– मंजूषा देशपांडे

एका विशिष्ट वयानंतर नोकरीतून निवृत्ती घ्यावीच लागते. वय आपल्या तक्रारी कुजबुजत सांगायला लागतं, अधिकार पदाचा मान थांबलेला असतो, दर महिना नियमित येणारी रक्कम बंद किंवा कमी होते, रोजची धावपळ, वेग कमी होतो, कधी नव्हे इतकं घरात अडकून पडल्यासारखं वाटतं, आधी हवी असणारी शांतता आता मात्र खायला उठते आणि समोर उरतो तो अजगरासारखा सुस्तावलेला न सरकणारा काळ… हे तेव्हाच होतं जेव्हा तुम्ही निवृत्तीपूर्वी पुढचा वेळ कसा घालवणार हे ठरवलेलं नसतं… किंवा त्याप्रमाणे वागत नसता तेव्हा…

तुम्ही आहात का त्यात?

दोन वर्षांपूर्वी ‘महिला बाल कल्याण अधिकारी’ म्हणून निवृत्त झालेल्या माझ्या एका मैत्रिणीचा मला फोन आला. एरवी उत्साहाने खळखळणारा तिचा आवाज खोलवर गेलेला जाणवला. योगायोगाने दुसऱ्याच दिवशी तिची रस्त्यात गाठ पडली आणि तिला पाहून मला आश्चर्यच वाटलं. नोकरीत असताना टकाटक राहणारी सुनीता, तिचा तो पडलेला चेहरा, इस्त्री न केलेले कपडे… एकदम उदास वाटली… तिच्या बोलण्यातून एकच वाक्य कानावर आदळत होतं, वेळ खायला उठतेय…

सुनीताला एकच मुलगी, तिचं लग्न होऊन ती नवऱ्याबरोबर दिल्लीला आहे, त्यामुळे येणं-जाणं कमी. तिला प्रवासाची अजिबात आवड नाही. त्यात पाठदुखीचा त्रास असल्याने प्रवास झेपत नाहीत. याउलट तिचा निवृत्त नवरा सतत प्रवासाचे नवनवे प्लॅन्स करत फिरत असतो. अधिकारपदामुळे असेल कुणातही फार न मिसळण्याच्या स्वभावामुळे तिला सततची ‘गेट टुगेदर्स’ आणि ‘प्रवास’ यांचा अगदी वैताग आलाय. तिघांच्या कुटुंबातली ती आता एकटी पडल्यासारखी झाली आहे. तिचा आत्मविश्वास डळमळीत झाला आहे. खरं तर हे अपवादात्मक उदाहरण असलं तरी काही प्रमाणात ते प्रातिनिधिकही आहे.

गेल्या दहा वर्षांत माझ्या बऱ्याच मैत्रिणी कुणी शैक्षणिक क्षेत्रातून, कुणी बँकेतून तर कुणी शासकीय क्षेत्रातल्या अधिकारपदावरून निवृत्त झाल्या आहेत. या साऱ्या मैत्रिणी संघटित, शासकीय किंवा निमशासकीय क्षेत्रात चांगल्या पदावर कार्यरत असल्यामुळे निवृत्तीनंतर त्यांना आर्थिक चिंता नाही. त्यांना प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युइटी सर्व काही मिळालेले आहे. तसेच भरपूर निवृत्तिवेतन मिळतं आहे. खरं तर निवृत्तीपूर्वीची एक-दोन वर्षं त्या सर्व जणी निवृत्त झाल्यावर काय काय करणार याच्याच जास्त गप्पा मारत. कुणी म्हणे, मी आता घराकडे पूर्ण वेळ लक्ष देणार आहे, घराचा अगदी कायापालटच करून टाकणार, काही जणी म्हणत, मी सकाळी अजिबात लवकर अंथरूण सोडणार नाही. आणि पैसे मिळविण्यासाठी नवीन उद्याोग करणार नाही. भरपूर पुस्तकं वाचेन, सगळं जग पाहीन, चित्रपट, नाटकं, लाइव्ह प्रोग्रामना जाईन, आत्तापर्यंत जाऊ न शकलेल्या नातेवाईकांच्या सगळ्या सण-समारंभांना यापुढे जाणारच, असे मनसुबे रचले जात होते. यातल्या बहुतेकींना मुलं लहान असताना पाळणाघरात किंवा कुणाकडे तरी सोडून नोकरीवर जावं लागत असल्यानं निदान भरपाई म्हणून नातवंडांसाठी पूर्ण वेळ देतील असंही त्या मनोमन ठरवत. पण प्रत्यक्षात जेव्हा त्या निवृत्त झाल्या तेव्हा काही काळ ते त्यांनी केलंही, पण पुढे?

त्यातल्या जवळपास सर्व जणींसाठी नोकरीबरोबर आलेल्या अधिकारपदाच्या वलयातून बाहेर पडून सर्वसामान्य गृहिणीचं आयुष्य जगणं हे आयुष्यातलं सर्वात मोठं आणि अवघड स्थित्यंतर होतं. त्यापैकी बहुतेकींना सलग चोवीस तास घराची सवय नाही किंवा घरालाही त्यांची सवय नाही, हीच त्यातली सर्वांत मोठी गोम होती.

विद्यापीठातील महत्त्वाच्या पदावरून निवृत्त झालेल्या माधवीला ती कोणताही पदार्थ करायला आली की तिची स्वयंपाकाची बाई सतत सूचना करत असते, हे असं नाही, ते तसं करा. सुरुवातीला तिनं ते हसण्यावारी नेलं, पण तिच्या घरातील अकार्यक्षमतेमुळेच तिला ते ऐकून घेणं भाग आहे, अशी काहीशी समजूत माधवीनं करून घेतली आणि त्याचं रूपांतर कायमस्वरूपीच्या नाराजीत झालं. पुष्पाताई आयकर आयुक्त पदावरून निवृत्त झाल्या आहेत. त्यांचा जोडीदार व्यावसायिक होता. दोघांनाही आयुष्यभर एकमेकांबरोबर घालवायला वेळ मिळाला नाही. त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांनी चांगला महिनाभराचा युरोप प्रवास ठरवला होता. पण नवऱ्याचं आकस्मिक निधन झालं. घरात मुलगा, सून, दोन नातवंडे सगळी आपापल्या व्यापात असायची. काही दिवस त्यांनी घरात रमण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या स्वत:च्या घरात त्यांची जागाही, त्यांच्या विशेष पदाच्या कौतुकासारखीच राखीव होती. त्यांनी एकदा हौसेनं दुपारचा सगळा स्वयंपाक केला. त्यांच्या मुलाला आणि सुनेला आश्चर्याबरोबर अपराधीही वाटत राहिलं की आईला आपण कशातही सामील करून घेतलं नाही याचं. घरातले छोटे-मोठे निर्णय त्यांच्या अपरोक्ष घेतले जायचे. कारण तेव्हा त्यांच्याकडे वेळ नसायचा. पण आताही ‘आईनं घरी काय राहायचं. बाहेरच्या जगात बदल घडवणं, हे तिचं खरं काम आहे,’ असं त्यांचा मुलगा कोणाला तरी सांगत असताना त्यांनी ऐकलं. त्या म्हणाल्या, ‘‘मला त्याला अगदी ओरडून सांगावंसं वाटलं. बाबा रे, मी आयुक्त नंतर बनले. अगोदर मी बाई, बायको आणि आई आहे. या घरातली गृहिणी आहे. करू दे ना मला आवडतंय ते आता.’’ पण शेवटी त्या घरातून बाहेर पडल्या आणि त्यांनी कोकणातील एक शाळा दत्तक घेतली. तिथं त्या उत्तम काम करत आहेत.

