लोकसभा निवडणुक निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये टीएमसी- भाजपा यांच्यातीप वाद दिवसेंदिवस अधिकच चिघळताना दिसत आहे. शनिवारी भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्येनंतर त्यांच्या अंत्यसंस्काराच्या मुद्यावरून स्थानिक भाजपा नेते व राज्य पोलीसांमध्ये वाद होऊन वातावरण अधिकच गरम झाले. यामुळे बशीरहाट येथे अंत्यसंस्कारासाठी पक्ष कार्यालयात नेण्यात येणारे भाजपा कार्यकर्त्यांचे मृतदेह मध्येच अडवले, परिणामी संतप्त कार्यकर्त्यांनी रस्त्यातच या दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची रविवारी रात्री तयारी केली होती.

या घटनेनंतर पोलिसांवर मनमानी केल्याचा आरोप करण्यात आला असुन, भाजपाच्यावतीने सोमवारी बशीरहाटसह संपूर्ण बंगालमध्ये १२ तासांचा बंद पुकारण्यात आलेला आहे, शिवाय भाजपा हा दिवस काळा दिवस म्हणुनही पाळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

पश्चिम बंगालमध्ये मागिल काही दिवसांपासून भाजपा व टीएमसी कार्यकर्ते यांच्यात हाणामारीच्या घटना वाढल्या आहेत. बंगालच्या २४ परगना येथे शनिवारी सायंकाळी उशीरा या दोन्ही पक्ष कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता. ज्यात कथितरित्या आठजण मारल्या गेल्याची माहिती समोर आली आहे. शिवाय अनेकजण जखमी देखील झालेले आहेत. रविवारी देखील दिवसभर या भागात तणावाचे वातावरण होते.

या हिंसक घटनेनंतर तृणमुल काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपाच्या पाच कार्यकर्त्यांची गोळ्या घालुन हत्या केली असल्याचा भाजपाकडून दावा करण्यात आला आहे. तर १८ जण बेपत्ता असल्याचेही सांगण्यात आले आहे. तर दुसरीकडे तृणमुल काँग्रेस नेत्याने दावा केला आहे की, त्यांच्या तीन कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली आहे.