जगात करोना व्हायरसचा विळखा दिवसागणिक आणखी घट्ट होताना दिसत आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगात आतापर्यंत ६९ लाख ७३ हजार २४७ जणांना करोना व्हायरसने ग्रासले आहे. २१३ देशात करोना व्हायरस या महामारीने चार लाख दोन हजार ६९ जणांचे बळी घेतले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत ३४ लाख ११ हजार ९८ जणांनी करोनावर मात केली आहे.

जगात सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण अमेरिकेत आहेत. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, अमेरिकामध्ये जगातील सर्वात जास्त करोनाबाधित आहेत. १९ लाख ८८ हजार अमेरिकेतील नागरिकांना करोना व्हायरसने ग्रासले आहे. तर एक लाख १२ हजार जणांचा बळी घेतला आहे. सर्वाधिक करोनाबाधितांच्या यादीत अमेरिका जगात अव्वल स्थानावर असून भारत या यादीत सहाव्या स्थानावर आहे. भारताच्या आधी या यादीत ब्राझील, रशिया, स्पेन आणि यूके या देशांचा समावेश आहे.

जागतिक आकडेवारीनुसार भारतातील एकूण रुग्णांची संख्या २ लाख ४६ हजार ६२२ इतकी झाली असून भारत हा आता जगातील सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या क्रमवारीत इटलीला मागे टाकत सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. इटलीमधील रुग्णसंख्या २ लाख ३४ हजार ८१० आहे. युरोपातील देशांपैकी इटली आणि स्पेन हे देश सर्वाधिक प्रभावित झाले होते. या क्रमवारीत आठवडय़ाभरापूर्वी भारत नवव्या स्थानावर होता. करोनाचे उगमस्थान असलेल्या चीनच्या रुग्णसंख्येपेक्षाही भारतातील रुग्णसंख्या अधिक आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ब्राझीलमध्ये सहा लाख ७५ हजार करोनाबाधित आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या रशियामध्ये चार लाख ५८ हजार करोनाबाधित आहेत. तर चौथ्या क्रमांकावर असलेल्या दोन लाख ८८ हजार तर यूकेमध्ये दोन लाख ८४ हजार करोनाबाधित रूग्ण आहेत.

भारतात संसर्ग विस्फोटाचा धोका कायम

संयुक्त राष्ट्रे : भारतात आतापर्यंत करोना संसर्गाचा विस्फोट झाला नसला तरी तो होण्याची जोखीम कायम आहे. कारण लॉकडाउन उठवण्यात आल्यानंतर रुग्णांची संख्या वाढू शकते, असे जागतिकआरोग्य संघटनेने म्हटले आहे. करोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग भारतात आता तीन आठवडे आहे. याचा अर्थ ही वाढ घातांकी नसली तरी ती कमी झालेली नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले.

भारतातील परिस्थिती –
भारतात अर्थगाडे रुळावर आणण्यासाठी येत्या काही दिवसांत हळूहळू लॉकडाउन अधिक शिथिल करण्यात येणार असले, तरी करोना रुग्णसंख्येचा वाढता दर दिवसेंदिवस चिंताजनक बनत चालला आहे. देशात गेल्या चोवीस तासांमध्ये ९,८८७ नवे रुग्ण आढळले असून शनिवारी सलग तिसऱ्या दिवशी रुग्णवाढ नऊ हजारांहून अधिक झाली. सध्या देशात १ लाख १५ हजार ९४२ रुग्णांवर उपचार केले जात असून १ लाख १४ हजार ७२ रुग्ण बरे झाले आहेत. मात्र, बरे होण्याचे प्रमाण किंचित कमी झाले आहे. ते ४८.२७ टक्क्यांवरून ४८.२० टक्क्यांवर आले आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये २९४ रुग्णांचा मृत्यू झाला. देशभरात एकूण ६,६४२ मृत्यू झाले आहेत. टाळेबंदीच्या पाचव्या टप्प्यामध्ये सोमवारपासून बहुतांश व्यवहार सुरू होत असून करोनाच्या रुग्णांत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये ९ ते १० हजार रुग्ण प्रतिदिन वाढले. मात्र गेल्या दोन महिन्यांमध्ये प्रतिदिन रुग्णवाढ ४ ते ५ हजारांच्या घरात राहिली होती.

राज्यांची स्थिती..

महाराष्ट्रात रुग्णांची संख्या (८० हजार २२९) व मृत्यू (२,८४९) सर्वाधिक आहे. त्यानंतर, रुग्णसंख्येमध्ये तमिळनाडू (२८ हजार ६९४), दिल्ली ( २६ हजार ३३४) आणि गुजरात (१९ हजार ९४) या राज्यांचा क्रमांक लागतो. राजस्थान आणि उत्तर प्रदेशने रुग्णसंख्येमध्ये १० हजारांचा आकडा गाठला आहे. मध्य प्रदेशही ९ हजारांच्या नजीक पोहोचला आहे. आसाम आणि केरळमध्येही रुग्ण वाढू लागले आहेत. महाराष्ट्रानंतर सर्वाधिक मृत्यू गुजरात (१,१९०) व दिल्ली (७०८) या दोन राज्यांमध्ये झाले आहेत.