राष्ट्रवादीचे माजी नेते आणि खासदार तारिक अन्वर यांनी शनिवारी (दि.२७) सकाळी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि महासचिव अशोक गहलोत यांच्या उपस्थितीत त्यांनी दिल्लीतील काँग्रेसच्या मुख्यालयात काँग्रेस प्रवेश केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राफेल डील प्रकरणावरुन पाठराखण केल्यानंतर प्रचंड नाराज झालेल्या तारिक अन्वर यांनी तडकाफडकी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याशी चर्चा न करता पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. अन्वर हे बिहारचे रहिवासी असून येथूनच ते राष्ट्रवादीचे खासदार म्हणून निवडूण आले आहेत.

राष्ट्रवादीचा राजीनामा दिल्यानंतर अन्वर यांच्यासमोर दोन प्रमुख पर्याय होते त्यांपैकी एक लालू प्रसाद यांचा पक्ष राष्ट्रीय जनता दल (राजद) आणि दुसरा पर्याय काँग्रेस. यांपैकी अन्वर यांनी राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसचा पर्याय निवडल्याचे बोलले जात आहे. अन्वर हे मुळचे काँग्रेसचेच असून राजीव गांधी यांच्यासोबत त्यांनी मंत्रीमंडळात काम केले आहे. या काळात त्यांनी काँग्रेसचे सरचिटणीस म्हणूनही काम पाहिले आहे.

मात्र, १९९९मध्ये सोनिया गांधी यांच्या पंतप्रधान होण्याला विरोध करीत शरद पवार यांच्यासोबत काँग्रेसमधून बाहेर पडले होते. परदेशी व्यक्तीने काँग्रेसच्या अध्यक्षपदी बसू नये अशी पवार, संगमा आणि अन्वर या काँग्रेसवासीयांची भुमिका होती. आपल्या या भुमिकेवरून बंड करीत १९९९मध्ये शरद पवार, पी. ए. संगमा आणि तारिक अन्वर काँग्रेसमधून बाहेर पडले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली.