मंदार जोशी शाळा-महाविद्यालयातले सगळे शिक्षक आपल्या कायम लक्षात राहात नाहीत. पण एखादे शिक्षक असे भेटतात, की ते पुस्तकी ज्ञानाच्या बाहेरचं बरंच काही आपल्या मनावर बिंबवतात. शाळा-कॉलेज सुटल्यावरही त्या शिक्षक वा शिक्षिकेची आठवण मनात कायम राहते. जीवनाच्या शाळेत गुरुस्थानी राहिलेल्या शिक्षकांबद्दल वाचकांच्याच शब्दांत.. ‘मला घडविणारा शिक्षक’ या नव्या सदरात दर पंधरवडय़ाने. मी त्या वेळी सहा-सात वर्षांचा असेन. दापोलीला घराजवळच्या पोस्ट ऑफिसच्या पहिल्या मजल्यावर कॉलेजमधल्या मुलांच्या नाटकाची तालीम चालू होती. ‘प्रेमा तुझा रंग कसा’ हे नाटक असावं. नाटकाचे दिग्दर्शक होते मुकुंद पेंडसे सर. मी खूप वेळा या तालमी बघायला जात असे आणि त्यात बुडून जात असे. प्रत्येक संवादाचा आणि त्यामागच्या लेखकाच्या भूमिकेचा अन्वयार्थ तळमळीनं समजावणारे सर मला अजूनही आठवतात. वय लहान होतं त्यामुळे तपशील आठवत नाही, पण नाटक बसवणं ही एक खूप छान गोष्ट आहे हे नक्की कळलं होतं. पेंडसे सरांची आणि माझी ही खऱ्या अर्थानं झालेली पहिली भेट! नंतर मात्र अगदी भरताच्या नाटय़शास्त्रापासून नाटक कसं वाचावं, पाहावं, या सगळय़ाचा सखोल अभ्यास त्यांच्याच मार्गदर्शनाखाली करायला मिळाला. खरंतर मला व्हायचं होतं इंजिनीअर, पण बारावी सायन्सच्या परीक्षेत मी गटांगळय़ा खाल्ल्या. त्यानंतर अतीव निराशेनं बारावी कला शाखेला दापोलीमध्येच वराडकर महाविद्यालयात प्रवेश घेतला. वर्षभरातच मराठीचे शिक्षक म्हणून मला पेंडसे सर शिकवायला आले आणि त्यानंतरच्या दोन महिन्यांतच त्यांनी माझा कला शाखेकडे आणि मराठी साहित्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला. मराठी साहित्य हा केवळ एक विषय नसून जीवन समृद्ध करणारा व्यापक अनुभव आहे, याचा प्रत्यय सरांनी सतत आम्हाला दिला. त्यानंतरची साधारणपणे तीन वर्ष म्हणजे आमच्यासाठी ‘ड्रीम रन’ होती. त्या काळात फावल्या वेळात मी कॉलेजच्या ग्रंथालयात मदत करायला जाऊ लागलो. पेंडसे सरांनी एखादं पुस्तक सुचवायचं, मी ते मिळवून अधाशासारख संपवायचं आणि मग सरांशी त्या पुस्तकाबद्दल गप्पा मारायच्या. माझ्या वाचनाला दर्जा आणि उंची मिळाली ती सरांमुळे. एखादी कलाकृती वाचावी कशी, अनुभवावी कशी, हे आम्ही सरांकडून शिकलो. जी कलाकृती उत्तरं देण्यापेक्षा प्रश्न निर्माण करते, वाचकाला आनंदी करण्यापेक्षा अस्वस्थ करते, ती खरी कलाकृती, हे सरांचं विवेचन नंतर पुरेपूर पटलं. आनंद यादवांच्या ‘गोतावळा’मधलं यंत्र संस्कृतीचं मानवावरचं आक्रमण, गौरी देशपांडेंच्या ‘एक एक पान गळावया’ मधली मुक्त होऊ पाहणारी नव्या जगातली स्वतंत्र स्त्री, विजय तेंडुलकरांच्या ‘कमला’ मधली पत्रकार असणाऱ्या नवऱ्याचं सुप्त शोषण उघड करणारी नायिका, या सगळय़ांची सरांनी जवळून ओळख करून दिली. त्या वेळी नीटसे न उमजलेले संदर्भ आज जगताना जेव्हा समजतात, तेव्हा सरांच्या सशक्त शिकवण्याची पुन्हा एकदा जाणीव होते. सरांनी नुसता मराठी विषय शिकवला नाही, तर जगायचं कसं या एका मोठय़ा अभ्यासक्रमाची एक सुरेख सुरुवातच करून