दिवसागणिक देशातील वाढती करोनाबाधित रुग्णांची संख्या चिंतेत भर घालणारी ठरत आहे. गेल्या सात दिवसांपासून दररोज नऊ हजारांपेक्षा जास्त करोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. आरोग्य मंत्रलायाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ९ हजार ९८७ करोनाबाधित रुग्ण आढळे आहेत. तर तब्बल ३३२ जणांचा मृत्यू झाला आहे. देश अनलॉक होत असतानाच करोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या चिंतेत भर घालणारी ठरत आहे.

देशभरात आतापर्यंत करोनाबाधित रुग्णांची संख्या दोन लाख ६६ हजार ५९८ इतकी झाली आहे. त्यापैकी १ लाख २९ हजार २१५ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४८.४९ टक्के आहे. सध्या एक लाख २९ हजार ९१७ जणांवर उपचार सुरू आहेत. गेल्या २४ तासांत ३३१ रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांची संख्या ७,४६६ वर पोहोचली आहे.


केंद्र सरकारच्या प्रसिद्धी विभागातील (पीआयबी) अधिकारी करोनाबाधित झाल्याने निर्जंतुकीकरणासाठी दिल्लीतील राष्ट्रीय माध्यम केंद्र बंद करण्यात आले आहे. श्रम शक्ती भवन मात्र मंगळवारपासून पुन्हा खुले केले जाणार आहे. कामगार कल्याण मंत्रालयातील दोन अधिकारी बाधित झाल्यानंतर श्रम शक्ती भवन बंद करण्यात आले होते. केंद्रीय निवडणूक आयोगातील अधिकारीही करोनाबाधित झाला आहे.

केंद्रीय आरोग्य सचिव प्रीति सुदन यांनी दहा राज्यांमधील ३८ जिल्हाधिकारी व ४५ महापालिका आयुक्तांशी चर्चा करून करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यात महाराष्ट्र, तेलंगण, तमिळनाडू, राजस्थान, हरयाणा, गुजरात, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, उत्तराखंड आणि मध्य प्रदेश या राज्यांचा समावेश होता. अधिकाधिक नमुना चाचण्या घेणे, घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणे, विलगीकरण केंद्रे व अन्य वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भातही या बैठकीत चर्चा करण्यात आली.