पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात अमित शाह हे क्रमांक एकचे नेते आहेत. एका जनमत सर्वेक्षणात हे मत लोकांनी नोंदवलं आहे. अमित शाह यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे त्यांना जनमत चाचणीत पहिलं स्थान मिळालं आहे. इंडिया टुडेने हा सर्व्हे केला होता. या सर्व्हेमध्ये ३९ टक्के लोकांनी अमित शाह हे मोदींच्या मंत्रिमंडळातले नंबर वन मंत्री आहेत असं म्हटलं आहे.

या सर्वेक्षणात १९ राज्यांमधल्या लोकांनी त्यांची मतं नोंदवली आहेत. ३९ टक्के लोकांनी क्रमांक एकचे मंत्री म्हणून अमित शाह यांना पसंती दिली आहे. त्यानंतर १७ टक्के लोकांनी राजनाथ सिंह यांना पसंती दिली आहे. १० टक्के लोकांनी नितीन गडकरींना पसंती दिली आहे. ते चौथ्या क्रमांकावर आहेत. निर्मला सीतारामन यांनी ९ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. रविशंकर प्रसाद, धर्मेंद्र प्रधान, पियूष गोयल, स्मृती इराणी, राम विलास पासवान, एस जयशंकर यांनाही या क्रमवारीत स्थान मिळालं आहे. मात्र क्रमांक एकवर पसंती मिळाली आहे ती अमित शाह यांना.

अमित शाह यांनी गेल्या काही कालावधीत घेतलेले महत्त्वाचे निर्णय या क्रमांकासाठी कारणीभूत आहेत. काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचा निर्णय. सीएएबाबत घेतलेला निर्णय यामुळे जनतेत त्यांची पसंती वाढत गेली असं दिसतं आहे. अमित शाह हे आक्रमक स्वभावाचे आणि तेवढेच संयमी राजकारणी मानले जातात. मोदींच्या २०१९ पर्यंतच्या मंत्रिमंडळात ते मंत्री नव्हते. मात्र पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेत आलं तेव्हा मोदींच्या मंत्रिमंडळात अमित शाह यांना महत्त्वाचं स्थान असणार होतं हे उघड होतं. त्यानुसारच त्यांना केंद्रात गृहमंत्री पद मिळालं. त्यानंतर त्यांनी जे निर्णय घेतले ते लोकांच्या पसंतीस उतरले.