तीन-चार महिन्यांपूर्वी ‘आव्हान’ या आयपीएचच्या यूट्यूब चॅनेलवर डॉ. आनंद नाडकर्णींनी आय.पी.एस. पोलीस अधिकारी मीरान् चढ्ढा बोरवणकर यांची मुलाखत घेतली होती. त्यांनाही निवृत्तीनंतरची एक-दोन वर्षं जड गेल्याचं त्यांनी सांगितलं. या मुलाखतीत त्या म्हणतात, ‘‘वर्दी असताना आपण शंभर माणसांना मदत करू शकतो. निवृत्त झाल्यावर आपल्या आयुष्याला अर्थच उरलेला नाही, असं वाटायला लागतं.’’ पण अर्थातच हळूहळू त्या त्यातून सावरल्या. त्यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये लिखाण सुरू केलं. त्या मार्गदर्शनपर भाषणं द्यायला लागल्या. आणि आता त्यांच्या कामात व्यग्र झाल्या आहेत. पण हे अनेकींच्या बाबतीत होऊशकतं. खुर्ची गेली की तिच्याबरोबर सत्ताही जाते. कालपर्यंत आपल्याला सॅल्युट करणारी आणि आपल्या मागे येणारी माणसं आपल्याकडे दुर्लक्ष करतात, तोंडदेखलं हसतात, हे पचवणं सोपं नसतं. काहींना तर घरचाच आहेर मिळतो, मधुरिमा या आमच्या प्राध्यापक मैत्रिणीच्या निरोप समारंभात तिचे सहकारी आणि विद्यार्थी यांनी तिच्या शिकवण्याचे खूप गोडवे गायले… तिला अगदी कृतकृत्य वाटत होतं. समारंभाच्या शेवटी तिचा निवृत्त कर्नल नवरा अचानक बोलून गेला, ‘‘आता निदान कधी तरी तव्यावरची गरम भाकरी माझ्या पानात पडेल, अशी मी आशा करतो.’’ खरं तर तो हे थट्टेतच बोलला, पण तिला ती थट्टा अगदी जिव्हारी लागली. आणि मग ती त्याच न्यूनगंडात वावरू लागली.

काही जणी खासगी क्षेत्रातून निवृत्त होतात. खासगी क्षेत्रात कामाचे तास जास्त आणि त्या मानाने पगार कमी अशी परिस्थिती असते. अशा स्त्रियांना ‘साठी’ आली आणि शरीर थकलं तरी घरातील आर्थिक घडी विस्कटू नये म्हणून काही ना काही करणं भाग असतं. त्यामुळे त्या निवृत्तीनंतर आर्थिकदृष्ट्या कमी दर्जाच्या नोकऱ्या स्वीकारताना दिसतात. मात्र काहींची मुलं जर त्यांच्या निवृत्तीनंतर स्थिरावलेली असतील आणि यांनी घरीच राहावं म्हटलं तर तेही त्यांना जड जातं. कधी घरातील वृद्ध माणसांचं वागणं त्यांना सहन होत नाही तर कधी नवरा आणि मुलांची अरेरावी, कधी सुनेचं मनमानी वर्तन, तर कधी नातवंडांची उधळपट्टी सहन होत नाही. या स्त्रियांच्या मनाची नुसती कुतरओढ होत असते. अशा वेळी मन उदास होऊन जातं आणि ‘संध्याछाया भिवविती हृदया…’ वाटू लागतं.

निवृत्तीनंतरच्या आयुष्यात विवाहित जोडप्यांमध्ये सुसंवाद असेल तर आयुष्य सुसह्य असतं अन्यथा… उच्च पदांवरून निवृत्त झालेल्या एका जोडप्यात निवृत्तीनंतर एवढा बेबनाव व्हायचा की ते दोघेही एकमेकांना चक्क टाळायला लागले. तोपर्यंत ते फारच कमी काळ एकत्र राहिलेले होते. त्यामुळे एकमेकांना सहन करणं त्यांना कठीण जातंय. इतकं की बायको ट्रिपला गेली की नवरा घरी राहतो. आणि ती आल्यावर नवरा मित्रांसमवेत फिरायला जातो. पण असं किती दिवस करत राहणार, असा त्यांनाही पडलेला प्रश्न आहे.

