भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी बुधवारी ‘जेएनयू’तील देशविरोधी घोषणांचा मुद्दा उपस्थित करत राहुल गांधी यांना लक्ष्य केले. ते लखनऊ येथील कार्यक्रमात बोलत होते. भाषणस्वातंत्र्याच्या नावाखाली देशविरोधी घोषणा खपवून घ्यायच्या का, याचे उत्तर राहुल गांधींनी संसदेत द्यावे,अशी मागणी शहा यांनी केली. राहुल गांधी व्होटबँकेच्या राजकारणासाठी देशात फूट पाडू इच्छिणाऱ्या शक्तींना पाठबळ देत आहेत. ‘जेएनयू’त देण्यात आलेल्या ‘अफजल गुरू तेरे हत्यारे जिंदा है’, ‘भारत के तुकडे होंगे’, या घोषणा देशद्रोही होत्या किंवा नाही, हे मी त्यांना विचारू इच्छितो. राहुलजी व्होटबँकेसाठी इतक्या खालच्या पातळीला जाऊ नका. अनेक हुतात्म्यांच्या बलिदानानंतर देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. तुम्ही भाषणस्वातंत्र्याच्या नावाखाली फुटीरतावादी शक्तींना पाठबळ देत आहात, असे अमित शहा यांनी म्हटले.