चीनने पाकिस्तानमधून ये-जा कऱणारी हवाई वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबत विमानांना पाकिस्तानी हवाई हद्दीत प्रवेश कऱण्यासही मनाई करण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. अनेक देशांनी पाकिस्तानी हवाई हद्दीतून प्रवास न करण्याचा निर्णय घेतल्याने युरोप आणि दक्षिण पूर्व आशियातील विमानतळांवर हजारो प्रवासी अडकून पडले आहेत.

आखाती देशांमधील अनेक विमानं पाकिस्तान आणि पाकिस्तान-भारत सीमारेषेवरुन उड्डाणं करतात. या सर्व विमानांना चीनला जाण्यासाठी मार्ग बदलावा लागत असून भारत, म्यानमार किंवा मध्य आशियाच्या हवाई हद्दीतून प्रवास करावा लागत आहे अशी माहिती सिव्हिल एव्हिएशन एक्स्पर्टने ग्लोबल टाइम्सला दिली आहे. बीजिंग कॅपिटल आंतरराष्ट्रीय विमानतळाने बुधवारी आणि गुरुवारी पाकिस्तानमधून ये-जा करणाऱ्या विमानांची वाहतूक बंद केली होती.

सीमारेषेवर तणाव वाढल्याने गुरुवारी भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांनी आपली महत्त्वाची विमानतळं बंद केली होती. या विमानतळांवरुन प्रवाशी विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली होती. भारताने काही वेळाने विमानतळं सुरु केली होती, मात्र पाकिस्तानने संध्याकाळपर्यंत विमानतळं बंद ठेवली होती.