निवृत्तीनंतर कामांची आणि कामावर जाण्याची बांधलेली वेळ संपते. ‘डेडलाइन’ हा तर प्रकारच संपतो. आपल्यासमोर भरपूर रिकामा वेळ आहे असं वाटायला लागतं. परिणामी अनेक स्त्रियांना घरीदारी अनेक गोष्टींत गृहीत धरलं जातं. माधवी खेडेगावातल्या कॉलेजातून प्राध्यापक म्हणून निवृत्त झाली आहे. त्यांच्या घरची शेती आहे. निवृत्तीनंतर पीएच.डी.ची बिरुदं टाकून देऊन ती रोज शेतात कामाला जाते. ते काम तिने हौसेने स्वीकारलं आहे, असं तिचा नवरा आणि सासू सर्वांना सांगतात. तिला ते खरंच करायचं आहे, हे ना तिला कुणी विचारलं ना तिनं सांगितलं.

एकट्या राहणाऱ्या बायकांचे निवृत्तीनंतरचे प्रश्न वेगळेच असतात. एक तर त्यांना म्हणावा तसा कोणाचाच आर्थिक आधार नसतो. शारीरिक ताकद कमी होते आहे, याची जाणीव होत असल्याने एकटेपणा अधिकच अधोरेखित होतो. त्यात निवृत्तीनंतरच्या आयुष्याची आखणी केली नसेल तर अनेक जणी अक्षरश: उदासीनतेच्या गर्तेत घसरत जातात. परिणामी अनेकींना मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, पाठदुखी, गुडघेदुखी अशा अनेक व्याधी मागे लागतात. अनेक जणी याच काळात कर्करोगासारख्या दुर्धर आजाराच्याही शिकार होतात.

माझा स्वभाव उधळपट्टी करण्याचा नाही, पण मला काटकसर जमत नाही. निवृत्तीनंतर माझ्या एका मैत्रिणीच्या नातवाच्या वाढदिवसाला त्याच्यासाठी शर्ट, पुस्तकं, खेळणी आदी भेटी घेऊन गेले होते. माझ्या त्या मैत्रिणीने मला दुसऱ्या दिवशी फोन करून सांगितलं की, निवृत्तीनंतर ती मोठ्या माणसांना भगवद्गीता आणि छोट्यांना रामरक्षा/ हनुमान चालीसा अशा भेटी देते. निवृत्ती वेतन मिळत नसल्याने महाग गोष्टी भेटी देणं तिला आता परवडत नाही. आपल्या स्वभावात असे बदल करणं तिला सोपं गेलेलं नाही.

मी मागच्या वर्षी ३१ डिसेंबरला कालमानानुसार विद्यापीठाच्या नोकरीतून निवृत्त झाले. आमचं केंद्र सतत जागृत ठेवायचं, अशी खूणगाठ मनाशी बांधल्यामुळे नोकरीत असताना अक्षरश: मी झपाटल्यासारखी कामं करायची. नोकरीचा कार्यकाळ संपल्यानंतर मला निवृत्तिवेतन वगैरे काहीच मिळणार नसल्यानं अर्थार्जनासाठी काही तरी करावं लागणार, याची मला पूर्वकल्पना होती. गेल्या नोव्हेंबरमध्ये अमेरिकेतल्या दोन ऑनलाइन विद्यापीठांमध्ये माझे इंटरव्ह्यू होऊन माझी निवडही झाली होती. पण ट्रम्प साहेबांच्या बदललेल्या धोरणामुळे ते प्रत्यक्षात आलं नाही. मग मी, माझी एक मैत्रीण आणि मैत्रिणीचा नवरा यांनी ‘हटके’ लोणची आणि लाडू बनवायचा व्यवसाय सुरू केला. थोड्याच काळात आम्हाला मार्केटिंग अजिबातच जमत नाही हे माझ्या लक्षात आलं. त्यामुळे आता शिकवण्याचंच आवडीचं काम सुरू केलंय. खरं तर आयुष्यभर एकटं राहत असल्यामुळे उर्वरित आयुष्य घालवण्यासाठी माझ्याकडे आर्थिक तरतूद आहे. पण दर महिन्याला बँकेत जमा होणाऱ्या भरभक्कम पगाराची एवढी सवय झालेली असते की तसे आता होत नाही म्हणून जीव कासावीस होतो. फारच नकारार्थी विचार मनात डोकावू लागतात. माझ्या सांगीतिक गुरू डॉ. अंजली निगवेकर या माझ्या एक वर्ष अगोदर आमच्याच विद्यापीठातल्या संगीत विभागप्रमुख पदावरून निवृत्त झाल्या. त्या जन्मांध आहेत आणि एकट्याच राहतात. त्यांनाही निवृत्तिवेतन नाही. त्या अगदी कमी मानधनावर गाण्याचे वर्ग घेतात. त्यांना सततची एक मदतनीस लागते आणि गाडीसाठी चालक लागतो. त्याचा मोठा खर्च त्यांना करावा लागतो. तरीही त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. त्या अतिशय आनंदात असतात. त्यांच्या आयुष्याची शिस्त निवृत्तीनंतरही कायम आहे. त्या म्हणतात, ‘साठीनंतर आपल्याला उत्पन्नाचे अधिकचे स्राोत मिळणं अवघड असतं, त्यामुळे सांभाळूनच वागायला हवं.’ एकदा परिस्थिती आनंदाने स्वीकारली की काही ना काही मार्ग मिळतो आणि कोणताही अवघड आणि अनघड प्रवासही सोपाच होऊन जातो, या त्यांच्या शिकवणीने माझं गेलेलं धैर्य परत आलं.

