उत्तर प्रदेशमध्ये आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपा पाठोपाठ आता बहुजन समाज पार्टीने देखील त्या दृष्टीने जोरदार हालचाली सुरू केल्याचे दिसत आहे. बसपा प्रमुख मायावती यांनी आज माध्यमांशी बोलताना महत्वपूर्ण माहिती दिली.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधील ब्राह्मण समाजाला जोडण्यासाठी बसपाकडून विशेष प्रयत्न केल जात आहे. याचाच एक भाग म्हणून बसपाकडून २३ जुलैरोजी अयोध्येतून विशेष मोहीम सुरू करण्यात येत आहे. मायावती यांनी स्वतः याबाबत माहिती देताना सांगितले की, ”मला पूर्ण आशा आहे की आगामी विधानसभा निवडणुकीत ब्राह्मण समाज भाजपाला मतदान करणार नाही. बसपा सरचिटणीस एस सी मिश्रा यांच्या नेतृत्वात २३ जुलै रोजी अयोध्येतून ब्राह्मण समाजाला जोडण्यासाठी व त्यांचे हीत बसपा सरकारमध्येच आहे हे त्यांना पटवून देण्यासाठी मोहीम सुरू केली जाणार आहे आणि अयोध्येत ब्राह्मण संमलेन घेतले जाणार आहे.”

तसेच, ”मी माझ्या पक्षाच्या खासदरांना संसदेच्या पावसाळी अधिवेशनात देश व नागरिकांच्या हिताशी संबंधित मुद्दे उचलण्याचे निर्देश दिले आहेत. असे अनेक मुद्दे आहेत ज्यावर देशातील जनतेला केंद्र सरकारकडून उत्तर हवं आहे.” असंही मायावती म्हणाल्या आहेत.

याचबरोबर, ”विरोधी पक्षांनी एकत्र यायला हवं आणि केंद्र सरकारला जाब विचारायला हवा. तीन कृषी कायद्यांचा विरोध करत असलेल्या शेतकऱ्यांबद्दलची केंद्र सरकारची उदासीनता अतिशय दुःखद आहे. बसपा खासदार इंधन आणि घरगुती सिलिंडरच्या वाढलेल्या किंमती, महागाई आणि करोना लसीकरणाशी संबधित मुद्दे संसदेत उचलतील.” अशी देखील मायावतींनी माहिती दिली आहे.