करोनाच्या दुसऱ्या लाटेत भारताच्या आरोग्य व्यवस्थेचं कंबरडं मोडलं  आहे. अनेक ठिकाणी अपुऱ्या वैद्यकीय  उपकरणांमुळे रुग्णांना जीव गमवावा लागतोय. अनेक रुग्णालयात प्राणवायूचा तुटवडा जाणवत आहे. काही रुग्णालयांनी प्राणवायू संपल्याचे फलक देखील रुग्णालयाबाहेर लावले आहेत. त्यामुळे वाढते रुग्ण आणि अपुऱ्या वैद्यकीय उपकरणांमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण वाढू लागला आहे. प्राणवायूची कमतरता जाणवत असल्याने भारताने आखाती देश आणि सिंगापूरकडे मदतीचा हात मागितला आहे. मात्र शेजारी असलेला चीन मदतीचा हात पुढे करत असतानाही भारत मदत घेण्यास तयार नसल्याचं दिसत आहे.

“भारतात करोनामुळे स्थिती गंभीर झाली आहे. करोना हा संपूर्ण जगाचा शत्रू आहे. त्यामुळे या करोनाच्या संकटातून बाहेर येण्यासाठी प्रत्येकाने मदत करणं गरजेचं आहे. आंतरराष्ट्रीय एकता आणि परस्पर मदतीची प्रत्येकाला गरज आहे. अशा स्थितीत एकमेकांना मदतीचा हात देणं गरजेचं आहे. भारताला आम्ही सर्वोतोपरी मदत करण्यास तयार आहोत.”, असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितलं.

धक्कादायक! दिल्लीत ऑक्सिजनचा दाब कमी झाल्याने २५ रुग्णांचा मृत्यू

भारताने गेल्यावर्षी चीनकडून वैद्यकीय उपकरणं मागवली होती. व्यावसायिक करार असल्याचं कारण पुढे करत ही उपकरणं मागण्यात आली होती. भारत आणि चीन दोन्ही देश दक्षिण आशियातील देशांना करोना लसींचा पुरवठा करत आहे. त्यात श्रीलंका, नेपाळ आणि बांगलादेशचा समावेश आहे. त्यात श्रीलंका आणि नेपाळनं भारताकडून लसींचा पुरवठा कमी झाल्यास चीनकडून मदत घेण्याचा विचार केला आहे. भारताकडून लसींचा पुरवठा कमी होत असल्याने आता चीन या देशांना लसींचा पुरवठा करण्यासाठी पुढे आला आहे. बांगलादेशनं ३० दशलक्ष करोना लसींसाठी भारतासोबत करार केला आहे. मात्र भारताकडून जानेवारीपासून आतापर्यंत ७ दशलक्ष लसींचा पुरवठा बांगलादेशला करण्यात आला आहे. त्यामुळे करोना लसींची खेप लवकरात लवकर यावी यासाठी बांगलादेशचे प्रयत्न सुरु आहेत. दुसरीकडे बांगलादेशची गरज पाहता चीनना आपला मोर्चा बांगलादेशकडे वळवल्याचं बोललं जात आहे.

Corona Crisis: सलग दुसऱ्या दिवशी भारतात तीन लाखांपेक्षा जास्त करोनाबाधित

भारत चीन सीमेवर गेल्या काही महिन्यांपासून तणावाचं वातावरण आहे. सीमेवरुन सैनिक मागे हटले तरी तणाव कायम आहे. एप्रिल २०२० मध्ये चिनी सैनिक भारताच्या नियंत्रणात असलेल्या भूभागात घुसले होते. त्यानंतर सैनिकांनी सीमेवर उत्तर देण्याबरोबर भारत सरकारने चिनी अॅपवर बंदी घातली होती. भारताने जून २०२० मध्ये टिकटॉकसह ५९ अॅप्सवर बंदी घातली होती. त्यानंतर २ सप्टेंबरला ११० इतर अॅप्लिकेशनवर बंदी घातली आहे.