दिली असं आज वाटतं. पेंडसे सरांना निव्वळ परीक्षार्थी नव्हेत, तर चांगले जीवनार्थी तयार करण्याचा ध्यास होता. माझ्यापुरता त्यांचा हा प्रयास यशस्वी झाला असं म्हणायला आता हरकत नाही. त्यांनी माझ्यामध्ये ज्ञानलालसेची अशी काही बीजं पेरली आणि साहित्याच्या अभ्यासामधून असा काही आत्मविश्वास मला मिळवून दिला, की कॉलेज संपल्यावर मी फक्त कला शाखेचा पदवीधर आहे, असा न्यूनगंड मला वाटला नाही. सैद्धांतिक पातळीवर जीवनाची बैठक सरांमुळे इतकी पक्की बसली होती, की नंतरच्या व्यावसायिक आणि व्यक्तिगत संघर्षांच्या काळात माझा कधीच अर्जुन झाला नाही. आजही लौकिकार्थानं मी खूप यशस्वी वगैरे नाही, पण समाधानी नक्कीच आहे. कामाच्या धबडग्यात आजकाल वाचणं फारसं होत नाही, पण आत कुठेतरी निर्माण झालेलं स्फुल्लिंग स्वस्थ बसू देत नाही. सतत नवीन सुचत असतं. ही क्षमता निर्माण करण्याचं श्रेय मी निश्चितच सरांना देईन. आज पेंडसे सर आपल्यात नाहीत, पण त्यांची आठवण सदैव माझ्या, त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांसोबत राहील. प्रोत्साहनातून क्रीडापटू घडवणाऱ्या बाई! सुवर्णा भावे जोशी एकदा का रोह्याच्या आणि शाळेच्या आठवणी यायला लागल्या, की एकापाठोपाठ एक येतच राहतात. माझ्या मते महाविद्यालयीन जीवनापेक्षाही आमच्या ‘मेहेंदळे हायस्कूल, रोहा’मध्ये व्यतीत केलेलं शालेय जीवन निश्चितच जास्त छान, मनावर खोल परिणाम करणारं होतं. तिथे मला लाभलेल्या उत्तमोत्तम शिक्षकांचा माझ्यावर खूप मोठा प्रभाव आहे, आजही. त्यामुळे ‘मला घडविणारा शिक्षक’ या विषयावर लिहायचं म्हटल्यावर मला माझ्या शिक्षिका इंदुताई मळेकर यांचीच आठवण झाली. इंदुताई म्हणजे खेळाडू असलेल्या यच्चयावत सगळय़ांच्या लाडक्या मळेकर बाई! आज जितक्या सहजतेनं मुली कोणत्याही स्पर्धेत भाग घेतात, त्यासाठी परगावी काय परदेशातही सहज जातात, त्यांना हवं-नको ते पालक अगत्यानं घेऊन देतात; पण मी आठवणी सांगतेय तेव्हा, म्हणजे सत्तरच्या दशकात आम्ही मुली कबड्डी, खोखो किंवा अॅथलेटिक्समध्ये भाग घ्यायचो, तेव्हा आम्हाला या गोष्टी सहजसुलभ नव्हत्या. आमचे पीटीचे शिक्षक हातकमकर सर, आवळसकर सर, कुमार पेंडसे सर होतेच. ते प्रॅक्टिस करून घेत; पण आमच्या सहभागाबाबत पुढाकार मात्र मळेकर बाईंचाच असे. अभ्यासातून वेळ काढून प्रॅक्टिस करणं, याला पालक सहजासहजी तयार होत नसत; पण मळेकर बाई आहेत म्हणजे मुली गैर काही करणार नाहीत, अभ्यासाकडे दुर्लक्ष होणार नाही, याची खात्री असे पालकांना! आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत भाग घेण्यासाठी अलिबाग किंवा महाडला जाऊन दोन-तीन दिवस राहाणं, याला कोण परवानगी देणार? खेळताना मुलींना सुटसुटीत पोशाख म्हणून हाफ पँट आणि टी शर्ट घालायलाही पालक सहजासहजी परवानगी देत नव्हते. मग मळेकर बाई अशा पालकांना भेटून त्यांची समजूत काढत. तो काळ सहज नवीन खरेदी करण्याचा नव्हता. मग तात्पुरती कुणाची हाफ पँट मागायची, याबाबतीतसुद्धा मळेकर बाई मदत करत. पहिल्यांदा जेव्हा तो पोशाख घातला होता तेव्हा संकोच वाटला