ताणतणाव, अस्वस्थता यांतून बाहेर पडायचं असेल तर आंतरिक शक्ती वाढवण्यावर भर द्यायला हवा. पण आपण लहानपणापासून मुलांना फक्त भीती घालतो आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष त्यांच्या ताणतणावांना खतपाणी घालतो.
पं धरा ते वीस वर्षांआधी ‘स्ट्रेस’ वा ताण हा शब्द मुळी रोजच्या जगण्याचा भाग नव्हताच. आपण ‘थोडी चिंता आहे’ किंवा ‘टेन्शन आहे’ असंच म्हणायचो, पण आज मात्र आपण त्याहीपेक्षा एक पाऊल पुढे गेलोय. हे पाऊल आहे आमच्या अस्तित्वावरच प्रहार करणाऱ्या स्ट्रेसचं!
आपला रोजच्या जगण्यातला आनंद गायब होण्याचे एक महत्त्वाचे कारण ताणतणावदेखील आहे. काय आहे हा ताणतणाव? जेव्हा आपल्यासमोर प्रतिकूल परिस्थिती येते तेव्हा ती परिस्थिती किंवा काही गोष्टी स्वीकार करण्यासाठी किंवा सहन करण्यासाठी जी आंतरिक क्षमता गरजेची असते ती जर कमी प्रमाणात असेल तर आपणांस ताण येतो.
आज ताण सर्वाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे इतका की आपण सर्वजण हे गृहीत धरून चाललो आहोत की तणाव स्वाभाविकच आहे. पण खरंच तो स्वाभाविक आहे का? स्ट्रेस या शब्दाचा वापर व्यावसायिक जग व व्यावहारिक जगापुरता मर्यादित राहिलेला नसून विद्यार्थीवर्ग देखील त्यांच्या शैक्षणिक जगात या शब्दाचा वापर करताना दिसतात.  Student life is the best life  असं म्हटलं जातं. पण आज त्याच स्टुडंट लाइफमध्येही तणावाने शिरकाव केला आहे.
जेव्हा माझ्या व्यावसायिक आयुष्यात तणावाची परिस्थिती ओढवते, तेव्हा मी ती स्वत:पुरतं सीमित ठेवतो-ते. पण जेव्हा घरातील मुलाच्या परीक्षेची वेळ येते तेव्हा मात्र घरातील सगळे वातावरणच बदलून जाते. आजच्या लोकांच्या मते तणाव असणं हीदेखील एक प्रतिष्ठेची गोष्ट आहे, कारण जर का तुम्ही रिलॅक्स असाल. त्याचा अर्थ तुम्ही या परीक्षेबाबतत बेफिकीर आहात. अन्यथा स्पर्धेचा ताण येणे अपरिहार्य आहे. Stress is a form of Pain that comes to tell me there is something I need to change. आणि Pain is a messenger that tells me there is something I need to learn  थोडक्यात, स्वत:च्या विचारधारेत, स्वभावात, जीवन जगण्याच्या पद्धतीने बदल आणावा लागतो.
पूर्वीच्या काळी मुलांच्या परीक्षा वर्षांतून एक-दोनदा व्हायच्या. पण आज मात्र आठवडी परीक्षा, महिन्याची परीक्षा हल्ली तर सरप्राइज टेस्टही असते. त्यामुळे विद्यार्थी सतत परीक्षेच्या दबावाखाली राहतात. आजचे घराघरांतील महत्त्वाचे दृश्य, जेव्हा आपल्या बाळाला शाळेत दाखल करायचं असतं त्यावेळी खरेतर आई-वडीलच जास्त तणावात असतात. आपल्या मुलाला-मुलीला या शाळेत प्रवेश मिळेल की नाही, त्याच्या दृष्टीने हीच शाळा सर्वतोपरी योग्य आहे, पण जर का त्याला या शाळेत प्रवेश मिळाला नाही तर काय? अशा सर्व विचारांमुळे आलेली भीती जशी आई-वडिलांच्या मनात असते. तशीच ती त्या लहानग्यांच्याही मनात निर्माण केली जाते. आई-वडील त्याची खूप तयारी करून घेतात. त्याला रागावून व प्रसंगी मारूनही या इन्टरव्ह्य़ूसाठी तयार केलं जातं. आई-वडील त्याला सांगतात, ‘‘तुला या शाळेत जावंच लागेल.’’ आयुष्य उमलायची वेळ असते ती. खरेतर जीवनाबद्दलचा आत्मविश्वास वाढवला गेला पाहिजे, पण प्रत्यक्षात वाढते काय तर भीती व असुरक्षितता, तीच मनात भरवली जाते. इथूनच खरे तर मुलांना, तणावाची जाणीव होते. जसजसं मूल पुढील वर्गात जायला लागते, तसतसे त्याचा इतर सांकृतिक कार्यक्रमात व आजच्या वेगवेगळय़ा स्पर्धात्मक परीक्षांना बसवलं जातं. या सगळय़ात मुलांच्या मनाचा कितपत विचार होतो.
