रिलायन्सच्या गुजरातमधील जामनगर येथील तेल शुद्धीकरण प्रकल्पात लागलेल्या आगीत दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर सहा कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमींची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर जामनगरमधील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 'रिलायन्सच्या खासगी अग्निशमन यंत्रणेने आगीवर ताबा मिळवला. मात्र या आगीत सहा कर्मचारी जखमी झाले. त्याच्यावर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत,' अशी माहिती रिलायन्स कंपनीकडून देण्यात आली आहे. आता कंपनीतील सर्व काम व्यवस्थित सुरू असल्याची माहितीदेखील कंपनीकडून देण्यात आली. पहाटे तीनच्या सुमारास कंपनीच्या फ्लुईड कॅटिलेटिक क्रॅकिंग युनिटमध्ये आग लागली होती. या ठिकाणी गॅसोलीन बनवण्याचे काम चालते. देखभालीसाठी बंद ठेवण्यात आलेल्या युनिटमध्ये ही आग लागल्याने कामकाजावर कोणताही परिणाम झालेला नाही, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. मुकेश अंबानी यांची मालकी असलेल्या रिलायन्सच्या जामनगरमधील प्रकल्पात अत्याधुनिक तेल शुद्धीकरण करणारे दोन युनिट्स आहेत. दररोज १२ लाख बॅरेल तेलाचे शुद्धीकरण करण्याची या युनिट्सची क्षमता आहे.