देशात आलेल्या करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे करोनाचे रुग्ण वेगाने वाढू लागले आहेत. त्यामुळे त्याच प्रमाणात देशात चाचण्या देखील केल्या जाऊ लागल्या आहेत. यामुळे देशातल्या करोनाची RTPCR चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळांवर ताण येऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर आता ICMR कडून या चाचण्यांसंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. यामध्ये एकदा एखाद्या व्यक्तीची अँटिजेन किंवा आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह येऊन गेली असेल, तर पुन्हा त्या व्यक्तीची RTPCR चाचणी केली जाऊ नये, रुग्ण डिस्चार्ज होताना त्याची चाचणी करण्याची गरज नाही अशा मार्गदर्शक सूचनांचा समावेश आहे. आयसीएमआरकडून या सूचनांची यादीच जारी करण्यात आली आहे.

आयसीएमआरकडून यासंदर्भात एक जाहीर परिपत्रक काढण्यात आलं आहे. ‘देशात सध्या एकूण २ हजार ५०६ लॅबमध्ये करोनाच्या चाचण्या केल्या जात आहेत. पण गेल्या काही दिवसांमध्ये करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे या लॅब्जवर मोठ्या प्रमाणावर ताण वाढला आहे. तसेच, लॅबमध्ये काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना देखील करोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यावरचा ताण वाढत आहे. त्यामुळे सध्या आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या चाचणीच्या क्षमतांचा योग्य प्रकारे वापर होणं आवश्यक आहे’, असं या पत्रकात आयसीएमआरकडून सांगण्यात आलं आहे.

 

काय आहेत सूचना?

१. एकदा एखाद्या रुग्णाची चाचणी पॉझिटिव्ह येऊन गेली असेल, तर त्याची पुन्हा चाचणी करू नये
२. रुग्णाला डिस्चार्ज देताना त्याची चाचणी करण्याची गरज नाही
३. राज्यांतर्गत प्रवास करणाऱ्या नागरिकांना चाचणी करण्याची सक्ती पूर्णपणे वगळता येऊ शकते.
४. लक्षणं असलेल्या रुग्णांचे अत्यावश्यक नसलेल्या कारणासाठी आणि आंतरराज्य प्रवास टाळले गेले पाहिजेत
५. लक्षणं नसलेल्या आणि अत्यावश्यक कारणांसाठी प्रवास करणाऱ्या व्यक्तींनी कोविड नियमांचं पालन केलं पाहिजे
६. राज्यांनी मोबाईल टेस्टिंग लॅबोरेटरीजच्या पर्यायाचा वापर केला पाहिजे

दक्षिण भारतात आढळलेला करोना विषाणू सर्वाधिक घातक; मृत्यूचा धोका १५ पटींनी वाढला

रॅपिड अँटिजेन टेस्ट वाढवायला हव्यात!

दरम्यान, लॅब्सवरचा ताण कमी करण्यासाठी रॅपिड अँटिजेन टेस्ट वाढवण्याचा सल्ला या परिपत्रकात देण्यात आला आहे.

१. सर्व सरकारी आणि खासगी आरोग्य सेवा केंद्रांवर रॅपिड अँटिजेन टेस्टची सुविधा उपलब्ध करून देता येईल
२. शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात अतिरिक्त अँटिजेन टेस्ट बूथ उभारता येतील
३. हे सर्व बूथ दिव-रात्र चालू ठेवता येतील
४. अशा ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी कठोर पावलं उचलली जावीत