होता, पण एक सोय म्हणून त्याकडे पाहायची दृष्टी बाईंनी शिकवली. एखाद्या मुलीला काही त्रास होत असेल, विशेषत: मासिक पाळीचा, तरी त्या नि:संकोचपणे आमच्याशी बोलून मनातलं काढून घेत, पुढची मदतही करत. या गोष्टीवर उघड बोलायची तेव्हा पद्धतच नव्हती; पण तरी मुलींशी मोकळेपणानं बोलणाऱ्या मळेकर बाईंचं वेगळेपण मला नंतर उमजलं. मुलींनी स्वत:च्या प्रकृतीकडे लक्ष दिलं पाहिजे, नियमित व्यायाम केला पाहिजे, चौरस आहार असला पाहिजे, या गोष्टींवर त्या भर द्यायच्या. जे आयुष्यभरासाठी कामी आलं. आता आम्ही पुढच्या पिढीला मदत करतो. आंतरशालेय क्रीडा स्पर्धा अलिबाग इथे असत. मळेकर बाई निघायच्या अगोदर बरोबर काय काय घ्यायचं इथपासून मार्गदर्शन करत. त्यामुळे जाण्याआधीपासून मनाची एक तयारी झालेली असे. तिथे गेल्यावर साधं हॉटेलमध्ये जेवायला जायलाही आम्हाला संकोच वाटे! कारण रोह्यात हॉटेलमध्ये जायचा काही प्रश्नच नव्हता; पण हॉटेलमध्ये विनासंकोच कसं जायचं, ऑर्डर कशी द्यायची, हे सगळं मळेकर बाईंनी शिकवलं. त्याचाही आयुष्यभरासाठी उपयोग झाला. अगदी पहिल्या वर्षी आमची मॅच संपल्यावर आम्ही मैदानाच्या कडेला जाऊन बसत होतो. बाईंनी आम्हाला लगेच थांबवलं. ‘‘बाहेर कुठे निघालात? आता सुरू होईल ती मॅच बघा. त्यात जिंकणाऱ्याशी आपली मॅच होईल. कोणता खेळाडू उत्तम खेळतो, त्याचं वैशिष्टय़ काय, कोणता खेळाडू कमजोर आहे, दोन्ही संघांचे डावपेच, हे समजून घ्या. मॅच पाहणं हासुद्धा अभ्यास आहे. आपली मॅच संपली की झालं, असं करून इतकी मोठी स्पर्धा जिंकता येत नाही.’’ तेव्हा आम्ही इतकी मोठी गोष्ट शिकलो, की आयुष्यभर तिचा वेगवेगळय़ा ठिकाणी उपयोग झाला. कधी पंचांनी दिलेला निर्णय पटला नाही, तरी आरडाओरड करायची नाही, सभ्यपणे सांगून बघायचं, नाही तर गप्प बसायचं. खेळाचे नियम आणि पंचांचे निर्णय हे अंतिम असतात, हे तत्त्व बाईंनी शिकवलं, ते मनावर ठसलं आहे. उगाच कुणाशी वाद घालत बसायचं नाही, सत्य मान्य करून पुढे जायचं हे अंगी बाणलं. एक क्रीडा समन्वयक व्यक्ती मनात आणलं तर किती उत्तम काम करू शकते, याचं मळेकर बाई एक उदाहरण होत्या. शाळेच्या वेळेतच काय ते खेळ घेतले की झालं, असंही त्या करू शकल्या असत्या, पण भूमिकेशी समरस होऊन त्या आमच्या सर्वार्थानं मार्गदर्शक झाल्या. आम्ही वक्तृत्व स्पर्धेत भाग घेऊन आंतरशालेय पातळीवर यश मिळवावं यासाठीही बाई मदत करत. भाषण पाठ केल्यासारखं रटाळ नसावं, आपण उत्स्फूर्त, आपल्या मनातलं बोलतोय असं वाटलं पाहिजे, असं बाई म्हणायच्या. मुलींनी नीटनेटकं राहावं, उगीच भडक कपडे, भडक पावडर-कुंकू नसावं, साधं राहिलं तर त्याचा परिणाम जास्त होतो, हे त्या आम्हाला नकळत शिकवत होत्या. आजही ते आचरणात आणलं जातं. आम्ही शाळेतून कॉलेजमध्ये गेलो, बाईंचंही लग्न झालं. मग कधी तरीच भेट व्हायची. मला बाईंबद्दल काय वाटतं हे त्यांना सांगायचं मात्र राहूनच गेलं, ती हळहळ मात्र आता आयुष्यभरासाठी राहील. २१ जानेवारी २०२१ रोजी बाईंना देवाज्ञा झाली, पण आम्हा विद्यार्थिनींच्या मनात मळेकरबाई सदैव जिवंत राहतील.