दलितांच्या फक्त दोन पिढ्यांनाच नोकरी आणि शिक्षणात आरक्षण दिले पाहिजे. त्यानंतर त्यांना आरक्षण देऊ नये, असे वक्तव्य भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार सी पी ठाकूर यांनी केले आहे. दलित आरक्षणाला विरोध करताना त्यांनी सवर्णांनाही आर्थिक आधारवर आरक्षण देण्याची मागणी केली आहे.
सवर्णांची परिस्थिती सध्या खूप वाईट आहे. जर केंद्र सरकारने त्यांच्यासाठी तात्काळ कोणते पाऊल उचलले नाही तर देशात नवीन समस्या उभी राहू शकते, असे ते म्हणाले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात सी पी ठाकूर हे मंत्री होते. दलित आयएएस अधिकाऱ्यांच्या मुलांना नोकरी आणि शैक्षणिक क्षेत्रात आरक्षणाचा लाभ दिला जाऊ नये, असेही त्यांनी म्हटले. यापूर्वीही ठाकूर यांनी दलित आरक्षणाला विरोध केला आहे. यापूर्वी त्यांनी आरक्षणच संपुष्टात आणले पाहिजे, असे वक्तव्य केले होते.
दरम्यान, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीला बढतीप्रकरणी सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने अनेक प्रश्न उपस्थित केले होते. जर एखादा व्यक्ती आरक्षित कोट्यातून राज्याचा सचिव झाला. तर त्याच्या कुटुंबीयांना आरक्षणासाठी मागास समजले जावे का ?, समजा एक जात ५० वर्षांपासून मागास आहे आणि त्यातील एक वर्ग क्रिमीलेअरमध्ये आलेला असेल. तर अशा परिस्थितीत काय केले पाहिजे?, असा सवालही विचारला होता.
आरक्षणाचा पूर्ण सिद्धांत हा अशा लोकांना मदतीसाठी आहे, जो सामाजिक रूपाने मागास आहे आणि सक्षम नाही. त्यामुळे या पैलूंवरही विचार करणे आवश्यक आहे, असे मत न्यायालयाने नोंदवले होते.