कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधलं अंतर ६ ते ८ आठवड्यांवरून वाढवून १२ ते १६ आठवडे करण्यात आलं आहे. केंद्र सरकारने तज्ज्ञांच्या सल्लागार गटाच्या शिफारशीवरून हा निर्णय घेतल्यानंतर तो योग्य की अयोग्य, यावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. त्यावरून आता कोविशिल्ड लसीचं उत्पादन करणाऱ्या सिरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पूनावाला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "सरकारनं आपल्याला मिळालेल्या माहितीच्या आधारे घेतलेला हा एक खूप चांगला निर्णय आहे", असं ते म्हणाले आहेत. एनडीटीव्हीच्या हवाल्याने फ्री प्रेस जर्नलनं यासंदर्भात वृत्त दिलं आहे. "हा निर्णय फायदेशी आहे", असं देखील अदर पूनावाला म्हणाले आहेत. काय म्हणाले अदर पूनावाला? अदर पूनावाला यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचं समर्थन केलं आहे. "हा निर्णय खूप चांगला आहे. कारण हा निर्णय केंद्र सरकारला मिळालेल्या माहितीच्या आधारे घेण्यात आलेला आहे. दोन डोसमधलं अंतर वाढवणं हा एक चांगला वैज्ञानिक दृष्टीकोनातून घेतलेला निर्णय आहे. कार्यक्षमता आणि रोगप्रतिकारशक्ती अशा दोन्ही गोष्टींच्या दृष्टीकोणातून हा निर्णय फायदेशीर आहे", असं अदर पूनावाला म्हणाले आहेत. #Covishield वैक्सीन की पहली और दूसरी डोज़ के बीच के अंतर को 12-16 हफ़्ते तक बढ़ा दिया गया है। इससे पहले अभी तक कोविशील्ड वैक्सीन की दो डोज़ के बीच का अंतर 6-8 हफ़्ते का था।कोविड वर्किंग ग्रुप की सिफ़ारिश के बाद यह फ़ैसला किया गया है।@PMOIndia #vaccinated pic.twitter.com/3KoqxsGe3Y — Dr Harsh Vardhan (@drharshvardhan) May 13, 2021 कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधलं अंतर वाढवण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी ट्वीट करून देखील दिली आहे. काय आहे केंद्र सरकारचा निर्णय? आत्तापर्यंत कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमध्ये ६ ते ८ आठवड्यांचं अंतर ठेवलं जात होतं. मात्र, केंद्र सरकारच्या तांत्रिक सल्लागार गटानं कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधलं अंतर वाढवण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार आता केंद्र सरकारकडून निर्णय घेण्यात आला आहे. सध्या कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधलं अंतर ६ ते ८ आठवडे इतकं होतं. आता ते अंतर वाढवून १२ ते १६ आठवडे करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. अर्थात, कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर पुढील डोस थेट १२ ते १६ आठवड्यांनंतर म्हणजेच ३ ते ४ महिन्यांनंतर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गटानं सुचवलेल्या शिफारशी राष्ट्रीय तज्ज्ञांच्या गटाकडे अर्थात National Expert Group on Vaccinationn Administratio कडे पाठवण्या आल्या होत्या. त्याला आता मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान, कोवॅक्सिन लसीच्या डोससाठी कोणताही बदल करण्यात आलेला नाही. Covishield Vaccine : केंद्र सरकारचा मोठा निर्णय, लसीच्या दोन डोसमधलं अंतर वाढवलं! विरोधकांची मात्र टीका केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भातली माहिती दिली आहे. मात्र, यावर विरोधकांकडून शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी सरकारवर टीका केली आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, “आधी दुसरा डोस ४ आठवड्यांनी दिला जात होता. त्यानंतर हा कालावधी ६ ते ८ आठवडे करण्यात आला आणि आता १२ ते १६ आठवडे झाला आहे. लसींच्या तुटवड्यामुळे हा सल्ला देण्यात आला आहे का? मोदी सरकारकडून आम्ही पारदर्शी कारभाराची अपेक्षा करावी का?”