लॉकडाउनमुळे देशाच्या वेगवेगळया भागात अडकलेल्या नागरिकांसाठी एअर इंडिया १९ मे ते दोन जून दरम्यान देशांतर्गत विशेष विमाने सोडणार आहे. लॉकडाउनमध्ये अडकलेल्या नागरिकांना आपल्या घरी परतता यावे, यासाठी देशाच्या वेगवेगळया शहरांदरम्यान ही विशेष विमाने उड्डाण करतील.

१८ मे पासून लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरु होईल. चौथ्या लॉकडाउनमध्ये नियम पूर्णपणे नवीन असतील असे मोदींनी काल जाहीर केले. या हवाई प्रवासासाठी प्रवाशांना तिकिटाचे पैसे भरावे लागणार असून अजून बुकिंग सुरु झालेली नाही.
दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरु या चार प्रमुख महानगरांदरम्यान सर्वाधिक विमाने सोडण्यात येतील.

दिल्लीहून १७३, मुंबईहून ४०, हैदराबादहून २५ आणि कोचीहून १२ विमाने उड्डाण करतील. दिल्लीहून जयपूर, बंगळुरु, हैदराबाद, अमृतसर, कोची, अहमदाबाद, विजयवाडा, गया, लखनऊ या शहरांमध्ये विमाने सोडण्यात येतील. मुंबईहून विशाखापट्टणम, कोची, अहमदाबाद, बंगळुरु, हैदराबाद आणि विजयवाडा या शहरांमध्ये विशेष विमाने सोडण्यात येतील.