती की ‘सेवा’ला विकास कार्याऐवजी पुनर्वसनाचं काम करावं लागलं. त्याकाळात ‘सेवा’च्या रहिमा-राधा, जैतून-जया, शारदा-सलमा यांना हिंदू-मुस्लीम समाज विरुद्ध बाजूला खेचत होता त्यावर मात करत, धोका पत्करत त्या एकमेकींच्या खुशालीची काळजी घेत होत्या. ‘सेवा’च्या कामाची हीच जादू आहे. ‘भारतातील धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि आपली कष्टाळू जनता हेच आपलं बळ आहे. हे मी माझ्या ‘सेवा’मधील भगिनींकडून शिकले,’ असं इला भट्ट त्याचमुळे म्हणत.

१९७७ मध्ये मिळालेल्या प्रतिष्ठित ‘रॅमन मॅगसेसे पुरस्कारा’सह अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित झालेल्या इला भट्ट यांना ‘पद्माश्री’ आणि ‘पद्माभूषण’ देऊन सरकारतर्फे सन्मानित करण्यात आले आहे. १९९६ मध्ये त्यांनी ‘सेवा’ संस्थेचं महासचिव पद सोडलं तरी अखेरपर्यंत त्या ‘सेवा’त कार्यरत राहिल्या. जे बदल घडावेत म्हणून त्यांनी ध्यास घेतला होता त्यातील अनेक बदल घडलेले त्यांनी पाहिले. शिवाय तरुण, तज्ज्ञ, तळमळीची दुसरी पिढी तयार केली. म्हणूनच ८९ वर्षांच्या इला भट्ट ‘सेवा’च्या ५०व्या वर्धापन दिनाच्या उत्सवात (१२ एप्रिल २०२२) ‘सेवा’च्या सदस्यांना पुढील ५० वर्षांत, येणाऱ्या पिढ्यांसाठी ‘स्वच्छ आकाश’ निर्माणासाठीचा संकल्प करण्याचं आवाहन करू शकल्या होत्या! आणि त्यानुसार आजही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून ‘सेवा’ त्याच तळमळीने पुढे जाते आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

aruna.burte@gmail.com