खरं तर आता लोकांचं जीवनमान उंचावलं आहे. साठीच्या म्हणजे निवृत्तीच्या वयातही लोकांच्यातली उमेद टिकून असते. शरीरस्वास्थ्य चांगलं असतं. त्याचा चांगला उपयोग करून घेता आला पाहिजे. निवृत्तीनंतरचा सगळ्यात मोठा यक्षप्रश्न असतो, ते म्हणजे वेळ कसा घालवायचा? त्याचं जर व्यवस्थित नियोजन केलं नाही तर वेळ घरंगळून जातो आणि चिडचिड व्हायला लागते. त्यासाठी योग्य व्यायाम, घराबाहेरची ‘सपोर्ट सिस्टीम’ वाढवणं, घराभोवती निसर्ग निर्माण करणं, छंद जोपासणं अशासारखे काही उपाय आहेत. आमच्या जवळच राहणाऱ्या मिथिलाने बँकेतून निवृत्त झाल्याबरोबर पोळ्या करून देण्याचा छोटासा व्यवसाय सुरू केला. तिने रेकीची कौशल्ये आत्मसात केली. तिला घर सजवायची आवड असल्यामुळे ती नाना तऱ्हेच्या मेणबत्त्या बनवते. सुनिधीने तर आंब्याची बाग चालवायला घेतली आहे. दोघींचीही धडपड चांगली फळाला आलेली आहे.

निवृत्तीनंतरचा आयुष्याचा टप्पा म्हणजे शांतपणे घालवण्याचा वानप्रस्थाश्रम आहे, अशी समजूत असते. पण नोकरी करत असताना नाना तऱ्हेची आव्हाने लीलया पेलणाऱ्या स्त्रियांना शांत बसणं असह्य होतं. ‘शोधलं की सापडतं’ हा मंत्र आहे. आपल्याला काही करण्याची इच्छा असली की आजूबाजूच्या संधी नजरेला पडतात. आपल्या बदलत्या शारीरिक क्षमतेची जाणीव ठेवून आपण त्या संधींचा फायदाही करून घेऊ शकतो. साठीनंतर शारीरिक ताकद कमी होत असली तरी मानसिक आणि बौद्धिक ताकद वयानुसार वाढते असं संशोधन सांगतं. आपण करत असलेल्या कामाचं समाधान मिळालं आणि त्यामधून दुसऱ्यांचाही फायदा झाला तर शेवटपर्यंत आपलं आयुष्य अर्थपूर्ण राहू शकतं… फक्त ते करायला हवं.

dmanjusha65@gmail.com

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(लेखातील व्यक्तींची नावे बदलली आहेत.)