‘ कटकट करणारी आई!’ हा चतुरंग पुरवणीतील (२१ ऑगस्ट) डॉ. अंजली जोशी यांचा लेख वाचला. सध्याच्या करोनाकाळात कुटुंबीय घरामध्ये जास्त काळ एकत्र राहात असल्याने हा ताण जीवघेणा झालेला आहे. कारण इतर वेळी कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापल्या कामात व्यग्र असल्याने एकमेकांशी कमी संबंध येत होता. त्यामुळे प्रत्येकाला स्वत:ची ‘स्पेस’ एन्जॉय करावयास मिळत होती, परंतु आता ही स्पेसच हरवली असल्याने प्रत्येकाला एकमेकांचा सहवास नकोसा वाटू लागलेला आहे. मुलामुलींची स्थिती कोंडवाड्यात अडकल्यासारखी झाल्याने पाल्यांवर जास्त तणाव येत आहे. त्यात पुन्हा आईवर्गाचा ताण वाढत असल्याने त्याला वाट मोकळी करून देण्यासाठी घरात असलेली मुलेच या ताणतणावाची शिकार होत आहेत. या लेखात आईचे कुठले वागणे कटकटीचे वाटते हे नियमावलीमध्ये शब्दबद्ध केलेले आहे. त्यामुळेच आई कटकट करते, असे पाल्याला वाटत आहे. खरे तर आईची स्वत:च्या मुलीशी जास्त लवकर मैत्री होते तशी वडिलांची मुलांबरोबर कधीच गट्टी जमत नाही. तरी पण काळजीपोटी आई पाल्यांकडे जास्त बारकाईने लक्ष ठेवत असल्याने आईच जास्त कटकट करते, असे पाल्यांना वाटणे स्वाभाविक आहे. आईवडिलांनी सध्याची करोनाकालीन काळाची गरज ओळखून पाल्यांवर जास्त ताणतणाव येईल असे प्रसंग जाणीवपूर्वक टाळले पाहिजेत. त्याने घरातील नातेसंबंध सुधारतील आणि टोकाची भूमिका घेण्याच्या घटना टाळता येतील. - शुभदा गोवर्धन, ठाणे सामंजस्याचा स्वीकार ‘कटकट करणारी आई’ या लेखामधून डॉ.अंजली जोशी यांनी आई आणि मुले यांच्या मानसिकतेच्या पैलूंचा केलेला उलगडा पालकांनी जरूर वाचायला हवा. मुलांकडून अपेक्षित असलेल्या गोष्टींचे,वागणुकीचे पालन आपल्या दैनंदिन जीवनात पालकांनी केल्याचा आदर्श मुलांसमोर ठेवायला हवा. मुलांना सारख्या सूचना देण्याची वेळ का येते याचाही मागोवा घ्यायला हवा. सारखा धोशा न लावता घरातील सर्वांसमोर आई -वडिलांनी आपली बाजू योग्य प्रकारे मांडली, म्हणजे आईला एकटीला वाईटपणाही येणार नाही. - नितीन गांगल, रसायनी