२०१६ हे वर्ष सर्वात उष्ण वर्ष ठरू शकते असे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले असून जागतिक तापमानवाढ थांबली नाही तर अनेक आपत्ती येतील असा इशारा दिला आहे. २०१६ या वर्षांत सरासरी तापमान औद्योगिक क्रांतीपूर्व काळाच्या तुलनेत १.२ अंश सेल्सियसने जास्त राहण्याची शक्यता आहे. या शतकात किमान १६ वर्षे सर्वात उष्ण होती असा याचा अर्थ होतो असे जागतिक हवामान संघटनेने म्हटले आहे. तापमानवाढीची उच्चतम मर्यादा २ अंश सेल्सियस असताना आपण निम्म्या मार्गावर आहोत, संयुक्त राष्ट्रांनी हवामान बदलांबाबत केलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी केली नाही तर परिस्थिती आणखी बिघडू शकते. दर वर्षी उष्णतामानाचा नवा विक्रम होत आहे. २०१५ च्या तुलनेत २०१६ हे वर्ष जास्त उष्ण असण्याचे संकेत मिळाले आहेत असे जागतिक हवामान संघटनेचे सरचिटणीस पेटेरी तलास यांनी सांगितले. एल निनोमुळे तापमान यावर्षीच्या सुरुवातीच्या काही महिन्यात वाढले पण तो परिणाम कमी झाल्यानंतर पारा वाढलेलाच राहिला. आक्र्टिक रशियात तापमान दीर्घकालीन सरासरीच्या ६ ते ७ अंश सेल्सियसने जास्त होते. रशियाच्या इतर आक्र्टिक व उपआक्र्टिक भागात, अलास्का व वायव्य कॅनडात तापमान सरासरीच्या ३ अंश जास्त होते. जागतिक हवामान संघटनेचा अहवाल माराकेश येथील चर्चा सुरू असताना जाहीर करण्यात आला आहे. गेल्या वर्षी पॅरिसमध्ये हवामान परिषद झाली होती. वार्षिक कार्बन संकल्प अहवालात म्हटले आहे की, लागोपाठ तीन वर्षे जीवाश्म इंधनातून कार्बनचे उत्सर्जन कमी होते पण ते हवामान बदल रोखण्यास पुरेसे नाही. २०१५ मध्ये हरितहगृहवायूंचे प्रमाण वाढत गेले ते ४०० पीपीएम होते. आता २०१६ मध्ये ते आणखी वाढण्याची शक्यता आहे. २०१६ मध्ये जानेवारी ते सप्टेंबर या काळात तापमान औद्योगिक काळातील सरासरीच्या १.२ अंश सेल्सियसने जास्त होते तर १९६१ -१९९० या काळातील सरासरीपेक्षा ०.८८ अंशांनी अधिक होते. राजस्थानात गेल्या मे महिन्यात फालोरी येथे ५१ अंश तपमानाची नोंद झाली होती असेही अहवालात म्हटले आहे.