बिहार विधानसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर नेत्यांनी तिसऱ्या टप्प्यात मतदान होणाऱ्या मतदारसंघांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. तिसऱ्या टप्प्यातील प्रचारात नितीश कुमार यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याविषयींच्या अफवांवरून टीका केली आहे. किशनगंजमध्ये झालेल्या सभेत नितीश कुमार यांनी सीएएबद्दल सुरू असलेल्या चर्चेवरून टीका केली.

मुस्लिमबहुल भाग असलेल्या किशनगंजमध्ये नितीश कुमार यांची सभा झाली. या सभेत नितीश कुमार यांनी सुधारित नागरिकत्व कायद्यावर टीका केली. नितीश कुमार म्हणाले,”हा चुकीचा प्रचार कोण करत आहे. उगाच बडबड करत असतात. कोण कुणाला देशाबाहेर काढणार? सर्व भारताचे नागरिक आहेत. कुणामध्ये दम नाही की आपल्या माणसांना देशाबाहेर काढू शकेल. कोण बाहेर काढणार आहे? हे असं कसं बोलत राहतात. जेव्हापासून जनतेनं संधी दिली, तेव्हापासून समाजात प्रेम, बंधूभाव आणि सद्भावनापूर्ण वातावरण निर्माण केलं. सगळ्यांना एकजूट करण्याचा प्रयत्न आम्ही केला. आम्ही काम करत राहतो. समाजात वाद चालूच राहावेत असं काही लोकांची इच्छा आहे. आमचा उद्देश हाच आहे की, सर्वजण प्रेमानं राहावेत. तेव्हाच समाज पुढे जाईल, लोक प्रगती करतील,” असं सांगत नितीश कुमार यांनी सीएएवरून गैरसमज निर्माण करणाऱ्यांवर निशाणा साधला.

नितीश कुमार यांनी सीएएवरून टीका करताना कुणाचंही नाव घेतलं नाही. मात्र, काल (४ नोव्हेंबर) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रचारसभेत बांगलादेश व पाकिस्तानातून आलेल्या घुसखोरांना बाहेर काढू, असं विधान केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांनी ही टीका केल्याचं बोललं जात आहे.