आजकाल स्पर्धा वाढली आहे. अभ्यासक्रम बदलला आहे. व्यापक झाला आहे. म्हणून तो बदलण्याची मागणी पालकांकडून होते. कारण त्यांना वाटतं त्यामुळे मुलांचा तणाव कमी होईल. आता इथे आपण केंद्रित कशावर होतोय तर शैक्षणिक दबावावर. म्हणजे जेव्हा हा दबाव कमी होईल तेव्हा मुलांचा तणाव कमी होईल, असं पालकांना वाटतंय. खरं तर ज्या गोष्टी माझ्या नियंत्रणाबाहेर आहेत आणि त्याच गोष्टींवर मी माझे लक्ष केंद्रित केले तर माझा तणाव निश्चितच वाढत जाईल. कुठलीही  प्रतिकूल परिस्थिती येते तेव्हा आपण १० टक्के दबावाखाली असतो अशावेळी ९० टक्के  असणाऱ्या आंतरिक क्षमतेवर विश्वास ठेवणं आवश्यक असते. ते १० टक्के माझ्या आवाक्यात नाही, पण ९० टक्के माझ्या ताब्यात आहे त्याचा कसा फायदा करून घेता येईल हे महत्त्वाचे. पण आपण ९० टक्क्यांकडे म्हणजे आपल्या आंतरिक क्षमतेकडे लक्ष न देता १० टक्क्य़ांवर म्हणजे तणावाच्या कारणांवरच लक्ष केंद्रित करतो. त्यामुळे तणाव वाढतच जातो.
 इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आंतरिक शक्ती वाढली पाहिजे हे अगदी बरोबर आहे, पण तरीही परिस्थितीची भीती वाटतेच ना. जसे गुजरातमध्ये भूकंप आला, त्यात सगळ्यांचेच खूप नुकसान  झाले. त्यामुळे त्यानंतर सगळ्यांनी भूकंपविरोधी गोष्टींकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. घरं वेगळ्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न झाला, पण त्यानंतर त्याच्याही पेक्षा विनाशी त्सुनामी आली. त्याचा सामना करायला पुन्हा आपण कमी पडलो. परिस्थिती कधी छोटी तर कधी मोठी असते. पण तिचा सामना करण्यासाठी आपण तितकेसे तयार नसतो. कारण आपण परिस्थितीच्या मुळाशी जात नाही. घरं मजबूत करण्यापेक्षा मन मजबूत करणं खरं तर गरजेचं असतं. आताचे अनेक पालक मुलांना म्हणतात, ‘‘तुम्हाला जितके गुण मिळतील आमच्यासाठी पुरेसे आहेत. आम्ही त्यात खूश असू. आमची काही अपेक्षा नाही.’’ पण हे बोलणं खरंच मनापासूनचं असतं की वरवरचं? कारण ‘तू टेन्शन घेऊ नको’ असं एका बाजूला सांगत असताना त्याची भीती तेच घालताना दिसतात. एका बारावीतल्या मुलीला भेटले. तर ती म्हणाली, ‘‘मला खूप स्ट्रेस आहे. मला ‘आयआयटी’ला जायचे आहे. लवकरच  प्रवेश परीक्षा सुरू होईल. मला स्वत:ला अभ्यास करायचाय, पण जसा मी घरात प्रवेश करते तसं माझे बाबा सारखं सांगत राहातात, ‘अभ्यास कर, अभ्यास कर. हीच वेळ आहे, संधीचं सोनं करण्याची! ’ हे सारखं सारखं ऐकून मी वैतागले आहे. मी यापूर्वी अभ्यास करायची. आता तेवढादेखील अभ्यास माझ्याकडून होत नाही. कारण माझ्या मनात सतत बाबांची वाक्यं फिरत राहतात. कॉलेज सुटल्यावर घरी जाण्याचीदेखील माझी इच्छा होत नाही. कारण घरी गेलं की बाबांचं परत तेच सुरू होतं. तीच तीच वाक्यं!
कधी कधी मुलांना त्यांच्या भवितव्याबद्दलच भीती वाटते. माझं काय होईल? मी खरंच अभ्यास करू शकेन का? की माझ्याने काहीच होणार नाही? समजा, मला चांगले गुण नाही मिळाले तर आई-बाबांना काय वाटेल? माझे शिक्षक व माझ्या मित्रपरिवार यांच्यासमोर माझी प्रतिमा कशी असेल? अशा नकारार्थी संकल्पांच्या चक्रव्यूहात ती मुलं अडकतात. मग अशी मुलं अभ्यास करण्यासाठी बसली तरी फक्त पानावर पानं उलटवत राहतात. तेव्हा आपण समजू शकतो की ही मुलं तणावात आहेत. आणि तणावाच्या मनस्थितीत वाचलेलं लक्षातही राहत नाही व त्यामुळे ती मुलं ही चांगल्या प्रकारे उत्तरही लिहू शकत नाहीत. गुण मिळवू शकत नाहीत. आजच्या या मानसिक स्थित्यंतराचा जबाबदार कोण? अर्थात आपणच. आज बहुतांश व्यक्तींना मानसिक दृष्टय़ा मोकळं वाटत नाही. त्यामुळे ही मानसिक आजारपणाची भावना तणाव निर्माण करायला कारणीभूत ठरते. म्हणूनच म्हटले जाते, कल्ल In this age, human beings left their original nature of EASE and thus have become DIS-EASED.ऊकर-एअरएऊ.
(पुढच्या अंकात (२१ जून) तणावावर मात कशी कराल याविषयी.
(प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या ओम शांती मीडिया या वृत्तपत्र विभागाद्वारा प्रकाशित झालेल्या आध्यात्मिक प्रवचनांचा मराठी अनुवाद)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Relaxation from anxiety
First published on: 07-06-2014 at 01:08 IST