करोना संसर्ग रोखण्यासाठी देशात लसीकरण सुरू आहे. लसीकरण प्रक्रीयेवर विरोधक सतत केंद्रावर टीका करत आहेत. १८ वर्षावरील सर्वांच्या मोफत लसीकरणाची जबाबदारी केंद्र सरकारने घेतली आहे. या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी राजकारण आणि वादविवाद दूर करून करोना लसीकरणाचे फायदे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे.

मायावती यांनी ट्विट केले आहे, त्या म्हणाल्या “करोना लस तयार करणे आणि नंतर लसीकरण इत्यादी संदर्भात वाद, राजकारण, आरोप आणि प्रति-आरोप इत्यादी पुरेसे झालं आहे. यामुळे लोकांना खूप त्रास होत आहे. परंतु आता लस वादाचा अंत करून, त्याचे फायदे लोकांपर्यंत पोहोचवावे.”

“भारतासारख्या विस्तीर्ण ग्रामीण-बहुल देशात, करोना लसीकरण ही एक सार्वजनिक मोहीम बनविणे आवश्यक आहे आणि वैज्ञानिकांना योग्य पाठबळ व प्रोत्साहनाची कमतरता दूर करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर, बसपा केंद्र व सर्व राज्य सरकारांकडे मागणी करीत आहे की, मूलभूत आरोग्य सेवा अधिक मजबूत करा.”, असे देखील मायावती म्हणाल्या.

करोनाचा सामना करण्यासाठी पक्षातर्फे ‘श्वेतपत्रिका’ प्रसिद्ध

दरम्यान, करोना संकट हाताळण्यावरुन मोदी सरकारवर हल्लाबोल करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारला मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. राहुल गांधी यांनी करोना संकटाचा सामना करण्यासाठी पक्षातर्फे श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली आहे. यावेळी त्यांनी केंद्रावर टीका करण्याचा हेतू नसून संभावित तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी देशाला मदत करण्यासाठी ही श्वेतपत्रिका प्रसिद्ध केल्याचं सांगितलं आहे.
“पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत करोनाशी लढताना करण्यात आलेलं व्यवस्थापन वाईट होतं. यामाग अनेक कारणं होती. आम्ही ती कारण या श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. तिसरी लाट आल्यास नेमकं काय करावं सांगणारी ही ब्ल्यूप्रिंट आहे,” असं राहुल गांधी म्हणाले आहेत.