२१ नोव्हेंबरपासून पर्यटन उपक्रमाला आरंभ
प्रवाशांना दिल्ली, आग्रा व जयपूर या ऐतिहासिक व चैतन्यमय शहरांची तीन शताब्दी एक्स्प्रेस गाडय़ांमधून सैर करवणारे रेल्वे सहल पॅकेज इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टूरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) २१ नोव्हेंबरपासून सुरू करणार आहे.
दिल्लीपासून आग्रा व जयपूरची दोन दिवसांची सहल घडवून आणणाऱ्या या उपक्रमात, वेळ महत्त्वाचा असलेल्या प्रवाशांना तीन शताब्दी एक्स्प्रेसमधून सुखदायी व त्रासमुक्त प्रवास घडवून आणण्यात येणार आहे. कमी कालावधीच्या प्रवासाचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांच्या गरजा भागवणाऱ्या देशातील नावीन्यपूर्ण सहल पॅकेजपैकी हे एक आहे. भारतातील सर्वाधिक प्रसिद्ध स्मारकांची भव्यता यात प्रवाशांना अनुभवता येईल, असे आयआरसीटीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ए. के. मनोचा यांनी सांगितले.
आठवडय़ातील दर शनिवार- रविवारी निघणाऱ्या या पॅकेजची सुरुवात २१ नोव्हेंबरपासून होईल. त्यात जगप्रसिद्ध ताजमहाल, आग्य््रााचा किल्ला आणि इदमतउद्दौला यांच्या स्थलदर्शनासह आग्य््राातील तारांकित हॉटेलमध्ये जेवण, जयपूरला रात्रीच्या मुक्कामानंतर दुसऱ्या दिवशी सोळाव्या शतकातील प्रसिद्ध अंबर किल्ला, जेवण व नंतर सिटी पॅलेस म्युझियमला भेट यांचा समावेश आहे. दिल्ली- हबीबगंज, आग्रा- जयपूर आणि जयपूर- नवी दिल्ली या तीन वातानुकूलित शताब्दी एक्स्प्रेस गाडय़ांमधून हा प्रवास होणार आहे. प्रवाशांना माहिती देण्यासाठी प्रशिक्षित मार्गदर्शकही (गाईड) असणार आहेत.