राज्यसभेत अडकलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसने पाठींबा दिल्यास आम्ही महिला आरक्षण विधेयकाबाबत पावसाळी अधिवेशनात विचार करु, असे कायदा मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना पत्र लिहून कळवले आहे. त्यामुळे एका अर्थाने काँग्रेसला भाजपाने कोंडीत पकडले आहे.


प्रसाद यांनी पत्रात लिहीले की, महिला आरक्षण विधेयक काँग्रेसच्या काळात का मंजूर करण्यात आले नाही. महिला आरक्षण विधेयकाबरोबरच तीन तलाक आणि हलाला विधेयकही मंजूर व्हायला हवे.

आपल्या पत्रात प्रसाद यांनी याला नवी डील असे संबोधले आहे. त्यांनी म्हटले की, नव्या डीलनुसार, आपल्याला महिला आरक्षण विधेयक, तीन तलाकविरोधी विधेयक आणि हलाला निकाल विधेयकही दोन्ही सभागृहात मंजूर करायला हवेत. तसेच सरकारला हे देखील जाणून घ्यायचे आहे की, आपल्या पक्षासह अन्य सहकारी पक्ष आणि इतर विरोधी पक्ष या विधेयकांवर समर्थन देईल का? तसेच संसदेचे कामकाज रोखणार नाहीत.

राहुल गांधी यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीले होते. यामध्ये त्यांनी अनेक वर्षांपासून रखडलेले महिला आरक्षण विधेयकावर आगामी पावसाळी अधिवेशनात चर्चा करुन मंजूर करण्याची मागणी केली होती. यासाठी आपला विनाअट पाठिंबा असल्याचेही त्यांनी यात म्हटले होते.